सराफा बाजाराचे कोट्यवधींचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 05:00 IST2020-04-17T05:00:00+5:302020-04-17T05:00:55+5:30
नागपूर पाठोपाठ चंद्रपुरात दागिन्यांची हौस करणारे ग्राहक मोठ्या प्रमाणात आहेत. या बाजारपेठेतून दररोज तयार दागिन्यांबरोबर चांदीही मोठ्या प्रमाणात विकली जाते. दरवर्षी जानेवारी महिन्यापासूनच वधू-वरांसाठी दागिने बनविण्यासाठी काही रक्कम सराफांना देवून जाण्याची प्रथा चंद्रपुरात आहे. जिल्ह्यात साखरपुढ्यानंतर दागिन्यांसाठी दर महिना ठराविक हप्ता देवून शेवटचा हप्ता माफ करून सोने घेण्याची परंपरा आहे.

सराफा बाजाराचे कोट्यवधींचे नुकसान
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : लॉकडाऊनमध्ये अर्धी लग्नसराई गेल्याने सराफ व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबरोबरच या व्यवसायावर अवलंबून असलेल्या अनेक उपव्यावसायिकांचे आणि मजूर वर्गाचेही नुकसान झाले आहे. चंद्रपूर शहरात दररोज होणारी कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली आहे.
नागपूर पाठोपाठ चंद्रपुरात दागिन्यांची हौस करणारे ग्राहक मोठ्या प्रमाणात आहेत. या बाजारपेठेतून दररोज तयार दागिन्यांबरोबर चांदीही मोठ्या प्रमाणात विकली जाते. दरवर्षी जानेवारी महिन्यापासूनच वधू-वरांसाठी दागिने बनविण्यासाठी काही रक्कम सराफांना देवून जाण्याची प्रथा चंद्रपुरात आहे. जिल्ह्यात साखरपुढ्यानंतर दागिन्यांसाठी दर महिना ठराविक हप्ता देवून शेवटचा हप्ता माफ करून सोने घेण्याची परंपरा आहे. यंदा ही परंपरादेखील खंडित झाल्याचे दिसून आले आहे. गुढीपाडव्याला उलाढाल होऊ शकली नाही आणि आता कोरोनाच्या भितीन ेसंचारबंदी पाळत अनेकांनी आपला विवाह सोहळा पुढे ढकलला आहे. याचा सर्वाधिक परिणाम सराफ बाजारावर झालेला दिसून येत आहे. यातून कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली आहे.
कामगारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न
लॉकडाऊनमुळे सराफ व्यावसायिकांचा व्यवहार थांबला आहे. लॉकडाऊनमुळे व्यवसाय पूर्णत: कोलमडला आहे. व्यावसायिकांसह बाजारपेठेत जवळपास दीडहजार कामगार आहेत. त्यांची रोजीरोटीही थांबली आहे. काही दिवसांपूर्वी सुवर्णकारांनी आपल्या मजुरांना, कारागिरांना काही प्रमाणात अन्नधान्याची मदत केली आहे. परंतु आता यापुढे त्यांच्या दैनंदिन गरजा भागवणे अवघड आहे.
बँकांचे कर्ज भरण्यास येणार अडचणी
कोरोनामुळे मागील १७ दिवसात शहरात २५ कोटींचा व्यवहार ठप्प झाला आहे. या सराफापैकी अनेक व्यावसायिकांनी बँकाकडून व्यवसायासाठी कर्ज घेतले आहे. सरकारने सूचना दिल्यानंतरही या व्यावसायिकांना हप्ते भरण्याबाबत बँकांकडून सांगितले जात आहे. पुढील मंदीकाळात या व्यवसायाला दिलासा देण्यासाठी सरकारने सवलतीच्या योजना जाहीर करून त्या प्रामाणिकपणे राबविण्याची मागणी व्यावसायिकांनी केली आहे.