जड वाहतुकीवर आता कारवाई

By Admin | Updated: August 9, 2015 01:09 IST2015-08-09T01:09:57+5:302015-08-09T01:09:57+5:30

जिल्ह्यातील रस्त्यावरून होत असलेल्या जडवाहतुकीमुळे रस्त्यांची दुर्दशा होत असून जडवाहतुकीवर सक्तीची कारवाई करा, ...

Action on heavy transport now | जड वाहतुकीवर आता कारवाई

जड वाहतुकीवर आता कारवाई

विभागीय आयुक्तांचे परिवहन अधिकाऱ्यांना निर्देश : जड वाहतुकीमुळे रस्ते खराब होत असल्याचा ठपका
चंद्रपूर : जिल्ह्यातील रस्त्यावरून होत असलेल्या जडवाहतुकीमुळे रस्त्यांची दुर्दशा होत असून जडवाहतुकीवर सक्तीची कारवाई करा, असे निर्देशच नागपूर विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी शुक्रवारच्या चंद्रपूर येथील बैठकीत जिल्हाधिकारी, पोलीस विभागासह परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिलेत. शहरात काही दिवसांपूर्वी जडवाहतुकीवर नियंत्रण मिळविता यावे आणि जडवाहतूकदारांकडून अतिरिक्त महसूल गोळा करता यावा, यासाठी वजनकाटे लावण्याचे काम हाती घेण्यात आले. मात्र राजकीय दबावानंतर वजनकाटे लावण्यात आले नव्हते. परंतु विभागीय अधिकाऱ्यांनी चंद्रपुरातील रस्त्यांची स्थिती लक्षात घेता शहरातही वजनकाटे लावण्याचे निर्देश मनपा आयुक्तांना दिले आहेत. परिणामी शहरात आता वजनकाटे लावण्यात येणार आहे.
शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात जडवाहूक आणि रस्त्यांची दुरवस्था याचा आढावा घेण्यात आला. यावेळी त्यांनी जडवाहतुकीच्या मुद्यावर परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले तर सिमेंट कंपन्या, वेकोलिच्या अधिकाऱ्यांनाही जडवाहतूक स्वीकारू नका आणि करूनही नका, असा सल्ला देतानाच वाहतूक नियमांचे पालन न केल्यास कटोर कारवाईला तयार रहा, असा इशारा दिला आहे.
बैठकीला परिवहन आयुक्त सोनिया सेठी, जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, पोलीस अधीक्षक संदीप दिवाण, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, अप्पर जिल्हाधिकारी संजय धिवरे, प्रादेशिक परिवहन अधिकारी शरद जिचकार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय दैने, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे आदींसह सिमेंट कंपन्यांचे अधिकारी, वेकोलि, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारीही उपस्थित होते.
रस्त्याच्या दुरवस्थेला जडवाहतूक, पाण्याचा योग्य निचरा न होणे ही कारणे कारणीभूत आहेत. त्यामुळे जडवाहतुकीवर नियंत्रण आणण्यासोबतच रस्त्यावर पाण्याचा योग्य निचरा करण्यासाठी संबंधीत विभागाने प्रयत्न करावे, असे अनुपकुमार यांनी सांगितले.
चंद्रपूर आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ असून या ठिकाणी येणारे पर्यटक रस्त्याची दुरवस्था पाहून काय संदेश नेतील, याचा विचार करण्याची गरज आहे. कंपन्यांनी वाहतूक करणाऱ्या वाहनाला जीपीआरएस पद्धती बसवावी, असे त्यांनी सांगीतले. जडवाहतुकीवर कारवाई करण्याची महसूल व परिवहन विभागाची संयुक्त जबाबदारी असून येत्या काळात ही मोहीम परिणामकारकपणे राबविण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत. जडवाहतूक कायद्याने गुन्हा असल्याने अशा वाहनांवर सक्तीने कारवाई केल्या जाईल, यासाठी भरारी पथकांची संख्या वाढविल्या जाईल, असे परिवहन आयुक्त सोनिया सेठी यांनी सांगितले.
तिरवंजा-मोकासा, पद्मापूर-दुर्गापूर, राजुरा-लक्कडकोट, कोरपना-मूल, अजयपूर-चिरोली, आक्सापूर- चिंतलधाबा, पोंभूर्णा-गोंडपिपरी यासह एकूण १८ रस्ते जडवाहतुकीमुळे क्षतिग्रस्त झाल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी विभागीय आयुक्त अनुपकुमार यांना दिली. एप्रिल २०१४ ते मार्च २०१५ या कालावधीत ६६४ अतिभारीत जडवाहने तपासली असून ७२ लाख ५१ हजारांचे तडजोड शुल्क वसूल केल्याचे म्हैसेकर यांनी बैठकीत सांगितले. बैठकीला विविध विभागातील अधिकारी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Action on heavy transport now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.