भाजपाने आघाडीचा विक्रम मोडीत काढला

By Admin | Updated: May 17, 2014 00:06 IST2014-05-17T00:06:38+5:302014-05-17T00:06:38+5:30

चंद्रपूर लोकसभा मतदार संघातून भाजपाचे उमेदवार हंसराज अहीर यांनी १९९६, २00४, २00९ व २0१४ प्रतिस्पर्धी काँग्रेस उमेदवारांचा पराभव करून विजय साजरा केला.

The BJP has broken the record of the alliance | भाजपाने आघाडीचा विक्रम मोडीत काढला

भाजपाने आघाडीचा विक्रम मोडीत काढला

बल्लारपूर : चंद्रपूर लोकसभा मतदार संघातून भाजपाचे उमेदवार हंसराज अहीर यांनी १९९६, २00४, २00९ व २0१४ प्रतिस्पर्धी काँग्रेस उमेदवारांचा पराभव करून विजय साजरा केला. आजवरच्या चार लोकसभा निवडणुकीपैकी २00९ मध्ये सर्वांत कमी ३२ हजार ४९५ मतांच्या तर २0१४ च्या १६ व्या लोकसभेत मतमोजणीच्या २१ व्या फेरीतच एक लाख ९३ हजार ९४३ मतांची आघाडी प्राप्त करून भाजपाने मतांच्या आघाडीचा विक्रम मोडीत काढला आहे.

१९९६ च्या लोकसभा निवडणुकीत चंद्रपूर लोकसभा मतदार संघातून एकूण २६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यावेळी भाजपाचे हंसराज अहीर, काँग्रेसचे शांताराम पोटदुखे व अपक्ष नरेश पुगलिया यांच्यात तिहेरी लढत झाली होती. यावेळच्या निवडणुकीत हंसराज अहीर यांना दोन लाख ५३ हजार ६७९ मते, काँग्रेसचे शांताराम पोटदुखे यांना एक लाख ५७ हजार ५४८ मते तर अपक्ष नरेश पुगलिया यांना ८३ हजार ५0 मते पडली होते. या निवडणुकीत भाजपाचे हंसराज यांनी शांताराम पोटदुखे यांचे ९६ हजार १३१ मतांच्या फरकाने मात केली होती.

१९९८ च्या लोकसभा निवडणुकीत चंद्रपूर मतदार संघात एकूण ११ उमेदवार निवडणुकीला उभे होते. या निवडणुकीत भाजपाचे हंसराज अहीर व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नरेश पुगलिया यांच्यात दुहेरी सामना झाला. यामध्ये नरेश पुगलिया यांना चार लाख ५0 हजार सात मते तर हंसराज अहीर यांना दोन लाख ९९ हजार ६५२ मते मिळाले होते. या निवडणुकीत हंसराज अहीर यांना एक लाख ५0 हजार ३५५ मतांच्या फरकाने पराभव स्विकारावा लागला होता. १९९९ च्या निवडणुकीत नरेश पुगलिया व हंसराज अहीर यांच्यातच अटीतटीची लढत झाली होती. त्यावेळच्या निवडणुकीत केवळ पाच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. यात नरेश पुगलिया यांनी हंसराज अहीर यांचेवर केवळ दोन हजार ८५८ मतांनी विजय मिळवला होता.

२00४ च्या निवडणुकीत लोकसभेसाठी एकूण ११ उमेदवारांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरून मतदारांचा कौल मागितला होता. या निवडणुकीत भाजपा उमेदवार हंसराज अहीर, काँग्रेसचे उमेदवार नरेश पुगलिया व बसपाचे राजेंद्र वैद्य यांच्यात तिरंगी सामना झाला होता. भाजपाचे हंसराज अहीर यांनी १९९८ व १९९९ सालच्या पराभवाचा वचपा काढत या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार नरेश पुगलिया यांच्यावर ५९ हजार ८२३ मतांच्या फरकाने मात केली. हंसराज अहीर यांना तीन लाख ६६ हजार १४ मते तर नरेश पुगलिया यांना तीन लाख सहा हजार १९१ मते पडली होते.

२00९ च्या लोकसभा निवडणुकीत एकूण २३ उमेदवारांनी भाग्य आजमावले होते. या निवडणुकीत भाजपाचे हंसराज अहीर, काँग्रेसचे नरेश पुगलिया व अपक्ष अँड. वामनराव चटप यांच्यात तिरंगी सामना झाला होता. यावेळी हंसराज अहीर यांना तीन लाख एक हजार ४६७ मते, नरेश पुगलिया यांना दोन लाख ६८ हजार ९७२ मते तर अँड. वामनराव चटप यांना एक लाख ६९ हजार ११२ मते मिळाले होते. या निवडणुकीत हंसराज अहीर यांनी नरेश पुगलिया यांच्यावर ३२ हजार ४९५ मतांच्या फरकाने विजय प्राप्त केला होता.

२0१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचे हंसराज अहीर, काँग्रेसचे संजय देवतळे व आपचे अँड. वामनराव चटप यांच्यात लढत झाली. या निवडणुकीत हंसराज अहीर यांना पाच लाख आठ हजार ४९ मते, संजय देवतळे यांना दोन लाख ७१ हजार ७८0 मते मिळाली.

अँड. वामनराव चटप यांना दोन लाख चार हजार ४१३ मते पडली. हंसराज अहीर यांनी काँग्रेसचे संजय देवतळे यांचा तब्बल दोन लाख ३६ हजार २६९ मतांनी विजयी झाले. आजवरच्या निवडणुकीत भाजपाचा हा सर्वात मोठा फरकाने विजयी होण्याचा विक्रम केला आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: The BJP has broken the record of the alliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.