खचलेल्या बळीराजाची पुन्हा जुळवाजुळव कर्जाचे ओझे डोक्यावरच
By Admin | Updated: May 9, 2014 02:47 IST2014-05-08T23:37:58+5:302014-05-09T02:47:32+5:30
मागील दोन्ही हंगाम शेतकऱ्यांना मारक ठरले. खरीपाने तर शेतकऱ्यांना कर्जाशिवाय काहीच दिले नाही. रब्बीनेही काही प्रमाणात मिळणारा आधार हिरावला. वरूणराजाची अवकृपा याला कारणीभूत ठरली.

खचलेल्या बळीराजाची पुन्हा जुळवाजुळव कर्जाचे ओझे डोक्यावरच
खरीप हंगाम आला तोंडावर
रवी जवळे - चंद्रपूर
मागील दोन्ही हंगाम शेतकर्यांना मारक ठरले. खरीपाने तर शेतकर्यांना कर्जाशिवाय काहीच दिले नाही. रब्बीनेही काही प्रमाणात मिळणारा आधार हिरावला. वरूणराजाची अवकृपा याला कारणीभूत ठरली. कर्जाचे ओझे अजूनही शेतकर्यांच्या डोक्यावर आहे. लग्नसराईत पुन्हा कंबरडे मोडत आहे. अशातच खरीप हंगाम तोंडावर आला आहे. एवढ्या कमी वेळात कुटुंबाचे सावरत खरीपाची तयारी कशी करायची, या विवंचनेत शेतकरी पडला आहे. तरीही त्याची जुळवाजुळव सुरू झाली आहे. वरूणराजाने मागील वर्षी संपूर्ण विदर्भातच आपली अवकृपा दाखविली. त्याच्या आदल्यावर्षीही विविध रोगांच्या प्रादुर्भावाने शेतकर्यांचे खरीपात नुकसान झाले होते. तरीही मागील वर्षी मोठ्या उत्साहात शेतकर्यांनी पेरणी केली. जिल्ह्यात चार लाख ५८ हजार हेक्टरवर खरीप पिकांची लागवड करण्यात आली होती. यात एक लाख ४४ हजार हेक्टरवर सोयाबीन, एक लाख ३ हजार हेक्टरवर कापूस तर एक लाख ६६ हजार हेक्टर क्षेत्रात भात पिकांचा समावेश होता. प्रारंभी अगदी वेळेवर पाऊस झाला. त्यामुळे शेतकर्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र त्यानंतर वरूणराजाची वक्रदृष्टी पडली. जुलै आणि आॅगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकर्यांना खरीप हंगाम जगवायला संधीच दिली नाही. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात काही ठिकाणी चारवेळा पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे जिल्ह्यातील सुमारे २ लाख १६ हजार ४५० हेक्टर शेतीवरील पिके नष्ट झाली होती. १८ व्यक्तींचा जिल्ह्यात मृत्यू झाला होता. तर, ७ हजार ७०० घरांची पडझड झाली होती. मृताच्या कुटुंबियांना व घरांची पडझड झालेल्यांना शासनाने लवकरच मदत देऊ केली. मात्र कृषी विभागाकडे मनुष्यबळ कमी असल्याचे सांगत शेतकर्यांना मदतीची प्रतीक्षाच करावी लागली. शासनाची मदत रब्बी हंगामातही कामात येऊ शकली नाही. अतिवृष्टीत जिल्ह्यातील अनेक शेतजमीन पार खरडून गेली होती तर ४६६ हेक्टरवरील पिके वाहून गेल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली होती. शेतीचे सर्वाधिक नुकसान वरोरा तालुक्यात झाले. शेतीच्या नुकसानीचे हे आकडे प्राथमिक होते. प्रत्यक्षात शेतकर्यांचे याहून अधिक नुकसान झाले होते. विलंबाने का होईना, पण शेतकर्यांना नुकसान भरपाई देण्यात आली. मात्र यातही अनेक शेतकरी या भरपाईपासून वंचितच राहिले. काही भागात कृषी विभागाने व्यवस्थित सर्वेक्षणच केले नाही. त्यामुळे नुकसानीचा आकडा शासनापर्यंत पोहचू शकला नाही. मागील वर्षीचेच कर्ज शेतकर्यांच्या डोक्यावर आहे. रबी हंगामातही कर्ज काढूनच शेतकर्यांनी पिकांची लागवड केली. यावेळीही शेतकर्यांना अकाली पावसाचा सामना करावा लागला. रबी कर्जात बुडालेल्या शेतकर्यांना आधार देईल, असे वाटत होते. मात्र हरभरा व गव्हाचे नुकसान मोठे नुकसान झाले. आता पुन्हा नव्या उमेदीने बळीराजा शेतीकडे सरसावला आहे. मात्र हातात दमडीही नसल्याने पिकांची लागवड कशी करायची, हा प्रश्न शेतकर्यांना सतावत आहे. सध्या लग्नसराई सुरू आहे. यात पुन्हा शेतकर्यांचे कंबरडे मोडत आहे. ज्या शेतकर्यांनी मार्च अखेरपर्यंत कर्जाची परतफेड केली. त्यांना बँकेकडून पुन्हा कर्ज उचलता येऊ शकते. मात्र अनेक शेतकरी मार्चअखेरपर्यंत कर्जाची परतफेड करू शकले नाही. त्यांना बँकेकडून कर्ज मिळणार नाही. त्यामुळे शेतकरी मोठ्या विवंचनेत सापडले आहेत. तरीही खरीपात स्वस्थ बसता येणार नसल्याने शेतकर्यांची आर्थिक जुळवाजुळव सुरू झाली आहे. सध्या शेतकरी याच प्रक्रियेत व्यस्त झाल्याचे दिसून येत आहे. याशिवाय शेतातही काही ठिकाणी जमीन वखरण्याची कामे सुरू झाली आहेत. शेतखत शेतात टाकणे. पडित जमिनीवरचे झुडुपे काढणे सुरू आहे.