औद्योगिक शहर गडचांदूरला तालुका घोषित करा
By Admin | Updated: December 16, 2014 22:50 IST2014-12-16T22:50:38+5:302014-12-16T22:50:38+5:30
कोरपना तालुक्यातील गडचांदूर या शहराला औद्योगिक शहर म्हणून ओळख आहे. सद्यास्थितीत ३५ हजार लोकसंख्येचे शहर आहे. बहुतांश आर्थिक तसेत शासकीय व्यवहार येथेच होत असतानाही

औद्योगिक शहर गडचांदूरला तालुका घोषित करा
गडचांदूर : कोरपना तालुक्यातील गडचांदूर या शहराला औद्योगिक शहर म्हणून ओळख आहे. सद्यास्थितीत ३५ हजार लोकसंख्येचे शहर आहे. बहुतांश आर्थिक तसेत शासकीय व्यवहार येथेच होत असतानाही तालुका घोषित न केल्याने नागरिकांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे. आता या मागणीसाठी नागरिक विधानसभेवर धडकणार आहे.
राजुरा, कोरपना, जिवती या तीन तालुक्याचे केंद्रस्थळ व मोठी बाजारपेठ गडचांदूर येथे आहे. गडचांदूरला तहसीलचा दर्जा देवून प्रशासकीय कार्यालय सुरू करावे व इतर मागणीसाठी २१ डिसेंबर २०११ , २१ डिसेंबर २०१२ व १८ डिसेंबर २०१३ ला तालुका संघर्ष समितीतर्फे नागपूर अधिवेशनप्रसंगी मोर्चा काढला होता. मात्र काहीच उपयोग झाला नाही. त्यामुळे आता विधानसभेवर हिवाळी अधिवेशनप्रसंगी १९ डिसेंबरला मोर्चा तसेच धरणे आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधण्यात येणार आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील सिमेंट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचांदूर शहराला नुकताच नगर परिषदेचा दर्जा शासनाने दिला आहे. राजुरा- कोरपना- जिवती या तिन्ही तालुक्यापासून गडचांदूर शहर २५ किमी अंतरावर आहे. गडचांदूर हे मुख्य केंद्र व मोठी बाजारपेठ तसेच औद्योगिक दृष्टया गजबलेले शहर असल्याने शासनाला येथून मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. परिसरातून शासनाला प्रत्येक वर्षी सुमारे ५० कोटींचा महसूल मिळत असल्याची माहिती आहे.
गडचांदूर पोलीस स्टेशन अंतर्गत २४ ग्रामपंचायत असून ५२ गावांचा समावेश आहे. या सर्व गावातील नागरिकांना गडचांदूर हे शहर सोयीचे आहे. येथे सार्वजनिक बांधकाम विभागचे उपविभागीय कार्यालय विश्रामगृह, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, वीज वितरण कंपनीचे उपविभागीय कार्यालय, नगर परिषद, पोलीस स्टेशन, ग्राम न्यायालय नायब तहसीलदाराचे अस्थायी भेट कार्यालय असे अनेक शासकीय कार्यालये कार्यान्वित आहे . याशिवाय शाळा, महाविद्यालये, वसतिगृह आहे. परंतु शासनाने या शहराकडे दुर्लक्ष केले आहे. जिवती तालुक्यात दुय्यम निबंधक कार्यालय मंजूर केले आहे. छोट्या खोलीत कार्यालय सुरू आहे. राजुरा येथील दुय्यम निबंधकाकडे अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. गडचांदूर येथे खरेदी विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणात होत असल्याने दुय्यम निबंधक कार्यालय गडचांदूर येथे सुरू करण्याची मागणी होत असतानाही कार्यालय सुरू केले नाही. त्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.(वार्ताहर)