चंद्रपूर : कृषी पंपधारकांचे करोडो रुपयाचे वीज बिल थकीत होते. शेतकऱ्यांना थकीत वीज बिल भरता यावे, यासाठी शासनाने यावर्षी कृषी संजीवनी योजना सुरु केली. मात्र, शेकडो कृषी पंपधारकांकडे वीज बील थकीत आहे. उद्या ३१ आॅक्टोबरला या योजनेची मुदत संपणार असून मुदतीनंतर थकबाकीदार असणाऱ्या कृषीपंपधारकांवर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे कृषीपंपधारकांनी थकबाकीमुक्त होण्याचे आवाहन वीज वितरणने केले आहे.१ मार्च २०१४ पर्यंतच्या एकूण थकबाकीपैकी ५० टक्के मुळ मुदल व त्यापुढील सर्व चालू वीज बील भरुन कृषी संजीवनी योजनेत सहभागी होता येणार होते. नियमाप्रमाणे ५० टक्के मुळ मुदल रक्कम व त्यापुढील सर्व चालू वीज बील भरल्यास थकबाकीदार शेतकऱ्यांना त्याच्या थकबाकीतील १०० टक्के व्याज व विलंब आकाराची रक्कम माफ होणार आहे. कृषी संजीवनी योजनेचा नागपूर परिमंडळातील १४ हजार ६६८ शेतकऱ्यांना लाभ झाला. त्यांनी थकीत वीज बिलाच्या स्वरुपात सप्टेंबर महिन्यापर्यंत ४ कोटी १० लाख रुपये भरले. मात्र, आजही अनेक कृषी पंपधारकांकडे वीज बील थकीत आहे. कृषी संजीवनी योजनेत ३१ आॅगस्टपर्यंत ज्या थकीतदारांनी वीज बिलाचा भरणा केला, अशा ग्राहकांचे अर्धे बिल माफ करण्यात आले. तर ज्याना अर्धे वीज बिल एकाच वेळी भरणे शक्य झाले नाही, त्यासाठी तीन हप्त्यात बिल भरण्याची सुविधा देण्यात आली. मात्र, ३१ आॅक्टोबरला या योजनेची मुदत संपणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
थकबाकीदार कृषीपंपधारकांवर कारवाई होणार
By admin | Updated: October 30, 2014 22:48 IST