भारत निर्माण पाणीपुरवठा योजना ठरली कुचकामी

By Admin | Updated: April 26, 2016 00:38 IST2016-04-26T00:38:01+5:302016-04-26T00:38:01+5:30

तालुक्यातील देवाडा खुर्द ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या रामपूर दीक्षित येथे भीषण पाणी टंचाई सुरू आहे.

Bharat Nirman Water Supply Scheme | भारत निर्माण पाणीपुरवठा योजना ठरली कुचकामी

भारत निर्माण पाणीपुरवठा योजना ठरली कुचकामी

रामपूर दीक्षित येथे पाणी टंचाई : ५१ लाखांचा खर्च पाण्यात
पोंभुर्णा : तालुक्यातील देवाडा खुर्द ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या रामपूर दीक्षित येथे भीषण पाणी टंचाई सुरू आहे. स्थानिक महिला जाम तुकुम परिसरातील लांब ठिकाणावरून पाणी आणत असून दोन महिन्यापासून पाण्यासाठी दमछाक करावी लागत आहे. या ठिकाणी भारत निर्माण योजनेंतर्गत बांधण्यात आलेली पाण्याची टाकी शोभेची वस्तु बनली आहे. मात्र याकडे स्थानिक ग्रामपंचायत सदस्यांचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये रोष पसरला आहे.
देवाडा खुर्द ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या रामपूर दीक्षित वार्ड क्र. ३ मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून पाण्याची टंचाई सुरू आहे. वाढती लोकसंख्या लक्षात घेता या ठिकाणी सन २००७ मध्ये गावकऱ्यांच्या सहभागातून भारत निर्माण पाणी पुरवठा योजनेची निर्मिती करण्यात आली. त्यानुसार ग्रामस्थांनी १० टक्के हिस्सा लोकवर्गणीतून जमा करण्यात आला व उर्वरीत रक्कम शासनाकडून प्रदान झाली आणि या योजनेसाठी ६५ लाख मंजूर झाल्याचे नागरिक सांगतात.
या योजनेवर नियंत्रण ठेवण्यासाठी गावातीलच नागरिकामधून पाणी पुरवठा समिती गठीत करण्यात आली. पाणी पुरवठा समितीकडे संपूर्ण अधिकार देण्यात आले. सुरूवातीला समितीचे अध्यक्ष म्हणून स्थानिक माजी सरपंच कु.स. घोंगडे यांनी काही दिवस राहिले. त्यानंतर याच गावातील विजय वासेकर यांची समितीवर अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आणि तेव्हापासूनच या पाणी पुरवठा योजनेला ग्रहण लागणे सुरू झाले.
अध्यक्षांचा योजनेच्या कामांवर कुठलेच अंकुश नसल्याने भारत निर्माण योजनेचे तीनतेरा वाजले आहे. यावर काम करणाऱ्या ठेकेदारांनी मनमर्जीचा वापर करून कामासाठी खरेदी करण्यात आलेले अनेक पाईप इतरांना परस्पर विकण्यात आले. यात अध्यक्षाच्या नातेवाईकांचा हस्तक्षेप असल्याचे बोलले जात आहे. एकंदरीत या कामावर ५१ लाख रुपये खर्च करण्यात आले. त्यात कोणते काम झाले, याबाबत पाणी पुरवठा समिती मधील सदस्यांना सुद्धा माहिती नसल्याचे समजते. याबाबत काही ग्रामस्थांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे तक्रार केली असून अजूनपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांकडूनसुद्धा कुठलीच चौकशी होत नसल्याने या प्रकरणावर संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पांघरूण घालण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे नागरिकांकडून बोलल्या जात आहे. संबंधीत प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी असलेल्या अध्यक्षावर कारवाईची मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Bharat Nirman Water Supply Scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.