वडिलांच्या मृत्यूनंतर तिने घेतली माहेरच्या कुटुंबाची जबाबदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:34 IST2021-02-05T07:34:38+5:302021-02-05T07:34:38+5:30
ब्रह्मपुरी शहरातील बाजार चौक धोबी मोहल्ला येथील एकनाथ मेश्राम हे आरमोरी रोडवरील अलोने इंजिनिअरिंग वर्कशॉपच्या बाजूला कपडे इस्त्री करण्याचा ...

वडिलांच्या मृत्यूनंतर तिने घेतली माहेरच्या कुटुंबाची जबाबदारी
ब्रह्मपुरी शहरातील बाजार चौक धोबी मोहल्ला येथील एकनाथ मेश्राम हे आरमोरी रोडवरील अलोने इंजिनिअरिंग वर्कशॉपच्या बाजूला कपडे इस्त्री करण्याचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे. सारेकाही सुरळीत सुरू असताना कोरोनाने एकनाथ मेश्राम यांचा बळी घेतला. यामुळे मेश्राम कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. एकनाथ मेश्राम यांच्या पश्चात पत्नी आणि तीन मुली असा परिवार असून मोठी मुलगी माधुरीचे लग्न झाले आहे. तर दोन मुलींचे शिक्षण सुरू आहे.
कुटुंबाचा गाडा कसा हाकायचा, वडिलांचा व्यवसाय कोण सांभाळणार, असे अनेक प्रश्न एकनाथच्या कुटुंबीयांसमोर निर्माण झाले. मोठी मुलगी माधुरी वडिलांना व्यवसायात हातभार लावायची. ती लग्न होऊन सासरी गेल्याने आता हे शक्य नव्हते. मात्र आई व बहिणींसाठी माधुरी गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथून आपल्या दोन चिमुकल्या मुलींना सोबत घेऊन माहेरी आली. इतकेच नव्हे, तर तिने वडिलांचा व्यवसाय नव्याने सुरू केला. माधुरी दिवसभरात सुमारे ५० कपडे इस्त्री करून दिवसाकाठी ३०० रुपये रोजी कमावत आहे.