पवनीतील प्राचीन ठेवा दुर्लक्षित
By Admin | Updated: March 20, 2015 00:42 IST2015-03-20T00:42:20+5:302015-03-20T00:42:20+5:30
प्राचिन व ऐतिहासीक गाव अशी ओळख असलेल्या पवनी नगरात व अवतीभवती अनेक प्राचिन वारसा लाभलेले स्थळ आहेत.

पवनीतील प्राचीन ठेवा दुर्लक्षित
अशोक पारधी पवनी
प्राचिन व ऐतिहासीक गाव अशी ओळख असलेल्या पवनी नगरात व अवतीभवती अनेक प्राचिन वारसा लाभलेले स्थळ आहेत. त्यापैकी परकोट व टेकड्यांना भारतीय पुरातत्व विभागाने संरक्षीत केलेले आहे. परंतु दिवाणघाट हे वैनगंगा नदीवरील नगराच्या उत्तरेला असलेले वैभव संपन्न घाट राज्य शासनाच्या व पालिका प्रशानाच्या दुर्लक्षामुळे नामशेष होण्याचे मार्गावर आहे. प्रशासनाने वेळीच लक्ष घालून डागडुजी केली नाही तर ते घाट इतिहास जमा होईल, असे चित्र दिसत आहे.
वैनगंगा नदीकिनाऱ्यावर मस्तानशाँ दरगाह, हत्तीगोटा, निलकंठेश्वर मंदीर, दिवाणघाट, पाणखिडकी, ताराबाईचा घाट व वैजेश्वर घाट असे महत्वाचे पर्यटन स्थळ आहेत.
भंडाऱ्याकडून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांचे लक्ष त्याकडे वेधले जाते. परंतू आतापर्यंत वैजेश्वरघाट व मंदीर सोडले तर उर्वरित स्थळांकडे लोकप्रतिनिधी व स्थानिक प्रशासनाचे लक्ष गेलेले नाही. पर्यटनासाठी आलेला निधी व आमदार खासदारांचा स्थानिक विकास निधी खर्च करण्यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधींनी वैजेश्वर मंदीर व घाट निवडलेले आहे. परंतु ढासळत चाललेल्या दिवाण घाटाकडे कोणाचेही लक्ष गेलेले नाही. लोकसंख्या व विधानसभा निवडणुकीपूर्वी दिवाणघाटाचे पुर्नबांधणीसाठी पर्यटन विकासांतर्गत फार मोठ्या निधीची तरतुद करण्यात आल्याचे तत्कालीन लोकप्रतिनिधी सांगत होते. परंतू मार्च अखेरपर्यंत कोणताही निधी प्रशासनाकडे पोहोचलेला नाही.
दिवाणघाटावर महिला व पुरूष वेगवेगट्या घाटांवर उतरून स्नान करू शकतील, अशी रचना करण्यात आलेली होती. २५ वर्षापूर्वी ते शक्य होत होते. परंतू गत २०-२५ वर्षात दिवाण घाटाचे बांधकाम ढासळू लागले आहे. एक एक घाट निकामी होत आहे. परंतू प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.
पर्यटन विकासांतर्गत निधीची तरतूद करून दिवाण घाटाची पुननिर्मिती करावी, अशी पवनीकर जनतेची मागणी आहे.