बल्लारपूर नगराध्यक्ष पदासाठी हालचालीला वेग
By Admin | Updated: May 15, 2014 23:26 IST2014-05-15T23:26:26+5:302014-05-15T23:26:26+5:30
चंद्रपूर जिल्ह्यात सर्वात मोठी नगरपरिषद म्हणून बल्लारपूरची ओळख आहे. विद्यमान नगराध्यक्ष रजनी मुलचंदानी यांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ जून महिन्यात संपणार आहे.

बल्लारपूर नगराध्यक्ष पदासाठी हालचालीला वेग
बल्लारपूर : चंद्रपूर जिल्ह्यात सर्वात मोठी नगरपरिषद म्हणून बल्लारपूरची ओळख आहे. विद्यमान नगराध्यक्ष रजनी मुलचंदानी यांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ जून महिन्यात संपणार आहे. अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी येथील नगराध्यक्ष पदाचे आरक्षण असल्याने माजी खासदार नरेश पुगलिया गटाच्या वर्चस्वाला छेद देण्यासाठी पालकमंत्री संजय देवतळे गटांच्या कार्यकर्त्यांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. आपल्याच गटाचा नगराध्यक्ष व्हावा यासाठी राजकीय हालचालीने वेग घेतल्याचे दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसचे उमेदवार संजय देवतळे यांचा प्रचार न केल्याच्या कारणावरुन विद्यमान नगराध्यक्ष रजनी मुलचंदानी व त्यांचे पती तसेच तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष घनश्याम मुलचंदानी यांच्यावर तडकाफडकी निलंबनाची कारवाई केली. अशातच एम.बाल. बैरय्या शहर काँग्रेसचे अध्यक्ष असताना त्यांच्या जागी अब्दुल करीम यांना नेमण्यात आल्याने नरेश पुगलिया गटाला मोठा हादरा बसला. बल्लारपूर शहराच्या राजकारणावर तीन दशकांपासून असलेल्या त्यांच्या वर्चस्वाला पालकमंत्र्यांच्या गटाकडून शह देण्याचा धडाका लावला आहे. येथील नगरपालिकेत अनुसूचित जाती महिला राखीव जागेवर प्रभाग पाच मधून छाया मडावी या एकमेव काँग्रेसच्या उमेदवार म्हणून निवडून आल्या. परंतु याच प्रभागातून सर्वसाधारण जागेवर अपक्ष उमेदवार मीना मडावी यांनी विजय मिळविला. आता नगराध्यक्ष पदासाठी दोन्ही महिला दावेदार म्हणून समोर आल्या आहेत. प्रमुख विरोधी पक्ष भाजपकडे नगराध्यक्ष पदाचा उमेदवार नसल्याने त्यांचा कल कोणाकडे राहणार हे समजू शकले नाही. नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसच्या नगरसेवक छाया मडावी प्रबळ दावेदार असताना अचानक मीना मडावीला समोर करुन पालकमंत्री संजय देवतळे गटाने चुरस निर्माण केली आहे. ज्यावेळी रजनी मुलचंदानी नगराध्यक्ष झाल्या. त्यावेळी काँग्रेसचे ११, बसपाचे ४, शिवसेनेचे ३, राष्ट्रवादी काँग्रेसचा एक व अपक्ष दोन असे एकूण २१ नगरसेवकांच सर्मथन मिळाले होते. भाजपाचे ११ नगरसेवक विरोधी गटात होते. दरम्यान बसपाच्या एका नगरसेवकाने राजीनामा दिल्याने पोटनिवडणूक घेण्यात आली. त्यात काँग्रेसचा उमेदवार विजयी झाल्याने नगरपालिकेच्या सत्ताकारणात काँग्रेसच सर्वात मोठा पक्ष आहे. पुगलिया गटातील नगरसेवकांवर निलंबनाचे संकेत मिळाल्याने नगरपालिका वतरुळातील राजकारणात खळबळ निर्माण झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)