लोकवाहिनीचा ७० वर्षांचा निरंतर प्रवास !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 01:12 IST2018-06-01T01:12:20+5:302018-06-01T01:12:20+5:30
‘प्रवाश्याच्या सेवेसाठी’ हे ब्रीद घेऊन प्रवाशांना सुरक्षित पोहचविणाऱ्या राज्य परिवहन महामडळाने १ जून रोजी ७० वर्षे पूर्ण करीत ७१ वर्षात पदार्पण केले आहे.

लोकवाहिनीचा ७० वर्षांचा निरंतर प्रवास !
राजकुमार चुनारकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : ‘प्रवाश्याच्या सेवेसाठी’ हे ब्रीद घेऊन प्रवाशांना सुरक्षित पोहचविणाऱ्या राज्य परिवहन महामडळाने १ जून रोजी ७० वर्षे पूर्ण करीत ७१ वर्षात पदार्पण केले आहे. महामंडळाकडून प्रवाशांना विविध सवलती दिल्या जात असल्याने आजच्या खासगी वाहतुकीच्या स्पर्धेतही महामंडळाची लालपरी लोकवाहिनी चांगलाच तग धरत सोबतीला शिवशाही बससह ७० वर्षांनंतरही निरंतर सेवा देत आहे.
१ जून १९४८ मध्ये राज्य शासनाने परिवहन खात्यातंर्गत प्रवाशी वाहतूक सेवा सुरू केली आहे. पहिली बस सेवा पुणे ते अहमदनगर या मार्गावर सुरू करण्यात आली होती. त्यानंतर आजतागायत ही सेवा प्रवाशांना सुरक्षित आपल्या स्थळी पोहचवित आहे. दिवसेंदिवस सर्वच क्षेत्रात स्पर्धा वाढली आहे.
महामंडळाच्या सेवेत खासगी प्रवाशी वाहतूक अडथळा ठरत आहे. खासगी वाहने आकर्षक व आरामदायक आहे. विशेष म्हणजे, कमी वेळेत जाण्यासाठी अनेक प्रवाशी आकर्षित होत आहेत. हा प्रवास शहरी भागात बºयापैकी सुरु आहे. या खासगी वाहतुकीच्या तोडीसाठी एस. टी. महामंडळानेही शिवशाही बसचा ताफा लालपरीच्या दिमतीला आणला आहे. समाजातील ३३ विविध घटकांना प्रवास भाड्यात १० ते १०० टक्के सवलत देण्यात येते. त्याचप्रमाणे त्रैमासिक पास, आवडेल तिथे प्रवास योजना सवलतीच्या दरात दिली जाते. मात्र बदलत्या काळानुसार अत्याधुनिक तिकीट, संगणकीय प्रणाली, संगणकीय आरक्षण प्रणाली, मोबाईल आरक्षण, वाय-फाय आदी सेवा सुरू केल्या आहेत. अपघात सहायता निधी अंतर्गत अपघातात दुर्देवाने प्रवाशी मृत झाल्यास १० लाख रुपये तर जखमींना पाच लाख रुपये नुकसान भरपाई दिली जाते. या सर्व सवलतीमुळे एस.टी. आजही ग्रामीण भागात सर्वांची आवडती आहे. एस.टी.ने आज पूर्ण महाराष्ट्रातील मार्ग व्यापले आहेत.
ग्रामीण भागात भरवशाची सेवा
ग्रामीण भागातील प्रवाशांची गरज भागवते ती लोकवाहिनी. त्यामुळे ग्रामीण भागात एस टी. ला जीवन वाहिनी संबोधले जाते. महामंडळाकडून प्रवाशांना विविध प्रकारच्या सवलती दिल्या जात आहेत. आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आदी क्षेत्राच्या प्रगतीत महामंडळाचा सिहांचा वाटा आहे.