चाचणी करणाऱ्यांमधून ९३ टक्के लोक निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 05:00 IST2020-09-06T05:00:00+5:302020-09-06T05:00:22+5:30
चंद्रपूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यातच आता कोरोना संसर्ग जोरदार वाढू लागला आहे. यात चिंतेची बाब अशी की हा संसर्ग संपर्कातून होत आहे. कोणत्याही प्रवासाची पार्श्वभूमी नसलेले व्यक्ती कोरोना बाधित म्हणून पुढे येत आहे. आॅगस्ट महिन्याच्या प्रारंभापासून कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे. कोरोनासोबतच जगताना अनेक नियमांचे पालन करणे सर्वांनाच बंधनकारक आहे. सामाजिक हितासाठी असे करणे सर्वांची जबाबदारी आहे.

चाचणी करणाऱ्यांमधून ९३ टक्के लोक निगेटिव्ह
रवी जवळे।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. प्रशासनाने चाचण्यांचाही वेग वाढविला आहे. मात्र चाचण्यांबाबत अनेकांच्या मनात संभ्रम आहे. कोरोना चाचणी केली तर पॉझिटिव्ह निघेल, या भीतीपोटी अनेकजण चाचणी करण्यास धजावत नसल्याचे दिसते. मात्र जिल्ह्यातील चाचण्यांच्या व त्याच्या अहवालाच्या आकडेवारीवर लक्ष टाकले तर कोरोना चाचणी करणाऱ्यांपैकी तब्बल ९२.७७ नागरिक निगेटिव्ह निघाले आहेत. यावरून चाचणीबाबतची लोकांच्या मनातली भीती अनाठायी असल्याचे स्पष्ट होते.
प्रारंभी कोरोनाचा संसर्ग हा बाहेर जिल्ह्यातून किंवा बाहेर राज्यातून जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांमुळे होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे बाहेरून आलेल्यांना होम क्वारंटाईन किंवा इन्स्टिट्युशन क्वारंटाईन करणे सुरू झाले. कोरोना काळात आतापर्यंत बाहेरून चंद्रपूर जिल्ह्यात ९५ हजार ८६३ नागरिक दाखल झाले. या सर्वांना क्वारंटाईन केल्यानंतर ९४ हजार ३३८ नागरिकांना काहीही लक्षणे नसल्याने मुक्त करण्यात आले. सध्या एक हजार ५२५ नागरिक क्वारंटाईन आहेत. त्यांच्यावर प्रशासनाची देखरेख आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत ६१ हजार ३९३ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. यात ३१ हजार ४५५ चाचण्या प्रयोगशाळेतून झाल्या तर २९ हजार ९३८ चाचण्या अॅन्टिजेन प्रणालीद्वारे करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, या चाचण्यांमधून तब्बल ५६ हजार ९५७ चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. तर तीन हजार ४४६ जणांच्या चाचणी पॉझिटिव्ह आल्या आहेत. टक्केवारीचा हिशोब केला तर तब्बल ९२.७७ टक्के नागरिकांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत.
चंद्रपूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यातच आता कोरोना संसर्ग जोरदार वाढू लागला आहे. यात चिंतेची बाब अशी की हा संसर्ग संपर्कातून होत आहे. कोणत्याही प्रवासाची पार्श्वभूमी नसलेले व्यक्ती कोरोना बाधित म्हणून पुढे येत आहे. आॅगस्ट महिन्याच्या प्रारंभापासून कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे. कोरोनासोबतच जगताना अनेक नियमांचे पालन करणे सर्वांनाच बंधनकारक आहे. सामाजिक हितासाठी असे करणे सर्वांची जबाबदारी आहे. कोरोनाचा संसर्ग सर्व वयोगटातील व्यक्तींना होत आहे. त्यामुळे आता सर्वांनीच काळजी घेणे आवश्यक झाले आहे. यासोबतच चाचण्यांबाबतची भीती बाजुला सारून लोकांनी सौम्य लक्षणेही आढळल्यास मोकळे मनाने चाचणी करून घेणे गरजेचे आणि त्यांच्याच हिताचे आहे.
चाचण्यांबाबतचा गैरसमज दूर करा
समाजात कोरोना चाचण्यांबाबत अनेक संभ्रम निर्माण केले जात आहे. सोशल मीडियावर तर ‘कोरोना कशामुळे होतो, तर तो चाचणी केल्याने होतो’ असा चुकीचा मॅसेज वायरल केला जात आहे. चाचणी केलेल्यांमधून ९२.७७ टक्के नागरिक निगेटिव्ह आले आहेत.
आ. जोरगेवारांच्या प्रकृतीत सुधारणा
चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांना कोरोनाची लक्षणे आढळून आल्यानंतर त्यांची चाचणी करण्यात आली. यात ते पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या फुफ्फुसात इन्फेक्शन झाले होते. मात्र आता त्यांची प्रकृती बरी असल्याचे त्यांनी भ्रमणध्वनीवरून लोकमतला सांगितले. चार-पाच दिवसात कोरोनातून बरे होऊच चंद्रपूरला परत येईन, असेही ते म्हणाले. नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
अॅन्टिजेनमुळे वाढल्या चाचण्या
पूर्वी कोरोनाची चाचणी नागपूर येथील प्रयोगशाळेत केली जात होती. संशयित रुग्णाचा स्वॅब घेऊन तो नागपूरला पाठविला जात होता. दोन दिवसानंतर त्याचा अहवाल यायचा. त्यामुळे तेव्हा केवळ संशयिताचीच चाचणी केली जात होती. मात्र त्यानंतर चंद्रपुरातच युध्दपातळीवर कोरोना चाचणी प्रयोगशाळा उभारण्यात आली. याशिवाय महानगरपालिकेच्या वतीने अॅन्टिजेन चाचण्याही सुरू करण्यात आल्या. त्यामुळे आता चाचण्यांचा वेग वाढला आहे.