अखेर रसायनयुक्त पाणी झाले बंद
By Admin | Updated: November 17, 2015 01:58 IST2015-11-17T01:58:10+5:302015-11-17T01:58:10+5:30
शुक्रवारी बल्लारपूर पेपर मिलमधून रसायनयुक्त पाणी वर्धा नदीत सोडल्यामुळे नदी काळवंडली व नदीतील शेकडो मासे

अखेर रसायनयुक्त पाणी झाले बंद
सास्ती : शुक्रवारी बल्लारपूर पेपर मिलमधून रसायनयुक्त पाणी वर्धा नदीत सोडल्यामुळे नदी काळवंडली व नदीतील शेकडो मासे व जलचर प्राणी मृत्युच्या छायेत असल्याबाबतचे वृत्त लोकमतमध्ये प्रकाशित होताच, प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली. प्रदूषण नियंत्रण मंडळाने चौकशी सुरू केली असून सदर घटनेची पोलीस ठाण्यातही तक्रार दाखल झाली असून पोलीस यंत्रणाही चौकशीला लागली असल्याने नेमकी काय कारवाई होईल, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
प्राप्त माहितीनुसार १३ नोव्हेंबर रोजी बल्लारपूर पेपर मिलमधील रसायनयुक्त पाणी वर्धा नदीत सोडल्या गेल्यामुळे नदी काळवंडली. रसायनयुक्त पाण्यामुळे नदीतील शेकडो मासोळ्यांचा मृत्यू झाला तर नदीतील जलचर प्राणी मृत्युच्या छायेत आहे. या पाण्यामुळे परिसरातील पशुधनही धोक्यात आले आहे तर सदर पाणी शेतीला दिल्यामुळे शेतीचेही नुकसान होत आहे. वर्धा नदीवरुन अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचाही पुरवठा होत असल्यामुळे मानवजातीलाही धोका निर्माण झाला.
या संदर्भात लोकमतमध्ये वृत्त प्रकाशित होताच प्रशासकीय यंत्रणा सरसावली असून प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने चौकशी सुरु केली आहे. तर पोलीसातही तक्रार झाली असन तपास सुरू आहे तर यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडेही तक्रार केली गेली असून यावेळी बल्लारपूर पेपर मिल व्यवस्थापनावर नेमकी कोणती कारवाई होते याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)
पेपर मिल व्यवस्थापनानेही घेतली दखल
पेपर मिलच्या ईपी प्लांटमध्ये बिघाड आल्याने दुरुस्तीचे काम सुरू केले होते. त्या दरम्यान रसायनयुक्त पाणी नदीत सोडल्या गेले त्यामुळे अशी घटना घडली. परंतू लोकमतमध्ये वृत्त प्रकाशित होताच पेपर मिल व्यवस्सथापनाने दखल घेत सदर प्लांट दुरुस्तीचे काम तातडीने सुरू केले. मोठ्या प्रमाणात कामगार वापरून सदर काम पूर्ण केले असून सध्या ईपी प्लांट दुरुस्त झाल्याने रसायनयुक्त पाणी नदीत येणे बंद झाले आहे. आणखी काही दिवस हे काम सुरू असते तर मात्र मोठी हाणी झाली असती. व्यवस्थापनाने याकडे गांभीर्याने लक्ष देवून अशा घटना टाळाव्यात अशी मागणी जनतेतून होत आहे.
पोलिसात तक्रार दाखल
वर्धा नदीत रसायनयुक्त पाणी सोडल्या गेल्यामुळे होणाऱ्या दुष्परीणामाकडे बघता बल्लारपूरचे माजी नगरसेवक तथा भाजयुमोर्चा चे माजी जिल्हा सरचिटणीस निलेश खरबडे यांनी बल्लारपूर पेपर मिल व्यवस्थापनाविरोधात बल्लारपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली असून बल्लारपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिळसकर यांनी चौकशी सुरू केली आहे.