प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे शेषनगर जलमय
By Admin | Updated: August 5, 2016 00:53 IST2016-08-05T00:53:15+5:302016-08-05T00:53:15+5:30
बारई तलावाचे ओव्हरफ्लो पाणी नालीद्वारे सोडले गेले. ते पाणी सदोष नाली व पुढे नालीची पाईपलाईन बुजल्याने शेषनगरात साचू लागले आहे.

प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे शेषनगर जलमय
बारई तलाव ओव्हर फ्लो: शेषनगरात व परिसरात पाणी
ब्रह्मपुरी: बारई तलावाचे ओव्हरफ्लो पाणी नालीद्वारे सोडले गेले. ते पाणी सदोष नाली व पुढे नालीची पाईपलाईन बुजल्याने शेषनगरात साचू लागले आहे. त्यामुळे तलावाचे पाणी नागरिकांच्या घरात शिरले आहे.
यापूर्वी लोकमत मध्ये ‘शेषनगर जलमय होणार’ असे वृत्त प्रकाशित केले होते, ते खरे ठरत आहे. शेषनगरला लागून असलेल्या बारई तलावाच्या पुलाचे रुंदीकरण करण्यात आले. शेषनगरच्या बाजूने मोठी नाली ओव्हरफ्लो पाण्यासाठी काढण्यात आली. परंतु ही नाली पाणी पुढे वाहून जाण्यास सदोष यंत्रणा असल्याने तलावाचे पाणी शेषनगरकडे धावले. तलावाचा ओव्हरफ्लो रोखल्यास पाळ फुटण्याची शक्यता होती. त्यामुळे ते पाणी आता शेषमंदिर, बावनकर व पुढे अनेक घरात व रस्त्यावर पसरलेले आहे. रात्रभर हे पाणी असेच वाहत राहीले तर अध्यापेक्षा जास्त शेषनगर जलमय होण्याची चिन्हे आहेत. हा प्रकार नागरिकांनी व लोकमतने लक्षात आणून दिला. पण त्यावर थातूरमातूर कार्यवाही करुन सोडण्यात आल्याने आज पुन्हा असा प्रसंग निर्माण झाला आहे. प्रत्यक्षदर्शीनी प्रशासनाला दोषी ठरविले आहे. प्रशासनाने पुढच्या नालीची योग्य सफाई केली नाही, बांधकाम विभागाने मुख्य नालीच्या पाईप लाईनवर व समोरच्या पाईप लाईनचे पाईप खाली असल्याने पाणी योग्य रीत्या वाहून जात नाही. त्यामुळे उतारानुसार शेषनगरकडे लहान नाल्यांच्या माध्यमातून पाणी उलटे वाढून घरामध्ये व रस्त्यावर जमा होत आहे. लोकमतच्या वृत्ताने पाळीचे साईडिंग भरणे व नालीचा मार्ग सुरु करुन काम केल्याचा बनावटपणा केल्या असला तरी आता मात्र शेषनगर जलमय होत असल्याने प्रशासनाने वेळीच दखल घेण्याची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)