भद्रावतीत पाणी पुरवठा योजना होणार कार्यान्वित

By Admin | Updated: May 10, 2014 00:07 IST2014-05-10T00:07:52+5:302014-05-10T00:07:52+5:30

येथील पाणी पुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले असून मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून भद्रावतीकरांना शुद्धपाणी मिळणार आहे.

Bhadravati water supply scheme will be implemented | भद्रावतीत पाणी पुरवठा योजना होणार कार्यान्वित

भद्रावतीत पाणी पुरवठा योजना होणार कार्यान्वित

 सचिन सरपटवार - भद्रावती

येथील पाणी पुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले असून मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून भद्रावतीकरांना शुद्धपाणी मिळणार आहे. वर्धा नदी हेडवर्कस् ते भद्रावती जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी पुरवठा सुरू झाला आहे. याबाबत नुकतीच एक चाचणी घेण्यात आली व ती यशस्वीसुद्धा झाली. याप्रसंगी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, उपाध्यक्ष प्रफुल चटकी न.प. पाणी पुरवठा सभापती सुधीर सातपुते तसेच पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. जलशुद्धीकरण केंद्रातील पाणी फिल्टर मिडियाद्वारे शुद्ध होवून मुख्य साठवण टाकीत भरून तेथून भद्रावती शहराला पाणी पुरवठा करणार्‍या भद्रावती विंजासन, नागमंदीर येथे असलेल्या टाक्यामध्ये पाण्याचा साठा करून नळाद्वारे नागरिकांना शुद्ध पाणी पुरविल्या जाणार आहे. भद्रावती वाढीव पाणी पुरवठा योजना केंद्र शासन पुरस्कृत लहान व मध्यम शहरांच्या विकास योजनेंतर्गत शहराला जलशुद्धीकरण योजना मंजुर झाली. सदर योजनेची मूळ किंमत १७.५२ कोटींची असून ती २००६ मध्ये मंजुर झाली. २००९ मध्ये योजनेच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली. वाढीव किंमतीच्या सीएसआर दरानुसार सदर योजना २५.२२ कोटी किंमतीची झाली. शहराची लोकसंख्या ७० हजार असून १४ हजार मालमत्ताधारक आहेत. आतापर्यंत चार हजार ५०० नागरिकांना नळ जोडण्या देण्यात आल्या आहेत. शहरात आवश्यक त्या नवीन वितरण नलिका पसरविण्याचे काम भद्रावती नगरपरिषदेद्वारे हाती घेण्यात आले आहे. ११.५० दशलक्ष क्षमतेची पाणी पुरवठा योजना कार्यान्वित होणार असून भद्रावती शहराला दररोज साडेअकरा लाख लिटर पाणी पुरवठा होणार आहे. शिल्लक असलेले पाणी महसुल वाढीच्या दृष्टीने रेल्वे, एनटीपीसी, वेकोलि व आयुध निर्माणी यांना दिले जाणार आहे. वेकोलिला दोन लाख लिटर, आयुध निर्माणीला एक लाख लीटर, एनटीपीसीला ५० हजार लीटर, सेंट्रल रेल्वेला एक लाख लिटर पाणी दररोज पुरविण्यात येणार आहे. भद्रावती शहराच्या जलशुद्धीकरण केंद्रातून दररोज दोन लक्ष लीटर पाणी अशुद्ध पाणी म्हणून सोडण्यात येणार आहे. सदर पाणी मूळ योजनेनुसार बाजुच्या तलावाला सोडण्याचे प्रस्तावित होते. परंतु सदर पाणी पुनर्वापरासाठी उपयोगात आणण्याबाबत न.प.तर्फे विचारविनिमय करण्यात आला. त्यादृष्टीने संबंधित अधिकार्‍यांशी चर्चा करून पुनर्प्रक्रिया साठवण टाकीचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे दररोज वाया जाणारे दोन लाख लीटर पाणी वाचून पाणी टंचाईवर निर्बंध येणार आहे.

Web Title: Bhadravati water supply scheme will be implemented

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.