आपत्ती व्यवस्थापनाच्या हवेत बाता
By Admin | Updated: April 26, 2015 01:44 IST2015-04-26T01:44:04+5:302015-04-26T01:44:04+5:30
शहरात कोणतही अनुचित घटना घडू नये, घडली तर त्याचे अधिक दुष्परिणाम होऊ नये, यासाठी प्रशासनाला आपत्ती व्यवस्थापन सज्ज ठेवावे लागते.

आपत्ती व्यवस्थापनाच्या हवेत बाता
रवी जवळे चंद्रपूर
चंद्रपूर : शहरात कोणतही अनुचित घटना घडू नये, घडली तर त्याचे अधिक दुष्परिणाम होऊ नये, यासाठी प्रशासनाला आपत्ती व्यवस्थापन सज्ज ठेवावे लागते. वेळोवेळी या व्यवस्थापनातील सदस्यांना प्रशिक्षण दिले जाते. वर्षातून एकदा मॉकड्रील घेऊन हे व्यवस्थापन कितपत तयार आहे, याची तपासणी केली जो. असे असले तरी प्रशासनाचे हे आपत्ती व्यवस्थापन कुंभकर्णी झोपेतच आहे, हे आज सिध्द झाले. आज शनिवारी चंद्रपुरात भुकंपाचे धक्के जाणवले. इमारती हलल्या. ऐन वर्दळीच्या कस्तुरबा मार्गावरील भलीमोठी इमारत एका बाजुला झुकली. या घटनेनंतर नागरिकांची गर्दी उसळली. मात्र आपत्ती व्यवस्थापनाची तत्परता कुठेच दिसून आली नाही. तब्बल चार तास या ठिकाणची गर्दी नियंत्रित होती. यामुळे वाहतुकीचाही खोळंबा झाला.
शनिवारी दुपारी ११.३० वाजताच्या सुमारास चंद्रपुरात भुकंपाचे धक्के जाणवले. अनेक भागातील तीन मजली, चार मजली इमारती हलल्या. हा भुकंपाचाच धक्का आहे, हे समजल्यानंतर इमारतीमधील सर्व भीतोपोटी रस्त्यावर आले. मात्र या संभ्रमित वातावरणात नागरिकांना योग्य माहिती देणारी कोणतीही यंत्रणा मात्र सायंकाळपर्यंत दिसलीच नाही. पर्यायाने, शासनाच्या आपत्ती व्यवस्थापनाच्या बाता कशा हवेत आहेत, याचा अनुभव सर्वांनाच आला.
कस्तुरबा मार्गावरील कमला नेहरू मार्केट नामक व्यावसायिक ईमारतीसमोर तर आपत्ती व्यवस्थापनाच्या अक्षरश: चिंधड्या उडालेल्या अनुभवास आल्या. या इमारतींमध्ये डझनभर कार्यालये आहेत. सर्व कार्यालयातील कर्मचारी इमारत हलल्यानंतर सैरावैरा खाली पळत सुटले. काही वेळानंतर इमारतीचे निरीक्षण केले असता ही इमारत एका बाजुने झुकत असल्याचे लक्षात आले. ही वार्ता वाऱ्यासारखी पसरल्यानंतर घटनास्थळी नागरिकांची एकच गर्दी उसळली. ज्या बाजुने इमारत झुकत होती, त्या बाजुने, इमारतीच्या अगदी खाली उभे राहून नागरिक हे दृष्य बघत होते. एवढेच नव्हे तर काही जण तर चक्क या झुकत असलेल्या इमारतीवर चढूनही ‘मजा’ बघत होते. कुणाचा कुणाला पायपोस नव्हता. गर्दीवर कुणाचेही नियंत्रण दिसून येत नव्हते. सुरक्षेचे तर धिंडवडेच निघाल्याचे दिसून आले.
तब्बल चार तासांपर्यंत या ठिकाणी प्रशासनाचा एकही अधिकारी पोहचला नाही. ही इमारत सध्या महानगरपालिकेच्या ताब्यात आहे. तरीही महानगरपालिकेचा एकही अधिकाऱ्यांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी येऊन पाहण्याचे सौजन्य दाखविले नाही. या अधिकाऱ्यांचे तर सोडाच; अशावेळी महत्त्वपूर्ण भूमिका वठविणारे आपत्ती व्यवस्थापनही कुठेच दिसून आले नाही. वाहतूक शिपाई वगळले तर, एकही पोलीस कर्मचारी या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी हजर नव्हता. अगदी अर्धा किलोमीटरवर शहर पोलीस स्टेशन असूनही कुणालाही येथे पोहचण्याची गरज वाटू नये, याचे आश्चर्य होते. वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक पुंडलिक सपकाळे गस्तीदरम्यान या मार्गावर पोहचले. गर्दी दिसल्याने ते या ठिकाणी आले. काही वेळ त्यांनी वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. मात्र काही वेळाने तेदेखील येथून निघून गेले.
आपत्ती व्यवस्थापन सज्ज आहे की नाही, हे तपासण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून वर्षातून एकदा मॉकड्रील घेतली जाते. एखादी अफवा पसरवून आपले आपत्ती व्यवस्थापन कसे तगडे आहे, हे तपासले जाते. आज आपत्ती व्यवस्थापनाची खरोखर गरज असताना हे व्यवस्थापन कोलमडल्याचे दिसून आले.
पालकमंत्री आल्यानंतर हलली यंत्रणा
कस्तुरबा मार्गावरील कमला नेहरू इमारत भुकंपाच्या धक्क्यामुळे झुकत असल्याची वार्ता शहरभर पसरली. राज्याचे अर्थमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आज चंद्रपुरात होते. त्यांच्या कानी ही वार्ता पडताच ते दुपारी २ वाजताच्या सुमारास घटनास्थळी पोहचले. त्यांनी इमारतीची पाहणी करून नागरिकांशी चर्चा केली. त्यानंतर प्रशासकीय यंत्रणा जागी झाली. पाठोपाठ जिल्हाधिकारी आशुतोष सलील तिथे आले. त्यानंतर म्हणजे दुपारी ३ वाजताच्या सुमारास अग्निशमन वाहन व दंगा नियंत्रण पथकाची एक तुकडी या ठिकाणी पोहचली.
इमारत झुकण्यावरून उलटसुलट चर्चा
कमला नेहरू इमारत एका बाजुने हळूहळू झुकत असल्याचे अनेकांना दिसून आले. त्यामुळे ही माहिती सर्वत्र पसरली. इमारत बघितल्यानंतर काही जण इमारत झुकत असल्याचे सांगत होते तर इमारत पूर्वीपासूनच तशीच आहे, असे काही जणांचे म्हणणे होते. मात्र भुकंपाच्या धक्क्यामुळे इमारत काही वेळ हलल्यावर सर्वांचेच एकमत होते. ज्या बाजूने ही इमारत झुकली, त्या वायव्य कोपऱ्यात स्लॅबवर मोबाईल टॉवर आहे. त्याच कोपऱ्यात सर्वात वरच्या मजल्यावर अरोरा जीमची अवजड यंत्रसामुग्रीही आहे, हे विशेष.
इमारतीची देखभाल महानगरपालिकेकडे
ज्या ठिकाणी कमला नेहरू इमारत आहे, ती जागा महानगरपालिकेच्या मालकीची आहे. १२ ते १३ वर्षांपूर्वी बिओटी तत्वावर कमला नेहरू इमारतीचे बांधकाम करण्यात आले. आता ही इमारत महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. येथील गाळ्याचे भाडेही महानगरपालिकाच वसूल करीत असून देखभालदुरुस्तीही मनपाच करीत आहे.