रात्रीपर्यंत चालली नामांकनांची स्वीकृती

By Admin | Updated: July 21, 2015 00:57 IST2015-07-21T00:57:30+5:302015-07-21T00:57:30+5:30

जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकांसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याचा सोमवारी अखेरचा

Acceptance of nominations till night | रात्रीपर्यंत चालली नामांकनांची स्वीकृती

रात्रीपर्यंत चालली नामांकनांची स्वीकृती

चंद्रपूर : जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकांसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याचा सोमवारी अखेरचा दिवस होता. त्यामुळे प्रत्येक तालुकास्तरावर नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी तहसील कार्यालयात उमेदवारांची गर्दी उसळली होती. अखेरच्या दिवशी उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांचा शिगेला पोहचलेला उत्साह वाखाणण्याजोगा होता. नामांकनाची प्रक्रीया आॅनलाईन असल्याने रात्री उशिरापर्यंत नामांकन दाखल करण्याचे काम सुरू होते.
ग्रामपंचायतीच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकीचे मतदान ४ आॅगस्टला घेण्यात येत आहे. यासाठी नामांकन अर्ज दाखल करण्याचा सोमवारी अखेरचा दिवस होता.
पहिल्या टप्प्यात चंद्रपूर तालुक्यातील ४८ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठीचे नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी सोमवारी सकाळी १० वाजतापासूनच येथील तहसील कार्यालयात उमेदवार आपापल्या कार्यकत्यांसह पोहचत होते. दुपारनंतर गर्दीत भर पडली. आॅनलाईन उमेदवारी अर्ज दाखल करावे लागणार असल्याने याबाबत उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्सुकता होती.
वरोरा तालुका प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी येथील तहसील कार्यालयात दिवसभर उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. त्यांच्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांनी तहसील कार्यालयाचे आवार फुलून गेले होते.
चिमूर तालुक्यातील ९२ ग्रामपंचायतीपैकी ८२ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. सोमवारी नामांकन अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी चिमूर तहसील कार्यालयात महिला व पुरूषांचे जत्थेच्या जत्थे पोहचत होते. दुपारपर्यंत तहसील परिसरात गावपुढाऱ्यांचा मेळा भरला होता. निवडणूक आयोगाने प्रथमच ग्रामपंचायत निवडणुकीची प्रक्रीया आॅनलाईन पद्धतीने केल्याने नामांकन दाखल करताना उमेदवारांची चांगलीच तारांबळ उडत होती. दुपारी ३ वाजताच्या सुमारास इंटरनेटचे सर्व्हर डाऊन झाल्याने आपण निवडणूक लढविण्यापासून वंचित तर राहू नाही ना, या भीतीने उमेदवारांच्या मनात धडकी भरली. मात्र कालांतराने पुन्हा नामांकन दाखल करण्याच्या प्रक्रीयेला प्रारंभ झाला.
कोरपना येथे सोमवारी रात्री उशिरापर्यंत नामांकनाची प्रक्रीया सुरू होती. तालुक्यातील १७ ग्रामपंचायतीच्या निवडणुका तर पाच ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका होत आहेत. अखेरच्या दिवशी शेकडो उमेदवारांनी नामांकन दाखल करण्यासाठी येथील तहसील कार्यालयात मोठी गर्दी केली होती. उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह ओसंडून वाहत होता.
ब्रह्मपुरी येथील तालुका प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार, ग्रामपंचायत निवडणुकीकरिता उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या सोमवारी अखेरच्या दिवशी येथील राजीव गांधी भवन परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. ७० गावावरुन उमेदवार, त्यांचे समर्थक व राजकीय नेते कार्यकर्त्यांची झुंबड पाहून ब्रह्मपुरीत जत्रा असल्याचे चित्र निर्माण झाले होते. तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून उमेदवार व त्यांचे समर्थक मुख्यालयी दाखल झाले होते. त्यामुळे परिसर गर्दीने फुलून गेला होता. परिसरातील हॉटेल, चहाटपऱ्याच्या ठिकाणी पाय ठेवायला जागा नव्हती. उमेदवारी अर्ज आॅनलाईन भरुन सत्यप्रत संबंधीत विभागाकडे मुदतीच्या आत सादर करण्याच्या शेवटच्या दिवशी झुंबड निर्माण झाली होती. यात महिला उमेदवारांचाही समावेश होता.
भद्रावती येथील तालुका प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यात ५५ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत असून आज शेवटच्या दिवशी आॅनलाईन पद्धतीने एकूण १५५० अर्ज सादर झाले. सकाळी १० वाजतापासून अर्ज भरणाऱ्या उमेदवारांची व त्यांच्या समर्थकांची तहसील कार्यालयात गर्दी होऊ लागली.
बल्लारपूर येथील शहर प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील १७ पैकी १० ग्रामपंचायतीच्या निवडणुका ४ आॅगस्टला होणार असून एकूण ९० जागांसाठी तब्बल २६३ उमेदवारांनी नामांकन दाखल केले, यात विसापूर ग्रामपंचायतीच्या १७ जागांसाठी ६८ उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज दाखल करन तालुक्यात विक्रमच प्रस्थापित केला आहे.
नागभीड येथील तालुका प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार, येथील तहसील कार्यालयाच्या डागडुजीचे काम सुरू असल्याने नामांकन स्वीकारण्याची व्यवस्था पंचायत समितीच्या बचत भवनात करण्यात आली होती. उमेदवार व त्यांच्या समर्थकांच्या गर्दीने बचत भवन परिसर फुलून गेला होता.
राजुरा शहर प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी १० वाजतापासून येथील तहसील कार्यालय परिसरात नागरिकांची प्रचंड गर्दी होती. दुपारच्या सुमारास इंटरनेटचे सर्व्हर डाऊन झाल्याने उमेदवारांना चांगलाच मनस्ताप झाला.
गोंडपिपरी तालुका प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेण्यात येत आहे. तसेच सात ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका होत आहेत. नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी अखेरच्या दिवशी उमेदवारांची येथील तहसील कार्यालयात रिघ लागली होती. (लोकमत चमू)


दोन दिवसांच्या सुटीमुळे समस्या
ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारांना पहिल्यांदाच उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आॅनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. मात्र ग्रामीण भागातील उमेदवार संगणकीकृत अर्ज दाखल करण्यासाठी धावपळ करीत होते. अनेकांना यामुळे अर्ज दाखल करण्यासाठी अडचणीला सामोरे जावे लागले. संगणकीकृत अर्जासोबत दस्तावेज जोडणे आवश्यक असल्याने दुहेरी संकटाचा सामना ईच्छूक उमेदवारांना करावा लागला. शनिवार व रविवार सुटीचा दिवस असल्याने सोमवारी नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ग्रामीण भागातील उमेदवारांची प्रत्येक तालुकास्थळी गर्दी उसळली होती.

चहा-पान विक्रेत्यांची चांदी
सोमवारी नामांकन दाखल करण्यासाठी उमेदवार व त्यांच्या समर्थकांची प्रत्येक तालुकास्तरावरील तहसील कार्यालयात गर्दी झाली होती. त्यामुळे चहा-पान विक्रेत्यांचा व्यवसायही दिवसभर तेजीत होता. प्रत्येक चहा व पानटरीवर गर्दी होती. यातून या छोट्या व्यावसायिकांनी कमाई केली.

अर्जुनी येथील ग्रामस्थांचा बहिष्कार
वरोरा तालुक्यातील सात सदस्य असलेल्या अर्जुनी (तु.)ग्रामपंचायतीसाठी एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही. गावातील समस्या जोपर्यंत सोडविल्या जात नाहीत, तोपर्यंत निवडणुकीच्या प्रक्रीयेत भाग न घेण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे. गावकऱ्यांच्या या भूमिकेवर काय कार्यवाही होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ब्रह्मपुरी तालुक्यातील ७० ग्रामपंचायतीच्या निवडणुका, दोन ग्रामपंचायतीची पोटनिवडणूक
ब्रह्मपुरी : तालुक्यातील ७० ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका व २ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणूक होणार आहे. सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकुण जागा ५८८ असून पोटनिवडणुकीसाठी ४ जागांवर निवडणूक घेण्यात येत आहे. तालुक्यातील अऱ्हेरनवरगाव, पिंपळगाव (भो), नान्होरी, खेडमक्ता, अड्याळ (जाणी), वायगाव, बेटाळा, खरकाडा, गांगलवाडी, तळोधी (खुर्द), मेंडकी, हळदा, आवळगाव, एकारा आदी महत्त्वाच्या ग्रामपंचायीचा समावेश आहे. मराळमेंढा व फिटाडी येथे ४ जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. तर तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतीपैकी ७० ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक, २ ग्रामपंचायतीची पोटनिवडणूक व चिचखेडा, माहेर, काहाली या तीन ग्रामपंचायतीची निवडणूक नाही.

Web Title: Acceptance of nominations till night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.