शेतीपिकाच्या नुकसान भरपाईसाठी ५०० अर्ज
By Admin | Updated: October 22, 2015 00:47 IST2015-10-22T00:47:17+5:302015-10-22T00:47:17+5:30
सध्या खरीप हंगाम संपत येत असताना वन्यप्राण्यांनी शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करणे सुरू केले आहे.

शेतीपिकाच्या नुकसान भरपाईसाठी ५०० अर्ज
वरोरा : सध्या खरीप हंगाम संपत येत असताना वन्यप्राण्यांनी शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करणे सुरू केले आहे. खरिपातील पीक हातात येत असताना नुकसान भरपाई मिळावी याकरिता वरोरा तालुकयात आजच्या घटकेला ५०० अर्ज प्राप्त झाले आहे. त्यामुळे यावर्षी वन्यप्राण्यांनी शेतातील पिकांचे सर्वाधिक नुकसान केल्याचे दिसून येत आहे.
वन्यप्राण्यांचा जीवाला कुठलीही दुखापत झाल्यास तसेच त्यांना ठार मारल्यास वनविभागाच्या वतीने अशा व्यक्तीविरुद्ध कार्यवाही केली जाते तर वन्यप्राण्यांना शेतातून हुसकविण्यासाठी शेतकरी काटेरी ताराला विद्युत प्रवाह सोडतात. यामध्ये अनेक शेतकऱ्यांना आपला प्राण गमवावा लागला होता. त्यामुळे अशा कृतीपासून शेतकरी दूर जात आहे. वन्यप्राणी शेतात कळपाने येत असल्याने त्यांंना हुसकविण्याचा प्रयत्न केल्यास ते शेतकऱ्यांवर हल्ला करून जखमी केल्याच्या घटना घडत असल्याने शेतकरी आपल्या पिकाचे नुकसान उघड्या डोळ्यांनी हतबल होवून बघत असते.
वन्यप्राण्यांनी पिकाचे नुकसान केल्यास मागील काही वर्षापासून देणाऱ्या अनुदानामध्ये वाढ करण्यात आली आहे. दरवर्षी वनविभाग स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीकडून प्रत्येक वर्षी हमी भाव प्रत्येक पिकाचा मागावून त्यानुसार वनविभाग शेतकऱ्यांना अनुदान देत असते यामुळे शेतकऱ्यांमध्ये जागृती झाली असून शेतातील पिकाची नुकसान झाल्यास अर्ज दाखल केले आहे. (तालुका प्रतिनिधी)