काँग्रेसमध्ये एबीचा घोळ
By Admin | Updated: February 3, 2017 01:00 IST2017-02-03T01:00:25+5:302017-02-03T01:00:25+5:30
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवणुकीसाठी गुरूवारी छानणीची धांदल सुरू असताना काँग्रेसमध्ये मात्र वेगळीच धावपळ सुरू होती.

काँग्रेसमध्ये एबीचा घोळ
चंद्रपूर : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवणुकीसाठी गुरूवारी छानणीची धांदल सुरू असताना काँग्रेसमध्ये मात्र वेगळीच धावपळ सुरू होती. काँग्रेसमध्य आपल्याच पक्षातील उमेदवारांविरूद्ध एबी फार्म दिल्याच्या चर्चेने आणि त्यावरील आक्षेपामुळे काँग्रेसच्या घरातील भांडणाची चर्चा तहसिल कार्यालयात सुरू होती.
गुरूवारी छानणीदरम्यान नकोडा-मार्डा आणि मूल तालुक्यातील राजोली या तीन ठिकाणी काँग्रेसच्या दोन उमेदवारांकडे वेगवेगळे एबी फॉर्म असल्याची बाब उघडकीस आली. यावरून नक्की पक्षाचा अधिकृत उमेदवार कोण हे ठरविताना अधिकाऱ्यांची एकच धावपळ झाली. या घटनाक्रमानंतर संबंधित उमेदवारांनी आपल्या नेत्यांना ही बाब कळविली. त्यावर माजी खासदार नरेश पुगलिया यांनी मूलचे उपविभागीय अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे पत्र पाठवून प्रदेश काँग्रेस कमेटीकडून स्विकृत झालेल्या उमेदावारांची यादीही सोबत जोडली.
दरम्यान, या प्रकरणी काँग्रेसचे माजी खासदार नरेश पुगलिया यांनी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे तक्रार केली असून यासाठी आमदार विजय वडेट्टीवार आणि पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे हे जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डाने निर्णय घेऊन उमेदवार ठरविले असताना अशा पद्धतीने पक्षातील उमेदवाराविरोधातच एबी फॉर्म देणे हा प्रकार दुर्देवी असल्याचे त्यांनी या पत्रातून म्हटले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
रिगंणात १,०२७ उमेदवार
गुरूवारी झालेल्या छानणीनंतर आता रिंगणात एक हजार २७ उमेदवार उरले आहेत. यात पंचायत समितीच्या ११२ जागांसाठी ६२० तर, जिल्हा परिषदेच्या ५६ जागांसाठी ४०७ उमेदवार रिंगणात आहेत. जिल्हा परिषदेसाठी भरलेले २३ नामांकन गळाले तर, पंचायत समितीसाठी भरलेले ५८ नामांकन छानणीत गळाले. अनेक उमेदवारांनी दक्षता घेवून दोन नामांकन भरले होते. आज छानणीदरम्यान ते गळाले. असे असले तरी काही ठिकाणी धोका झालाच. जिल्हा न्यायाधिशांकडे अपिल करणञयाची तारीख ५ फेब्रुवारी असून नवमवानकन परत घेण्याचा अखेरचा दिवस ७ फेब्रुवारी आहे. त्यानंतरच रिंगणातील खरे चित्र स्पष्ट होणार आहे.
या संदर्भात आमदार विजय वडेट्टीवार यांच्याशी संपर्क साधला असता, पर्यायी व्यवस्था म्हणून तालुका अध्यक्षांकडे नाव लिहिलेले एबी फॉर्म दिले होते, असे ते म्हणाले. नकोडा-मार्डा येथील उमेदवाराकडे शौचालय नसल्याने नामांकन गळण्याची शक्यता होती. तर, राजोलीतील आमच्या पक्षाची उमेदवार भाजपाच्या संपर्कात असल्याने या दोन्ही जागा रिक्त राहण्याची शक्यता होती. तमुळे पक्षाचे नुकसान नको यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून तालुका अध्यक्षाकडे एबी फॉर्म देवून ठेवला होता, असे त्यांनी स्पष्ट केले.