अरविंडो कंपनीच्या संमतीसाठी गावकऱ्यांना अंधारात ठेवण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:33 IST2021-09-17T04:33:56+5:302021-09-17T04:33:56+5:30

भद्रावती : तालुक्यातील बेलोरा येथे अरविंडो कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी गावात विनापरवानगी इंग्रजी पत्राचा वापर करून सर्वेक्षण करून ...

Attempts to keep villagers in the dark for the consent of the Aurobindo Company | अरविंडो कंपनीच्या संमतीसाठी गावकऱ्यांना अंधारात ठेवण्याचा प्रयत्न

अरविंडो कंपनीच्या संमतीसाठी गावकऱ्यांना अंधारात ठेवण्याचा प्रयत्न

भद्रावती : तालुक्यातील बेलोरा येथे अरविंडो कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी गावात विनापरवानगी इंग्रजी पत्राचा वापर करून सर्वेक्षण करून स्वाक्षरी करण्याचा प्रकार गावकऱ्यांनी हाणून पाडला. या प्रकाराने गावकऱ्यांना अंधारात ठेवण्याचा प्रकार उघड झाला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या चौकशीच्या आदेशानंतर तहसीलदारांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.

बेलोरा गावाजवळील कोळसा खाणीचा ब्लॉक अरविंडो रियालिटी या कंपनीला मिळाला आहे. याकरिता कंपनीच्या हालचाली चालू झाल्या असून कायद्यानुसार शासकीय नियमानुसार गावात प्रकल्प चालू करण्यापूर्वी संबंधित गावकऱ्यांचे भूसंपादन, तसेच इतर बाबींसाठी कंपनीला संमती घेणे आवश्यक असते. मात्र कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी या शासकीय नियमाला डावलून, कोणतीही सूचना न देता, गावातील ग्रामसभेची सहमती न घेता, येथील गावकऱ्यांना अंधारात ठेवून कंपनीचा ब्लॉक चालू करण्यासाठी सहमती तसेच सर्वेक्षणासाठी इंग्रजी फाॅर्मचा वापर करून गावकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या घेण्याचा प्रकार चालू केला होता. हा प्रकार भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आकाश वानखेडे व गावकऱ्यांनी हाणून पाडला. हे प्रकरण पोलीस स्टेशननंतर जिल्हाधिकाऱ्यांकडे पोहोचले. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकाराबाबत तहसीलदार महेश शितोळे यांना चौकशीचे आदेश दिले.

बॉक्स

नियमाला तिलांजली

कंपनीच्या अधिकाऱ्यांनी नवीन कायद्यानुसार भूसंपादन तसेच कंपनी चालू करण्याचे सहमतीपत्र हे इंग्रजीमध्ये न देता मराठीत वापरायला पाहिजे होते, तसेच गावकऱ्यांची बैठक लावून याबाबत माहिती द्यायला हवी होती. मात्र शासकीय नियमांना डावलून कंपनी चुकीच्या पद्धतीने सर्वेक्षण करीत असल्याचा प्रकार घडला आहे.

कोट

जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार या प्रकाराबाबत चौकशी करण्यात आली. अरविंडो कंपनीला ब्लॉक रितसर मिळाला. मात्र कोणतीही कंपनी चालू करताना ८० टक्के गावकऱ्यांची सहमती असणे आवश्यक आहे. शासकीय नियमांचे पालन करावे लागते. गावकऱ्यांना विश्वासात न घेता सर्वेक्षण तसेच संमती घेण्याचा कंपनीचा प्रकार चुकीचा आहे.

- महेश शितोळे, तहसीलदार, भद्रावती.

Web Title: Attempts to keep villagers in the dark for the consent of the Aurobindo Company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.