युतीपाठोपाठ आघाडीही फिस्कटली
By Admin | Updated: February 1, 2017 00:27 IST2017-02-01T00:27:10+5:302017-02-01T00:27:10+5:30
जिल्ह्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आघाडी होईल, असे वातावरण असतानाच युतीपाठोपाठ आघाडीही फिस्कटली आहे.

युतीपाठोपाठ आघाडीही फिस्कटली
स्वबळाचा गजर : आज सर्वांचे उमेदवार कळणार, नामांकन दाखल करण्याचा आज अंतिम दिवस
चंद्रपूर : जिल्ह्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आघाडी होईल, असे वातावरण असतानाच युतीपाठोपाठ आघाडीही फिस्कटली आहे. त्यामुळे सर्वच पक्ष स्वबळावर लढणार असून तशी तयारीही सुरू झाली आहे.
शिवसेना आमदार बाळू धानोरकर यांनी पाऊण महिन्यांपूर्वी पत्रकार परिषद घेवून आपली स्वबळाची भूमिका जाहीर केली होती. नंतरच्या घटनाक्रमात मुंबई आणि ठाणे येथील महानगर पालिकांसंदर्भातील वरिष्ठ पातळीवरील बोलणी फिस्कटल्याने युती तुटली. या निर्णयाचा ढोल-ताशे वाजवून शिवसेनेने केलेल्या स्वागतामुळे भाजपाच्या गोटात कमालीची अस्वस्थता पसरली आहे. त्यामुळेच उमेदवार निश्चित होऊनही काँग्रेससह शिवसेनेवर मात करण्यासाठी भाजपाचे उमेदवार जाहीर होण्यास विलंब् ा होत आहे. असे असले तरी, तयारीला लागण्याचे आदेश मिळालेले उमेदवार आपआपल्या क्षेत्रात जावून कामाला लागल्याने राजकीय हवा तयार झाली आहे.
या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन आघाडीने लढतील ,असा कार्यकर्त्यांचा अंदाज आणि अपेक्षा होती. त्या दृष्टीने जिल्ह्यातील उभयपक्षातील नेत्यांनी एकत्र येवून बोलणी केली होती. मुंबईला या विषयावर दोनदा चर्चेच्या फेऱ्याही झाल्या होत्या. मात्र अखेर राजुरा आणि ब्रह्मपुरी तालुक्यातील केवळ दोन जागांवरील वादामुळे आघाडीतही बिघाडी निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आज चंद्रपुरात बैठक घेवून उमेदवारांसाठी एबी फॉर्म वाटप केले. जिल्हा परिषदेसोबच पंचायत समितीसाठी उमेदवारांची निश्चिती मंगळवारी सायंकाळी अखेरच्या टप्प्यात होती. दरम्यान, उद्या बुधवारी सर्वच पक्षांच्या उमेदवारांची यादी मतदारांसमोर येणार आहे. उद्या नामनिर्देशनपत्र भरण्यासाठीही गर्दी उसळण्याची शक्यता आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
एकमत झाले असते तर दोघांनाही फायदा -नरेश पुगलिया
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार नरेश पुगलिया यांची या संदर्भात प्रतिक्रिया जाणून घेतली असता ते म्हणाले, आघाडीच्या निर्णयावर एकमत झाले असते तर दोघांचाही फायदाच होता. आघाडी व्हावी अशी आपली इच्छा होती. मात्र काही कारणास्तव होऊ शकली नाही. दोन्ही बाजुंकडून आघाडीबाबत एकमत झाले असते तर बरे झाले असते.
आघाडी तुटणे दुर्दैवी -देवतळे
या संदर्भात ‘लोकमत’शी बोलताना जिल्हा ग्रामीण काँगे्रस कमेटीचे अध्यक्ष प्रकाश देवतळे म्हणाले, आघाडी तुटण्याचा निर्णय दुर्दैवी आहे. आम्ही १२ जागा देऊ केल्या होत्या. तर, ते १४ जागांवर ठाम होते. त्यावर तडजोड होऊ शकली नाही. आघाडी झाली असती तर दोघांनाही त्याचा फायदाच झाला असता.
स्वबळाचा निर्णय २५ जानेवारीलाच -गड्डमवार
या संदर्भात ‘लोकमत’शी बोलताना राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संदीप गड्डमवार म्हणाले, आघाडी तुटल्याचे २५ जानेवारीच्या सायंकाळीच जवळपास स्पष्ट झाले होते. मुंबईतील बैठकीत आम्ही काँग्रसकडे २२ जागांसाठी नावे दिली होती. त्यापैकी १३ नावे निश्चितही झाली होती. केवळ ३-४ जागांसाठी ओढाताण सुरू होती. राजुरा आणि ब्रह्मपुरी तालुक्यातील या दोन जागांवरून बरीच ओढाताण झाली. आम्ही या दोन ठिकाणी मैत्रीपूर्ण लढण्याचा आणि अन्य सर्व ठिकाणी आघाडी करण्याचाही प्रस्ताव काँग्रेसच्या नेत्यांना दिला. मात्र ते ऐकण्याच्या मनस्थितीन नसल्याने आघाडी तुटली आहे. स्वबळवार लढण्याचा निर्णय झाल्यामुळे आता आघाडीचा प्रश्नच उरला नसल्याचे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले, काँग्रेसची आधीपासूनच आघाडीची मानसिकता नव्हती. केवळ या मुद्यावरून त्यांनी वेळकाढू धोरण अवलंबले. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी सर्व ठिकाणी एबी फॉर्मही वाटले आहेत. त्याचा अर्थ स्पष्ट असल्याचे ते म्हणाले. जिल्ह्यात सर्व ठिकाणच्या जागांवर आपल्या पक्षाचे उमेदवार उभे राहणार असून सायंकाळपर्यंत ५० पेक्षा अधिक ठिकाणचे एबी फॉर्म वितरित झाल्याचीही माहिती त्यांनी दिली.