सरपंचांवर महिलांचा हल्लाबोल
By Admin | Updated: August 21, 2015 01:40 IST2015-08-21T01:40:09+5:302015-08-21T01:40:09+5:30
मेंडकी ग्रामपंचायत ब्रह्मपुरी तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत समजली जाते. येथील ग्रामपंचायतीचे वाद नेहमीच चर्चेचे विषय ठरत असतात.

सरपंचांवर महिलांचा हल्लाबोल
मेंडकी : मेंडकी ग्रामपंचायत ब्रह्मपुरी तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत समजली जाते. येथील ग्रामपंचायतीचे वाद नेहमीच चर्चेचे विषय ठरत असतात. १५ आॅगस्ट रोजी येथील ग्रामपंचायत कार्यालयात सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रामसभेत महिलांनी येथील सरपंचा मंगला मधुकर लोनबले यांच्यावर हल्लाबोल केल्याचा प्रकार घडला आहे.
मेंडकी येथील ग्रामपंचायत कार्यालय येथे दुपारी २ वाजता ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रामसभेचे विषय रोजगार हमी अंतर्गत पांदण रस्ते आणि तंटामुक्त गाव समिती पूनर्गठीत करणे आदी अनेक होते. या ग्रामसभेला मेंडकी येथील जवळपास १२५ महिला व पुरुष उपस्थित होते. तंटामुक्ती समितीचे पूनर्गठन करताना शासनाच्या परीपत्रकानुसार समिती गठीत न करता ग्रामसभेने ठरविलेल्या काही टवाळखोर सदस्यांचा या समितीत भरणा केला आहे. यात शासन परिपत्रकाचे उल्लंघन करण्यात आले आहे. असे सूर येथील जनतेत निघताना दिसत आहे. तसेच ग्रामसभा सुरू असताना या ग्रामसभेत प्रत्येक विषयावर टवाळखोर पध्दतीने चर्चा केली जात होती. तसेच ग्रामसभा सरतेशेवटी रोजगार हमी या मुद्द्यावर चांगलीच सभा रंगली होती. ९ जानेवारी २०१५ रोजी कल्पना ठाकरे यांच्या शेतीजवळील पांदण रस्त्याचे रोजगार हमीचे मातीकाम सुरु करण्यात आले होते. पण हा पांदण रस्ता वन विभागाच्या जागेतून येत असल्याने येथील वन विभागाने या पांदण रस्त्याचे बांधकाम अडविले होते. या पांदण रस्त्यावरील अंदाजे ४५० मजूर मेंडकी येथील कामावर हजर होते. पंचायत समिती ब्रह्मपुरी येथील अधिकाऱ्यांनी माहिती देवून सदर पांदण रस्त्याचे बांधकाम करण्यात आले. त्यानंतर येथील सरपंचा मंगला मधुकर लोनबले या सदर रस्त्याच्या कामावर जाऊन काम कोणीही बंद करु नये, असे मजुरास सांगितले. मजुरी जर शासनाने नाही दिली तरी आपण स्वत: देऊ, असे पांदण रस्त्यावरील मजुरांना सांगितले. आणि मजुरांनी कामाला सुरुवात केली. परंतु आज आठ महिने लोटूनही या मजुरांना त्यांच्या कामाचा मोबदला मिळाला नाही. या कारणामुळे ग्रामसभेत उपस्थित मजूर महिलांनी या विषयावरुन सरपंचा मंगला मधुकर लोनबले यांच्यावर चांगलाच हल्लाबोल केला. वातावरण अधिक चिघळत असताना सभेचे अध्यक्ष तथा उपसरपंच यशवंत विनायक आंबोरकर आणि ग्रामसेवक राकेश श्रीराम साव यांनी या विषयावर नंतर तोडगा काढण्यात येईल, असे सांगून महिलांना शांत केले. अन्यथा हे प्रकरण अधिक तापले असते. (वार्ताहर)