३० ग्रामपंचायतींची केंद्राकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 06:00 AM2019-08-23T06:00:00+5:302019-08-23T06:00:40+5:30
देशात सर्व जिल्ह्याचे स्वच्छता विषयक गुणांकन ठरविण्यासाठी ‘़स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१९’ अंतर्गत १५ सप्टेंबर २०१९ पर्यंतच्या कालावधीत सर्व्हेक्षण होणार आहे. शाळा, अंगणवाडया, आरोग्य केंद्रे, मंदिरे, सार्वजनिक ठिकाणे, यात्रा स्थळे तसेच ग्रामपंचायत अंतर्गत येणारी विविध सार्वजनिक ठिकाणे यांची केंद्र शासनाच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : देशात सर्व जिल्ह्याचे स्वच्छता विषयक गुणांकन ठरविण्यासाठी ‘़स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१९’ अंतर्गत १५ सप्टेंबर २०१९ पर्यंतच्या कालावधीत सर्व्हेक्षण होणार आहे. शाळा, अंगणवाडया, आरोग्य केंद्रे, मंदिरे, सार्वजनिक ठिकाणे, यात्रा स्थळे तसेच ग्रामपंचायत अंतर्गत येणारी विविध सार्वजनिक ठिकाणे यांची केंद्र शासनाच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील कोणत्याही ३० गावांना प्रत्येक्ष भेट देऊन सर्वेक्षण होणार आहे. त्यामुळे गाव स्वच्छ ठेण्यात किती ग्रामपंचायतींनी पुढाकार घेतला आहे, हे आता यातून स्पष्ट होणार आहे.
गावातील सर्व सार्वजनिक ठिकाणांचे निरीक्षणे तसेच स्वच्छतेविषयी ग्रामस्थ, ग्रामपंचायत पदाधिकारी यांची स्वच्छतेबाबतची मते घेतली जाणार आहेत. स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमाच्या संकेतस्थळावरील माहितीचा आधारही यासाठी घेण्यात येणार आहे. सर्व देशात हे सर्वेक्षण होणार असून सर्वेक्षणासाठी ग्रामपंचायतीची निवड नमुना निवड पध्दतीने सर्व्हेक्षण सस्थेकडून केली जाणार आहे. राज्यातील ग्रामस्थांकडून प्रत्यक्ष व आॅनलाईन सहभाग घेतला जाणार आहे. गावस्तरावर सरपंच, ग्रामसेवक, स्वच्छता कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य, निगराणी समिती सदस्य, अंगणवाडी कार्यकर्त्या, आशा, आणि शिक्षक यांच्या प्रतिक्रिया घेतल्या जाणार आहेत.
अतिशय गंभीरतेने गावांची तपासणी होणार असून जिल्ह्यातील सर्व कर्मचारी, अधिकारी व सर्व ग्रामस्थांनी स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१९ विषयी जागृक राहून याद्वारा चंद्रपूर जिल्ह्याला जास्तीत जास्त गुण मिळण्याच्या दृष्टीने सर्व जनतेने सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.
असे होईल गुणांकन
सेवा पातळीवरील प्रगतीसाठी ३५ टक्के गुण देण्यात आले आहेत. यात जिल्ह्यांनी नोंदविलेल्या आॅनलाईन माहितीसाठी १० टक्के गुण, सार्वजनिक शौचालयाचे एससी, एसटी वस्तीत झालेले बांधकाम १० टक्के गुण, बेसलाईनमधून सुटलेल्या लाभार्थ्यांच्या शौचालय बांधकाम स्थितीकरिता १५ टक्के गुण निश्चित करण्यात आले आहेत. सार्वजनिक ठिकाणाच्या स्वच्छतेबाबत थेट निरीक्षणासाठी ३० टक्के गुण निश्चित केले आहेत. यात सर्व सार्वजनिक शौचालयाची उपलब्धी ५ टक्के गुण, सार्वजनिक शौचलयाचा वापर ५ टक्के गुण, सर्व सार्वजनिक ठिकाणी पाणी साठा उपलब्धता १० टक्के गुण, प्लास्टिक कचऱ्याची स्थिती १० टक्के गुण, नागरिकांच्या प्रतिक्रियांकरिता ३५ टक्के गुण निश्चित केले आहेत. यात गावातील महत्त्वाच्या व्यक्तींच्या प्रतिक्रिया १० टक्के गुण, ग्रामस्थांच्या आॅनलाईन प्रतिक्रिया ५ टक्के गुण निश्चित केले आहेत.
स्वच्छतेबाबत विचारलेल्या प्रश्नांची योग्य ती उत्तरे निवडून प्रतिक्रिया नोंदविण्याच्या प्रक्रियेचे गुणांकन करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वेक्षणात जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवाव्यात.
- राहुल कर्डिले,
मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.चंद्रपूर.