उद्योगबंदीच्या स्थितीमुळे ५०० कोटींची गुंतवणूक ठप्प
By Admin | Updated: December 23, 2014 23:00 IST2014-12-23T23:00:38+5:302014-12-23T23:00:38+5:30
जिल्ह्यातील आणि चंद्रपूर परिसरातील उद्योगधंदे बंद पडण्याच्या स्थितीमुळे ५०० कोटी रूपयांची गुंतवणूक ठप्प पडली आहे. एवढेच नाही तर, एमआयडीसी क्षेत्रातील चार स्पंज आयर्न प्लँटही बंद पडले आहेत.

उद्योगबंदीच्या स्थितीमुळे ५०० कोटींची गुंतवणूक ठप्प
चंद्रपूर : जिल्ह्यातील आणि चंद्रपूर परिसरातील उद्योगधंदे बंद पडण्याच्या स्थितीमुळे ५०० कोटी रूपयांची गुंतवणूक ठप्प पडली आहे. एवढेच नाही तर, एमआयडीसी क्षेत्रातील चार स्पंज आयर्न प्लँटही बंद पडले आहेत. उद्योगांना या स्थितीतून बाहेर काढण्याच्या मागणीसाठी जिल्ह्यातील उद्योजकांनी अलिकडेच उद्योगमंत्र्यांची भेट घेऊन सहकार्याची विनंती केली. यातून काय मार्ग निघतो, याकडे आता उद्योजकांचे लक्ष लागले आहे.
गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर लोह आहे. त्याची चाचणी करण्याची मागणी उद्योजकांकडून होत आहे. हे क्षेत्र नक्षलग्रस्तभागात येत असल्याने व्यावसायिकांना अडचणीचे ठरत आहे. खनिज संपत्ती उपलब्ध असतानाही त्याचा वापर करता येत नसल्याने यासंदर्भात सरकारने निर्णय घेण्याची विनंती उद्योजकांकडून होत आहे. केंद्रीय पर्यावरण विभागाने २०१० पासून चंद्रपूर जिल्ह्यात उद्योगबंदी घातली आहे. यामुळे नव्या उद्योगांचा मार्ग बंद झाला आहे. अनेक गुंतरवणूकदार आणि उद्योजक या जिल्ह्यात नवीन उद्योग सुरू करण्यासाठी आतूर असले तरी बंदी हटविण्याच्या मागणीवर निर्णय झाला नाही.
अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील वीज दर अधिक असल्याची उद्योजकांची ओरड आहे. याचा प्रतिकूल परिणाम स्टिल आणि प्लॉस्टीक उद्योगावर पडत असल्याने स्पर्धेत हे उद्योजक टिकू शकत नाही, असे उद्योजकांचे मत आहे.
कोळसा हा उद्योगांमध्ये महत्वाचा असला तरी आॅक्शनमध्ये तो खरेदी करावा लागत असल्याने दर अधिक पडतो. यामुळे विजेच्या उत्पादन दरातही वाढ होते. अधिक दराची वीज खरेदी करण्यास सरकार आणि अन्य उद्योगसमूह तयार नसल्याने हा खर्च कसा पेलवायचा असा प्रश्न उद्योजकांकडून उपस्थित केला जात आहे. (जिल्हा प्रतिनिधी)