सावधान! संपर्कातून वाढताहेत कोरोना रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 05:01 IST2020-07-24T05:00:00+5:302020-07-24T05:01:02+5:30
राजुरा आणि गडचांदूर भागात अधिक बाधित पुढे आल्यामुळे या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली. याशिवाय राजुरा येथील आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला. यावेळी राजुरा येथे डेडिकेटेड हेल्थ कोविड केअर स्थापन करून जिवती, कोरपना व गडचांदूर येथील नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी दिले. यावेळी त्यांनी या ठिकाणच्या उपजिल्हा रुग्णालयातील व्यवस्थेची पाहणी केली.

सावधान! संपर्कातून वाढताहेत कोरोना रुग्ण
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात संपर्कातून बाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे शारीरिक अंतर, मास्क वापरणे, अत्यावश्यक कामाशिवाय घरातून बाहेर न पडणे पुढचा काही काळ आवश्यक आहे. लॉकडाऊनला ज्यापद्धतीने प्रतिसाद नागरिक देत आहे. त्याच पद्धतीने शासनाच्या सर्व निर्देशांचे पालन केल्यास कोरोना सोबत लढणे शक्य होईल, असे मत जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी व्यक्त केले.
राजुरा आणि गडचांदूर भागात अधिक बाधित पुढे आल्यामुळे या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली. याशिवाय राजुरा येथील आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला. यावेळी राजुरा येथे डेडिकेटेड हेल्थ कोविड केअर स्थापन करून जिवती, कोरपना व गडचांदूर येथील नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी दिले. यावेळी त्यांनी या ठिकाणच्या उपजिल्हा रुग्णालयातील व्यवस्थेची पाहणी केली. प्रत्येक गाव, प्रत्येक शहर आता या आजारातून बाहेर काढणे आवश्यक असून त्यासाठी नागरिकांचे सहकार्य मिळेल, असे प्रयत्न करण्याचे त्यांनी आवाहन केले. त्यानंतर त्यांनी गडचांदूर येथे भेट दिली. आढावा बैठकीत सीईओ राहुल कर्डिले, नगराध्यक्ष सविता टेकाम, उपाध्यक्ष शरद जोगी, सभापती विक्रम येरणे, उपविभागीय अधिकारी जे.पी. लोंढे, तहसीलदार महेंद्र वाकलेकर, मुख्याधिकारी डॉ. विशाखा शेळकी, पोलीस निरीक्षक भारती, डॉ. स्वप्निल टेंभे, माजी सभापती निमजे, नगरसेवका पोन्नमवार आदी उपस्थित होते.
४ हजार किट महानगरपालिकेकडे
जिल्ह्यामध्ये २१ जुलै रोजी १० हजार अँंन्टिजेन चाचण्यांच्या किट दाखल झाल्या आहेत. यापैकी ४ हजार किट महानगरपालिकेला देण्यात आल्या आहेत. लॉकडाऊननंतरही अँंन्टिजेन चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यात येणार आहे. जिल्ह्यातील मोठे उद्योग, कारखाने या ठिकाणी जाऊन अँंन्टिजेन चाचणी होणार असल्याचे जिल्हाधिकाºयांनी स्पष्ट केले आहे. जिल्ह्यातील उद्योग, कारखाने, संस्थेतील नागरिकांची अँंन्टिजेन तपासणी करायची असल्यास जिल्हा आरोग्य विभाग, जिल्हा प्रशासनाला कळविणे गरजेचे आहे.
जबाबदारी वाढणार
लॉकडाऊनला प्रतिसाद मिळत असून शहरातील बाधितांची संख्या कमी झालेली आहे. लॉकडाऊनचे यश नागरिकांवर अवलंबून आहे. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर नागरिकांची जबाबदारी वाढणार आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडावे, विनाकारण गर्दी करू नये, मास्क योग्य पद्धतीने वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे या महत्त्वपूर्ण गोष्टीचे पालन करणे गरजेचे आहे.
चाचण्यांचे प्रमाण वाढविले
२१ जुलैपर्यंत १ हजार १८२ इतक्या अॅन्टिजेन चाचण्या केलेल्या आहेत. या अॅन्टिजेन चाचण्यांमधून ५ कोरोना बाधित पुढे आलेले आहेत. तसेच यामधील २५ स्वॅब प्रयोगशाळेमध्ये पुढील तपासणीसाठी पाठविले आहे. अॅन्टिजेन चाचण्यांमुळे कोरोना तपासणीचे प्रमाण वाढले आहे. एकट्या चंद्रपूर शहरामध्ये लॉकडाऊनच्या काळामध्ये ८०० पेक्षा अधिक अॅन्टिजेन तपासणी झालेल्या आहेत.
बरे होण्याचा दर ६० टक्के
जिल्ह्यामध्ये आतापर्यंत आरटीपीसीआरच्या माध्यमातून प्रयोगशाळेत १३ हजार ३७२ स्वॅब तपासण्यात आलेले आहे. बाधितांच्या संख्येमध्ये घट करायची असेल तर लॉकडाऊनच्या काळामध्ये जी काळजी घेतली आहे, तीच काळजी पुढील काळात घेणे गरजेचे आहे. दाखल झालेल्या बाधितांपैकी ६० टक्केच्या वर जिल्ह्याचा रिकवरी दर आहे. जिल्ह्यात एकाही बाधितांचा मृत्यू झालेला नाही.