जिल्हाधिकारी यांना बामसेफचे निवेदन
By Admin | Updated: September 1, 2015 00:47 IST2015-09-01T00:47:26+5:302015-09-01T00:47:26+5:30
हरियाणातील रोहतक येथे स्वामी दयानंद सरस्वती विश्वविद्यालयातील विधी विभागामधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉलमध्ये आयोजित केलेल्या ...

जिल्हाधिकारी यांना बामसेफचे निवेदन
मागणी : घटनेची चौकशी करा
चंद्रपूर : हरियाणातील रोहतक येथे स्वामी दयानंद सरस्वती विश्वविद्यालयातील विधी विभागामधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉलमध्ये आयोजित केलेल्या बामसेफच्या २० व्या हरियाणा राज्य अधिवेशनात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालून नारेबाजी केली आणि अधिवेशन उधळून लावण्याचा प्रयत्न केला. या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी बामसेफ आणि मूलनिवासी संघ जिल्हा शाखा चंद्रपूरचे वतीने राष्ट्रपती, प्रधानमंत्री, मुख्यमंत्री हरियाणा यांना जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या मार्फत निवेदन देऊन करण्यात आली.
बामसेफचे अधिवेन शांतपणे सुरू असताना एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांनी हॉलच्या मुख्य दरवाजाला बाहेरुन कुलूप लावून अधिवेशनात बाधा आणली. बामसेफच्या कार्यकर्त्यांनी राज्य अधिवेशन घेण्यासाठी रितसर परवानगी घेतली होती व हॉलचे भाडेही भरले होते. तरीपण एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांनी अधिवेशनामध्ये येऊन धुडघुस घातला. बामसेफच्या कार्यकर्त्यांनी विश्वविद्यालयाच्या रजिस्ट्रारला याची माहिती दिली. एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांना तेथून निघून जाण्यासाठी सांगावे त्यासाठी सुरक्षा रक्षकांचे किंवा पोलिसांचे सहकार्य घेऊन आम्हाला सहकार्य करावे, अशी विनंती केली. त्याप्रमाणे रजिस्ट्रारने पोलिसांना पाचारण केले. पण कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती जर हाताबाहेर गेली तरच आम्ही हस्तक्षेप करु, असे बोलत पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. त्यामुळे बामसेफचे कार्यकर्ते अस्वस्थ होवून मुख्य दरवाजाकडे जात असताना धुडगूस घालणाऱ्या एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांना समजावून न सांगता बामसेफ व मूलनिवासी संघाच्या कार्यकर्त्यांवर लाठीहल्ला केला आणि एबीव्हीपीच्या गुंड कार्यकर्त्यांना पाठिशी घालून प्रोत्साहन दिले. त्यामुळे बामसेफच्या कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध म्हणून प्रशासनाच्या विरोधात धरणा प्रदर्शन केले.
बामसेफ व मूलनिवासी संघ या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून देशभरात एससी, एसटी, ओबीसी व धर्मांतरित अल्पसंख्याक समाजामध्ये जनजागृती करीत असल्यामुळे हा समाज मोठ्या प्रमाणात फुले, शाहु, आंबेडकर विचारधारेचा स्वीकार करीत आहे. त्यामुळे ब्राम्हणवादी व्यवस्थेत मोठा हादरा बसत असल्यामुळे ते देशविघातक कृत्य करीत आहेत, असे बामसेफचे म्हणणे आहे. शिष्टमंडळात येष्ठ कार्यकर्ते एस.सी. सहारे, एम.टी. साव, जी.के. उपरे, के.के. शेंडे आदींचा समावेश होता. (शहर प्रतिनिधी)