स्वच्छतेसोबतच कचऱ्याचीही विल्हेवाट लावावी
By Admin | Updated: December 20, 2014 22:36 IST2014-12-20T22:36:49+5:302014-12-20T22:36:49+5:30
ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपरिषदेमध्ये झाल्यानंतर गडचांदूर नगरपरिषदेची प्रथमच निवडणूक होऊ घातली आहे. त्यामुळे निवडून येणाऱ्या नगरसेवकांकडून गडचांदूर शहरवासीयांच्या अपेक्षाही उंचावणे सहाजिक आहेत.

स्वच्छतेसोबतच कचऱ्याचीही विल्हेवाट लावावी
आशिष देरकर - गडचांदूर
ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपरिषदेमध्ये झाल्यानंतर गडचांदूर नगरपरिषदेची प्रथमच निवडणूक होऊ घातली आहे. त्यामुळे निवडून येणाऱ्या नगरसेवकांकडून गडचांदूर शहरवासीयांच्या अपेक्षाही उंचावणे सहाजिक आहेत. उमेदवारांना निवडून येण्याचे तर लोकांना विकासकामांचे डोहाळे लागले आहेत. नगरपालिकेने स्वच्छतेसोबतच कचऱ्याची विल्हेवाट लावावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
वाढत्या लोकसंख्येनुसार गडचांदुरात अनेक समस्या आ वासून उभ्या आहेत. गडचांदुरात नगरपरिषदेचे सफाई कामगार स्वच्छता अभियान जरी राबवित असले तरी नियोजनाअभावी कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात नगरपालिकेला मोठे अपयश येत आहे. त्यामुळे त्याचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर तर होतच आहे, सोबतच पाळीव प्राणी, जनावरे मोठ्या प्रमाणात त्याचे सेवन करीत आहे. त्यामुळे जनावराचेही आरोग्य धोक्यात आले आहे.
गडचांदूर-कोरपना, गडचांदूर-लखमापूर व गडचांदूर-राजुरा या मुख्य रस्त्यांच्या कडेला शहरालगत मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढिगारे टाकण्यात येतात. ‘आतून स्वच्छ, बाहेर गलिच्छ’ असे दर्शन बाहेरून येणाऱ्या प्रवाशांना नक्कीच होते. नगर परिषदेने उचललेला कचरा रोज पहाटे ट्रॅक्टरच्या माध्यमातून मुख्य रस्त्यांवर टाकण्यात येतो. गडचांदूर हे तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे येथे मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे दिवसेंदिवस वाढणाऱ्या लोकसंख्येबरोबरच कचऱ्याच्या प्रमाणातही फार वाढ होत आहे. घनकचरा प्रकल्पाच्या माध्यमातून कचऱ्याची विल्हेवाट लावल्यास ‘स्वच्छ गडचांदूर, सुंदर गडचांदूर’ हे स्वप्न नक्कीच साकार होईल. मात्र त्यासाठी नगरसेवकांच्या इच्छाशक्तीची गरज राहणार आहे.
सडलेला भाजीपाला व केरकचरा रोज रस्त्यावर टाकण्यात येतात. यावर नगर परिषदेने कसलेही निर्बंध आणलेले नाही.
तसेच झोपडपट्टी भागातील कचरा नियमित उचलल्या जात नसल्याची ओरड आहे. झोपडपट्याही नगरपरिषदेचा भाग असल्यामुळे तेथील स्वच्छतेकडे लक्ष पुरविण्याची मागणी गडचांदुरातील झोपडपट्टीवासीयांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)