निराधाराच्या पैशानेच बालाजीचा घात
By Admin | Updated: May 16, 2017 00:35 IST2017-05-16T00:35:12+5:302017-05-16T00:35:12+5:30
राज्यभरात बळीराजा आत्महत्या करीत असला तरी सरकारला मात्र अद्यापही पाझर फूटत असल्याचे जाणवत नाही.

निराधाराच्या पैशानेच बालाजीचा घात
पैसे मिळालेच नाही : कर्जबाजारी शेतकरी बालाजी गुटे यांनी संपविली जीवनयात्रा
संघरक्षित तावाडे। लोकमत न्यूज नेटवर्क
जिवती : राज्यभरात बळीराजा आत्महत्या करीत असला तरी सरकारला मात्र अद्यापही पाझर फूटत असल्याचे जाणवत नाही. उलट त्यांचे कर्ज माफ करण्याऐवजी खिल्ली उडविली जात आहे. शेतकरी आत्महत्येला जसे कर्ज कारणीभूत आहे, तसेच प्रशासकीय यंत्रणाही कारणीभूत ठरत असल्याचे बालाजी गुटे या शेतकऱ्यांवर घडलेल्या प्रसंगावरून दिसून येते.
दोन दिवसापूर्वी म्हणजे १३ मे रोजी जिवती तालुक्यातील पुडियाल मोहदा येथील कर्जबाजारी शेतकरी बालाजी गुटे (६९) यांनी आपल्याच शेतात झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. दुष्काळ आणि सततच्या नापिकीने जीवन कसे जगावे, कुटुंबाचा गाडा कसा चालवायचा, या विवंचनेत सापडलेल्या बालाजी गुंटे या वृध्द शेतकऱ्याने एकदाचे जीवनच संपविले.
आत्महत्यापूर्वी ते काही दिवसांपासून आपल्या निराधाराच्या पैशासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ये-जा करीत होते. महिन्याकाठी ६०० रुपये याप्रमाणे बालाजी गुटे यांना निराधाराचे पैसे मिळायचे. ६०० रुपये म्हणजे निराधाराला जगण्यासाठी आधारच असतो.
पण यावेळेला मात्र बँकेत आपल्या निराधाराच्या पैशासाठी येरझाऱ्या मारता- मारता बालाजी थकून गेले होते, असे गावकऱ्यांसोबत चर्चा केल्यानंतर समजले. कदाचित अगोदरच कर्जाने थकलेल्या त्या गरीब शेतकऱ्याचे नियोजनच बिघडले असावे आणि निराशेपोटी त्यांनी आत्महत्या केली असावी, असा अंदाज जनतेकडून आणि घरच्यांकडून वर्तविला जात आहे.
लोकमतने वेधले होते लक्ष
१३ मे रोजी लोकमतने बँकेतील निराधारांची गर्दी पाहता आणि दिवसभर बँकेत बसूनही त्यांना पैसे मिळत नसल्याने निराधारांना आधारच नाही, या आशयाचे वृत्त लोकमतने प्रकाशित केले होते. त्याचदिवशी बालाजी गुंटे यांनी आपल्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. जिवती हे तालुक्याचे ठिकाण असले तरी येथे एकही राष्ट्रीयकृत बँक नाही. वैनगंगा- कोकण ग्रामीण बँक व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अशा दोन बँका असून येथेही पुरेशी रक्कम राहत नाही. याबाबतही लोकमतने वारंवार वृत्त प्रकाशित करून यंत्रणेचे लक्ष वेधले. प्रशासन मात्र दुर्लक्षच करीत आहे. असेच जर नेहमी राहले तर आणखी अनुचित घटना घडण्यास कोणीच रोखू शकणार नाही,
निराधारांना वेळीच पैसे द्यावे -महेश देवकते
पुडियाला मोहदा येथील बाजाली गुंटे यांनी कर्जबाजारीला कंटाळून आत्महत्या केली. तसेच निराधाराच्या पैशासाठी गुंटे यांनी भरलेला बँकेचा विड्राल (दि. १२ मे रोजी), निराधाराचे न मिळालेले पैसे हा सर्व प्रकार सांत्वनासाठी गेलेल्या पं.स. उपसभापती महेश देवकते यांच्या निदर्शनात आणून दिला. यापुढे बँकांनी शेतकरी असोत की निराधार व्यक्ती असो, यांना वेळीचे पैसे द्यावे, बँकेत गरीब निराधारांची गर्दी दिसणार नाही. बँकेत नेहमी रक्कम असायलाच हवी. जेणेकरुन सर्वांना पैसे मिळायला हवे, अशी मागणी देवकते यांनी संबंधित यंत्रणेकडे केली. ग्रामीण बँकेत निराधार लोकांकडे नेहमी दुर्लक्ष दिसत असून यानंतर हा प्रकार सहन केला जाणर नाही, असेही त्यांनी सांगितले.