वाहनाच्या चाकासह अपघातावरही ब्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 05:00 AM2020-05-26T05:00:00+5:302020-05-26T05:01:30+5:30
२२ मार्चला जनता कर्फ्यू झाल्यानंतर २३ मार्चपासून लॉकडाऊनला सुरूवात झाली देशभरात हा लॉकडाऊ न ३१ मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मागील आठवड्यापासून लॉकडाऊनचे नियम शिथील करण्यात आले आहेत. त्यामुळे काही वाहनांची थोडीफार वर्दळ सुरू झाली आहे.
परिमल डोहणे।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मागील दोन महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे सर्वच ठप्प आहे. अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता जिल्ह्यातील वाहतूक पूर्णपणे बंद होती. या लॉकडाऊनमध्ये वाहनांची चाके थांबल्याने अपघातही थांबल्याचे आकडेवारीवरुन दिसून येत आहे. एप्रिल महिन्यात संपूर्ण जिल्ह्यात केवळ १२ अपघातांची नोंद आहे. गतवर्षीच्या तुलनेत अपघातांची संख्या घटल्याचे चित्र आहे.
२२ मार्चला जनता कर्फ्यू झाल्यानंतर २३ मार्चपासून लॉकडाऊनला सुरूवात झाली देशभरात हा लॉकडाऊ न ३१ मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मागील आठवड्यापासून लॉकडाऊनचे नियम शिथील करण्यात आले आहेत. त्यामुळे काही वाहनांची थोडीफार वर्दळ सुरू झाली आहे. मात्र ४ मे पूर्वी अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त सर्वच वाहने थांबली होती. त्याचा एका बाजूने सकारात्मक परिणाम दिसून आला आहे.
गतवर्षी एप्रिल महिन्यात जिल्हाभरात ५७ अपघातांची नोंद झाली होती. यामध्ये २७ जणांचा मृत्यू तर ४३ जण गंभीर जखमी झाले होते. यावर्षीचा संपूर्ण एप्रिल महिना लॉकडाऊनमध्येच गेला. त्यामुळे यावर्षी एप्रिलमध्ये केवळ १२ अपघात झाले असून ४ जणांचा मृत्यू झाला तर ९ जण गंभीर जखमी झाले आहेत. गतवर्षीच्या मार्च आणि एप्रिल महिन्यातील आकडेवारी पाहता यावर्षी अपघात, त्यातील मृत आणि जखमीची संख्या कमालीची घटल्याचे दिसून येत आहे. लॉकडाऊ न शिथील केल्यानंतर आता वाहने रस्त्यावर धावत आहेत. मात्र त्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी आणि रस्त्यावरील वर्दळ कमी होऊन अपघातावरही ब्रेक लागला आहे.
ब्लॅक स्पॉटही झाले अपघातविरहित
एखाद्या ठिकाणी वारंवार अपघात होणे, त्यात चारपेक्षा अधिक नागरिकांचा जीव जाणे असे जिल्ह्यात सुमारे २८ ब्लॅक स्पॉट आहेत. या ठिकाणी प्रशासनातर्फे जनजागृती फलकही लावण्यात आले आहेत. मात्र २३ मार्च ते १८ मे या कालावधीत वाहतूक निरीक्षक कार्यालयातून मिळालेल्या माहितीतून अत्यल्प अपघात झाले आहेत. लॉकडाऊनमुळे जीवनावश्यक वस्तूचे वाहन वगळता एकही वाहन धावले नाही. लालपरीसुद्धा बंद होती. परिणामी रस्त्यावरील वर्दळ शांत होती. याचा फायदा मोठ्या प्रमाणात झाला असून अपघाताचे प्रमाण कमी झाले आहे.
लॉकडाऊनच्या काळात अपघाताचे प्रमाण अत्यल्प आहे. पालकांनी आपल्या पाल्यांना वाहन खरेदी करुन देतानाच वाहतूक नियमांचे पालन करुन वाहन चालविण्याच्या सूचना कराव्या, अनेकदा युवक वाहनावरच मोबाईलद्वारे संभाषण करुन गाडी चालवताना दिसतात. त्याच्यावर कारवाई करण्यात येत आहे. पालकांनीसुद्धा पाल्यांना समज द्यावी.
-हृदयनाथ यादव,
वाहतूक निरीक्षक, चंद्रपूर