सावधान! जिल्ह्यात कोरोना रुग्णांची मृत्यूसंख्याही वाढतेय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 05:00 IST2020-09-08T05:00:00+5:302020-09-08T05:00:22+5:30
चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग सातत्याने वाढत चालला आहे. गंभीर बाब अशी की हा संसर्ग संपर्कातून होऊ लागला आहे. ज्याच्या कुटुंबात कुणीही कोरोनाबाधित नाही, ज्याची प्रवासाची पार्श्वभूमी नाही, पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील म्हणून नोंदही नाही, अशांनाही कोरोनाची बाधा होत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्हा कोरोना संसर्गासंदर्भात कुठल्या पातळीवर येऊन पोहचला आहे,

सावधान! जिल्ह्यात कोरोना रुग्णांची मृत्यूसंख्याही वाढतेय
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात सध्या लॉकडाऊन नाही. सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत दुकाने उघडी आहेत. रस्त्यांवर प्रचंड गर्दी दिसते. दुकानातही गर्दी उसळत आहे. कुठेही कोरोना नियमांचे पालन होताना दिसत नाही. मात्र जिल्हावासीयांनो आता सावधगिरी बाळगण्याची गरज येऊन ठेपली आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दररोज तीन आकड्यात वाढत तर आहेच; सोबतच कोरोना रुग्णांच्या मृत्यूसंख्येतही दररोज वाढ होत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग सातत्याने वाढत चालला आहे. गंभीर बाब अशी की हा संसर्ग संपर्कातून होऊ लागला आहे. ज्याच्या कुटुंबात कुणीही कोरोनाबाधित नाही, ज्याची प्रवासाची पार्श्वभूमी नाही, पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील म्हणून नोंदही नाही, अशांनाही कोरोनाची बाधा होत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्हा कोरोना संसर्गासंदर्भात कुठल्या पातळीवर येऊन पोहचला आहे, हे दिसून येते. प्रारंभी चार-पाच दिवसांनी एखादा रुग्ण पुढे येत होता. आता दररोजच आणि तेही दोनशे, अडीचशे पॉझिटिव्ह रुग्ण कोविड केअर सेंटरमध्ये दाखल होत आहे.
पूर्वी अनेक महिने कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्याची जिल्ह्यात नोंद नव्हती. आता मात्र दररोज कोरोना रुग्णांचा मृत्यू होत आहे. तेदेखील एक नव्हे तर रोज दोन-चार रुग्ण कोरोनामुळे दगावत आहेत. हे मृत्यू कोरोनाने होत आहेत की इतर आजारांमुळे हा विषय चर्चेचा असला तरी आरोग्य विभागाच्या लेखी कोरोना रुग्ण म्हणूनच मृत्यृूची नोंद होत आहे.
आतापर्यंत ४४ जणांचा जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. केवळ एक-दीड महिन्यात एवढ्या जणांचा बळी म्हणजे विषय खरोखरच गंभीर झाला आहे.
विशेष म्हणजे, यात सर्वाधिक २८ मृत्यू चंद्रपूर तालुक्यातील आहे. एकट्या चंद्रपूर शहरातील २३ जण कोरोनामुळे दगावले आहेत. याशिवाय वरोरा तालुक्यातील दोन, मूल-दोन, चिमूर-एक, राजुरा-एक, बल्लारपूर-सात, भद्रावती-दोन व कोरपना तालुक्यातील एकाचा मृत्यू झाला आहे. दररोज कोरोनामुळे रुग्ण दगावत असल्यामुळे आता जिल्ह्यातील नागरिकांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे झाले आहे. कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून शासकीय नियमांचे काटेकोर पालन करणे आता सर्वानाच क्रमप्राप्त झाले आहे.
अशी घ्या काळजी
-घराबाहेर पडताना मास्कचा वापर कराच.
-मास्क नाक, तोंड झाकेल असा घाला.
-आपले हात नेहमी साबणाने स्वच्छ धुवा.
-साबण नसेल तर सॅनिटायझरचा वापर करा.
-शक्यतो बाहेरचे व उघडे पदार्थ खाणे टाळा.
-गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा.
-कोणत्याही दुकानात किंवा आस्थापनेत गर्दी करू नका.
-शहरात वावरताना नेहमी सोशल डिस्टन्सिंग पाळा.
-आजारी व्यक्तीपासून दूर रहा.
-आजारी व्यक्तींनीही स्वत:ला दूर ठेवावे.
-कोरोनाचे लक्षणे जाणवत असेल तर आरोग्य विभागाला कळवा.