झोपडीवजा घरात होम क्वारंटाईनची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 05:01 IST2020-05-06T05:00:00+5:302020-05-06T05:01:05+5:30

धान पिकाचा हंगाम संपला की हाताला कामच मिळत नाही. त्यामुळे मूल, सावली, गोंडपिपरी, पोंभुर्णा, सिंदेवाही, ब्रह्मपुरी, नागभीड आदी धान उत्पादक तालुक्यातील शेतमजूर मिरची तोडाईच्या हंगामासाठी पाठीवर बिºहाड घेऊन तेलंगणा, आंध्र प्रदेशात गेले होते. मात्र, लॉकडाऊनमुळे अडकल्याने मजूर स्वत:च्या घरी परत आले. विविध राज्यांमध्ये अडकलेल्या मजुरांना स्वगावी आणण्याची प्रक्रिया सुरूच आहे.

Anxiety about home quarantine in a slum house | झोपडीवजा घरात होम क्वारंटाईनची चिंता

झोपडीवजा घरात होम क्वारंटाईनची चिंता

ठळक मुद्देअडकलेल्या मजुरांचा सवाल : मजूर म्हणतात’ घरी आलोत परंतु कोंडमारा भोगतोय

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : पोटाची खडगी भरण्यासाठी तेलंगणा, आंध्र प्रदेशात गेलेले जिल्ह्यातील सुमारे अडीच हजार स्थलांतरीत मजूर सोमवारपर्यंत परत आले आणि क्वारंटाईन झाले. मात्र, झोपडीवजा घरात कसे व किती अंतर ठेवणार, मजुरीची तर काहीच शाश्वती नाही, संकटे झेलत घरी येऊनही कोंडमारा भोगत आहेत. मध्य प्रदेश व छत्तीसगड राज्यातून चंद्रपुरात अडकलेले परप्रांतीय मजूर प्रशासनाला विचारत आहेत ‘घरचे सर्व चिंतेत आहेत परतीसाठी आमचा नंबर केव्हा लावणार...’ सरकारने मजुरांना रेल्वेने पाठविणे सुरू केले. पण सारेच मजूर अस्वस्थ आहेत. ‘लोकमत’ने विविध ठिकाणच्या निवारा केंद्रांची पाहणी केल्यानंतर कुटुंबाचीच चिंताच मजुरांना छेडत असल्याचे तणावग्रस्त चेहऱ्यावरून बुधवारी दिसून आले.
धान पिकाचा हंगाम संपला की हाताला कामच मिळत नाही. त्यामुळे मूल, सावली, गोंडपिपरी, पोंभुर्णा, सिंदेवाही, ब्रह्मपुरी, नागभीड आदी धान उत्पादक तालुक्यातील शेतमजूर मिरची तोडाईच्या हंगामासाठी पाठीवर बिºहाड घेऊन तेलंगणा, आंध्र प्रदेशात गेले होते. मात्र, लॉकडाऊनमुळे अडकल्याने मजूर स्वत:च्या घरी परत आले. विविध राज्यांमध्ये अडकलेल्या मजुरांना स्वगावी आणण्याची प्रक्रिया सुरूच आहे. घरी परतलेले मजूर आता क्वारंटाईनमध्ये आहेत. मूल येथील होम क्वारंटाईनमधील व्यक्तींच्या नातेवाईकांशी संवाद साधला असता म्हणाले, चंद्रमोळी तीन खोल्यांच्या झोपडीत सात सदस्य राहतात. काम केले तरच पोट भरते. घरात पैसाअडका नाही. ‘आरोग्य की पोट’ याबाबत कशाचे अंतर पाळायचे हेच समजत नाही.’ नागभीड तालुक्यातील विंथूर, ठवरे पारडी, पाणलोडी, नांदेड येथील मजुरांनाही रोजीरोटीचाच प्रश्न भेडसावत आहे.

मदतीऐवजी घराचीच ओढ
चंद्रपूर शहराच्या महाकाली वार्डातील मनपाच्या महाकाली कन्या स्कूल विद्यालयातील निवारा केंद्रात मध्य प्रदेशातील २३ व भंडारा जिल्ह्यातील एक असे एकूण २४ मजूर अडकले आहेत. इमारती बांधकामावर काम करणारे हे मजूर घरी जाण्याची प्रतीक्षा करत आहेत. याशिवाय घुटकाळा वार्डातील जाकीर हुसेन उर्दू विद्यालयात तेलंगणाचे १६ व गोंदियाचे ७ असे २३ मजूर अडकून आहेत. या केंद्रांना भेटी दिल्या असता मनपा व जिल्हा प्रशासनाचे कर्मचारी तैनात असल्याचे दिसून आले. मदतीऐवजी घराकडे कधी पोहोचवणार, याचीच सर्वांना आतुरता लागल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली.

क्वारंटाईन पूर्ण झालेल्यांना प्रमाणपत्राची प्रतीक्षा
लॉकडाऊन कालावधीत बाहेरून आलेल्या व्यक्ती जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार क्वारंटाईन झाले. अनेकांचा क्वारंटाईन पूर्ण झाला. पण, अद्याप प्रमाणपत्र न मिळाल्याने त्यांना घरातच अडकून राहावे लागत आहे.

सुविधा पुरविण्यास दमछाक
जिवती : परप्रांतात गेलेल्या तालुक्यातील मजुरांच्या परतीचा ओघ सुरूच असल्याने सुविधा पुरविण्यास प्रशासनाची दमछाक होत आहे. त्यामुळे घरीच विलगीकरण करण्याचे आदेश तहसीलदार प्रशांत बेडसे पाटील यांनी ग्रामपंचायतींना दिले. तालुक्यातून १ हजार ९०० मजूर ऊस, मिरची तोडणी व कापूस वेचणीकरिता परराज्यात गेले होते. उन्हाची तीव्रता वाढली. सर्वांना सोयी-सुविधा पुरविणेही कठिण होत आहे. गृह विलगीकरणात असताना बाहेर फिरल्यास ग्रामपंचायत दोन हजारांचा दंड ठोठावणार आहे.

Web Title: Anxiety about home quarantine in a slum house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.