खरीप हंगामात वाटणार ६८८ लाखांचे पीक कर्ज
By Admin | Updated: May 30, 2015 01:39 IST2015-05-30T01:39:42+5:302015-05-30T01:39:42+5:30
खरीप हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपला असून जिल्हा प्रशासनाने यावर्षी ६८८ लाख ८५ हजार रूपयाचे पीक कर्ज वाटपाचे नियोजन केले आहे.

खरीप हंगामात वाटणार ६८८ लाखांचे पीक कर्ज
मंगेश भांडेकर चंद्रपूर
खरीप हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपला असून जिल्हा प्रशासनाने यावर्षी ६८८ लाख ८५ हजार रूपयाचे पीक कर्ज वाटपाचे नियोजन केले आहे. मात्र अद्यापही जिल्ह्यात कर्ज वाटपाचा श्रीगणेशा झाला नसल्याने शेतकऱ्यांना खरीप पीक पेरणीसाठी अडचणी येण्याची शक्यता बळावली आहे.
२५ मे पासून रोहिणी नक्षत्राला सुरूवात झाली असून ८ जूनला मृग नक्षत्र लागणार आहे. सर्वसाधारणपणे मृग नक्षत्रापासूनच पाऊस पडायला सुरूवात होत असते. त्यामुळे या नक्षत्रात पेरणीच्या कामांना वेग येते. आता शेतकरी मान्सूनपूर्व मशागतीच्या कामात व्यस्त असून पेरणीसाठी बी-बियाण्यांची जुळवाजुळव करीत आहेत. मात्र गेल्या दोन वर्षातील ओला व कोरडा दुष्काळ यामुळे शेतकरी आर्थिक तंगीत आहे.
अशात त्यांना बी-बियाणे खरेदी करण्यासाठी आर्थिक अडचणी येत असून बँक, सावकार, नातेवाई यांच्याकडे कर्जासाठी धावपळ करीत असल्याचे चित्र आहे. बँकांकडून कर्ज वाटपाचा लवकर श्रीगणेशा होऊन शेतकऱ्यांना वेळेत कर्ज मिळाल्यास बी-बियाणे व खते खरेदी करण्यासाठी जास्त अडचणींचा सामना करावा लागणार नाही. मात्र बोटावर मोजण्याइतक्या शेतकऱ्यांना नाममात्र कर्ज देऊन कर्ज वाटपाचा श्रीगणेशा केल्याचे काही ठिकाणी दिसून येत आहे. प्रत्यक्षात मात्र स्थिती वेगळीच असून अनेकांनी कर्जासाठी अर्ज करूनही त्यांच्या प्रकरणांवर कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे कर्ज मिळण्यास आणखी किती दिवसांचा कालावधी लागेल, याची चौकशी शेतकरी करीत आहेत.
कृषी विभागाने खरीप पीक पेरणी अहवाल तयार करून विविध बँकामार्फत कर्ज वाटपाचे उद्दीष्ठ निश्चीत केले असले तरी अनेक शेतकऱ्यांना कर्जासाठी हेलपाट्या मारावे लागत असल्याची स्थिती आहे. सातबारावरील हिस्सेदारांची सहमती, यापूर्वीच्या कर्जाचा बोजा, कर्ज नसल्याचा दाखला अशा अनेक अडचणी शेतकऱ्यांसमोर येत आहेत. त्यामुळे काही शेतकरी बँकेच्या कर्जापेक्षा नातेवाईक किंवा सावकार यांच्याकडून मिळणारे कर्ज लवकर मिळत असल्याने त्यांच्याकडे वळले असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे.
नियोजनापेक्षा अधिक कर्ज वाटप
जिल्हा प्रशासनाकडून दरवर्षी कर्ज वाटपाचे नियोजन केले जाते. मात्र दरवर्षीच नियोजनापेक्षा अधिक कर्जाचे वाटप झाले आहे. २०१२-१३ मध्ये ३८० लाख ८८ हजार रूपयाचे कर्ज वाटपाचे नियोजन होते. यात ४०८ लाख ३४ हजार रूपयाचे कर्ज वाटप झाले. २०१३-१४ मध्ये ४६८ लाख ३२ हजार रूपयाचे कर्ज वाटप नियोजन होते. यात ५५९ लाख ८८ हजार रूपयांचे कर्ज वाटप झाले. तर सन २०१४-१५ मध्ये ५५९ लाख ८८ हजार रूपयांचे कर्ज वाटप नियोजन होते. यात ५९९ लाखांचे कर्ज वाटप झाले.
जिल्हा मध्यवर्ती बँकेची आघाडी
दरवर्षी कर्ज वाटप प्रकरणात जिल्हा मध्यवर्ती बँकेची आघाडी राहिली आहे. २०१२-१३ या वर्षात जिल्हा मध्यवर्ती बँकेने २०६ लाख ५६ हजार रूपयाचे कर्ज वाटप केले. २०१३-१४ मध्ये २२६ लाख ७९ हजार तर २०१४-१५ मध्ये ३६१ लाख २१ हजार रूपयाचे कर्ज वाटप केले आहे. २०१५-१६ या वर्षी जिल्हा मध्यवर्ती बँकेतून ३९३ लाखांचे कर्ज वाटपाचे नियोजन आहे.