आंबेडकरी अनुयायी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले

By Admin | Updated: September 8, 2015 00:45 IST2015-09-08T00:45:47+5:302015-09-08T00:45:47+5:30

१ आॅगस्ट रोजी रात्री १० वाजता तथागत बुध्द विहारात वर्षावास करणाऱ्या भिक्खू आर्यसुत यांच्यावर काही समाजकंटकांनी भ्याड हल्ला केला.

Ambedkary follower took over the Collector's office | आंबेडकरी अनुयायी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले

आंबेडकरी अनुयायी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले

भिक्खूंना मारहाणीचा निषेध : ‘त्या’ समाजकंटकांना तडीपार करण्याची मागणी
चंद्रपूर : ३१ आॅगस्ट रोजी रात्री १० वाजता तथागत बुध्द विहारात वर्षावास करणाऱ्या भिक्खू आर्यसुत यांच्यावर काही समाजकंटकांनी भ्याड हल्ला केला. भंतेंना विहाराचे दार बंद करून मारहाण केली. या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी पाठिशी घालू नये, त्यांना जिल्ह्यातून तडीपार करण्यात यावे, या मागणीसाठी अखिल भारतीय भिक्खू संघाच्या नेतृत्वात आंबेडकर अनुयायांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर शिस्तबद्ध मोर्चा काढला.
चोर खिडकी परिसरात तथागत बौध्द विहारात काही समाजकंटक गांजा-चरस ओढून विहाराचे पावित्र नष्ट करीत होते. भिक्खू आर्यसुत यांनी हटकले असता त्यांनाच मारहाण करण्यात आली. या प्रकरणाचा अखिल भारतीय भिक्खू संघाने निषेध केला असून त्यांच्या नेतृत्वात हजारो आंबेडकरी अनुयायांनी आज सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. दुपारी १२ वाजतापासून येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ शहरातील विविध वॉर्डातून आंबेडकर अनुयायी जमा होऊ लागले. दुपारी १ वाजताच्या सुमारास आंबेडकर पुतळ्याजवळून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. छोटाबाजार चौकातून महात्मा गांधी मार्गाने हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. तिथे मोर्चाचे रुपांतर जाहीर सभेत झाले.
यावेळी सभेला मार्गदर्शन करताना अखिल भारतीय भिक्खू संघाचे अध्यक्ष भदंत सदानंद महाथेरो म्हणाले, भिक्खूगण बुध्दपुत्र या नात्याने शांतताप्रिय, सरलमार्गी आहेत. त्यामुळेच बौध्दजण त्यांना धर्मगुरु मानून वंदन करतात. परंतु या ठिकाणी धर्मगुरुवरच हल्ला झाल्यामुळे बौध्द बंधूभगिनींच्या भावना दुखावल्या आहेत. बौध्दांसहीत समस्त अल्पसंख्यांक जनतेत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. समाजकंटक मुळातच गुन्हेगार प्रवृत्तीचे असल्याने मुलींची छेड काढणे, विनयभंग करणे, चोऱ्या करणे, व्यसनाधीन होऊन उत्पात माजविणे असे गुन्हे केले आहे. त्यामुळे त्यांना जिल्ह्यातून तडीपार करण्यात यावे, असेही ते म्हणाले.याप्रसंगी अखिल भारतीय भिक्खू संघाचे संघटक भदंत कृपाशरण महाथेरो, भदंत धम्मसेवक महाथेरो यांनीही मार्गदर्शन केले. तत्पूर्वी संघाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. निवेदन देताना भदंत सदानंद महाथेरो, भदंत कृपाशरण महाथेरो, भदंत डॉ. धम्मसेवक महाथेरो, भिक्खू विनय बोधीप्रिय थेरो, भिक्खू सुमनपाल थेरो, भिक्खू धम्मघोष, भिक्खू शांतीदेव, भिक्खू विनयकिर्ती, भिक्खू प्रज्ञानंद थेरो, भिक्खू संघवर्धन, भिक्खू आर्यसुत आदी उपस्थित होते. भंतेंना मारहाण करणाऱ्या आरोपींची सध्या जामिनावर सुटका झाली आहे. मात्र ते गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून त्यांचे वास्तव्य घटनास्थळाजवळ असल्याने ते पुनश्च दहशत माजवू शकतात. त्यामुळे पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली. (शहर प्रतिनिधी)

मोर्चातील शिस्त वाखाणण्यासारखी
अखिल भारतीय भिक्खू संघाच्या वतीने काढण्यात आलेला मोर्चा अतिशय शांततेत व शिस्तीत निघाला. जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचेपर्यंत आंबेडकर अनुयायांची शिस्त कायम होती. वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये, याची खबरदारी घेत हा मोर्चा रांगेने पुढे जात होता. तरीही मोर्चाला बाधा निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी काही ठिकाणी वाहतूक अडवून ठेवली होती. या संपूर्ण मोर्चात पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता.

Web Title: Ambedkary follower took over the Collector's office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.