राजकीय आखाड्यात ७ हजार ९६ गरिबांची बत्ती गुल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:27 IST2021-03-18T04:27:43+5:302021-03-18T04:27:43+5:30
चंद्रपूर : लाॅकडाऊन काळातील वीज बिल न भरल्यामुळे चंद्रपूर परिमंडळातील तब्बल ७ हजार ९६ नागरिकांची वीज कट करण्यात आली ...

राजकीय आखाड्यात ७ हजार ९६ गरिबांची बत्ती गुल
चंद्रपूर : लाॅकडाऊन काळातील वीज बिल न भरल्यामुळे चंद्रपूर परिमंडळातील तब्बल ७ हजार ९६ नागरिकांची वीज कट करण्यात आली आहे. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील २ हजार २५६ घरगुती,७०० वाणिज्यिक व १४२ औदयोगिक ग्राहकांचा समावेश आहे. या नागरिकांवर आता अंधारात राहण्याची वेळ आली आहे. यातील काहींची वीज बिल भरण्याची क्षमता असतानाही विविध राजकीय पक्षांच्या आवाहनामुळे त्यांनी बिल भरणे टाळल्याने आता त्यांचीही बत्ती गुल झाली आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्च २०२० रोजी लॉकडाऊन घोषित करण्यात आला. यावेळी महावितरणने ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा केला. एप्रिल २०२० ते जानेवारी २०२१ या दहा महिन्याच्या काळात थकित वीजबिलापोटी कोणत्याही ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला नाही. मात्र आता थकबाकीदारांना टप्याटप्याने वीजबिल भरण्याची सोय उपलब्ध करून देत ग्राहकांना दिलासा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे, ७ हजार ९६ ग्राहकांनी तब्बल ५ कोटी २७ लाख थकविले आहेत. लाॅकडाऊनपासून ते आजपर्यंत अनेक राजकीय पक्षांनी सामान्य ग्राहकांना वीज बिल भरू नये, असे आवाहन केले होते. एवढेच नाही तर वीज कट करण्यासाठी कर्मचारी आल्यास आम्हाला सांगा, असेही सांगून सहानुभूती देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र प्रत्यक्षात ग्राहकांची वीज कट झाली असतानाही या ग्राहकांकडे कुणीच फिरकले नसल्याचे चित्र सध्या बघायला मिळत आहे.
बाक्स
या ग्राहकांचा समावेश
५ हजार ६०६ घरगुती
१ हजार ८३ वाणिज्यिक
२०७ औदयेागिक
बाॅक्स
१५ हजार ग्राहकांनी थकविले १० कोटी
१७ मार्च २१ पर्यंत चंद्रपूर परिमंडळातील घरगुती, वाणिज्यिक व औदयेागिक अशा एकंदरीत १५ हजार ग्राहकांनी एप्रिल २०२० पासून एकंदरीत १० कोटी ४५ लाखाचा भरणा केला नाही. चंद्रपूर मंडलातील ७ हजार ७८८ हजार ग्राहकांनी ६ कोटी ४५ लाख व गडचिरेाली मंडलातील ७ हजार ३९२ ग्राहकांनी ४ कोटी रुपये थकविले आहे.
कोट
१५ हजार १८० ग्राहकांकडून १० कोटी ४६ लाख येणे बाकी आहे. अशा सर्व थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरु असून थकबाकीदरांनी थकबाकीचा भरणा करुन महावितरणला सहकार्य करावे.
सुनील देशपांडे
मुख्य अभियंता, चंद्रपूर परिमंडळ