पोंभुर्ण्यात मोठा दुग्ध विकास प्रकल्प उभारणार
By Admin | Updated: October 7, 2014 23:32 IST2014-10-07T23:32:40+5:302014-10-07T23:32:40+5:30
सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रासह देशातील नागरिकांनी भाजपावर दाखविलेल्या विश्वास आणि प्रेमाच्या बळावर भारतीय जनता पार्टीचे सरकार केंद्रात सत्तारुढ झाले.

पोंभुर्ण्यात मोठा दुग्ध विकास प्रकल्प उभारणार
सुधीर मुनगंटीवार : पोंभुर्णा तालुक्यात विविध गावांमध्ये भेटींच्या माध्यमातून जनसंवाद
चंद्रपूर : सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रासह देशातील नागरिकांनी भाजपावर दाखविलेल्या विश्वास आणि प्रेमाच्या बळावर भारतीय जनता पार्टीचे सरकार केंद्रात सत्तारुढ झाले. देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी विराजमान झाले. मोदी सरकारच्या शंभर दिवसांच्या कार्यकाळात अनेक महत्त्वाचे निर्णय घेत मोदींनी भारतवासीयांची मने जिंकली. गेल्या १५ वर्षात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आघाडी सरकारने महाराष्ट्राला अधोगतीकडे नेले आहे. केवळ भ्रष्टाराचात आघाडीवर असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी महाराष्ट्राची अक्षरश: लूट केली आहे. औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्राची पिछेहाट झाली आहे. पोंभूर्णा तालुक्यासाठी स्वतंत्र एमआयडीसी स्थापन करण्यासाठी आम्ही प्रयत्नांची शर्थ केली. याबाबतची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. राज्यात भाजपा व मित्रपक्षांचे सरकार सत्तारुढ झाल्यास पोंभूर्णा एमआयडीसीचा निर्णय तातडीने घेण्यात येईल तसेच पोंभूर्णा तालुक्यासाठी दुग्धविकास प्रकल्प उभारण्यात येईल, असे प्रतिपादन बल्लारपूर विधानसभा क्षेत्रााचे भाजपा- रिपाई (आ.)- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
पोंभूर्णा तालुक्यातील नवेगार मोरे येथील जाहीर सभेत सुधीर मुनगंटीवार बोलत होते. पोंभूर्णा तालुक्यात आपण मोठ्या प्रमाणावर विकासकामे पूर्णत्वास आणली आहे. तालुक्यात फिरते वाचनालय उपलब्ध केले आहे. उपकोषागार कार्यालयाची निर्मिती केली. ग्रामीण रुग्णालय मंजूर करविले आहे. दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत ५२ लक्ष रुपये निधी विकासकामांसाठी मंजूर केला आहे. माळी समाजासाठी सभागृह, श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय अशी विविध विकास कामे आम्ही पूर्णत्वास आणली आहे. नेत्र चिकित्सा शिबिर, अपंगांना तीनचाकी सायकलींचे वितरण, सामूहिक विवाह मेळावे अशा विविध सामाजिक उपक्रमांची मालिका आम्ही या तालुक्यात राबविली आहे. बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचा सर्वांगीण विकास हेच आपले ध्येय असून राज्यात भाजपाचे सरकार आल्यास या तालुक्याच्या विकासाची गाडी अधिक वेगाने धावेल, असेही मुनगंटीवार म्हणाले.
यावेळी प्रमोद कडू म्हणाले, राज्यात यंदा सत्ता परिवर्तन अटळ आहे. जनता भाजपाला पूर्ण बहुमत देणार असा विश्वास आहे. यावेळी मंचावर भाजप नेते प्रमोद कडू, भाजपाचे पोंभुर्णा तालुकाध्यक्ष गजानन गोरगंटीवार, जि.प. सदस्य अल्का आत्राम, पं.स. सभापती बापू चिंचोळकर, पं.स. सदस्य महेश रणदिवे, भारती कन्नाके, बाजार समितीचे सभापती राहुल संतोषवार, उपसभापती हरिश ढवस आदी भााजपा पदाधिकारी उपस्थित होते.