वसतिगृहात ५० लाखांचे साहित्य धूळ खात
By Admin | Updated: September 27, 2015 00:51 IST2015-09-27T00:51:47+5:302015-09-27T00:51:47+5:30
राजुरा विधानसभा क्षेत्रातील राजुरा, कोरपना, जिवती आणि गोंडपिपरी तालुक्यातील आदिवासींच्या मुलांसाठी १५० विद्यार्थी क्षमतेचे दोन आदिवासी मुलांचे वसतिगृह सुरू झाले.

वसतिगृहात ५० लाखांचे साहित्य धूळ खात
आदिवासी मुलांचे वसतिगृह : सोई-सुविधांअभावी वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे हाल, अभ्यासावरही विपरीत परिणाम
लोकमत आॅन द स्पॉट
बी.यु. बोर्डेवार राजुरा
राजुरा विधानसभा क्षेत्रातील राजुरा, कोरपना, जिवती आणि गोंडपिपरी तालुक्यातील आदिवासींच्या मुलांसाठी १५० विद्यार्थी क्षमतेचे दोन आदिवासी मुलांचे वसतिगृह सुरू झाले. आज या वसतिगृहाला भेट दिली असता सोई-सुविधांपासून मुले वंचित असल्याचे दिसून आले. येथील बहुतेक साहित्य बंद असून धूळ खात आहेत.
या वसतिगृहामधील मुलांसाठी दहा लाखाचे दोन जनरेटर घेण्यात आले आहेत. मात्र ते जनरेटर मागील तीन वर्षापासून बंद आहे. मुलांना गरम पाणी मिळावे, यासाठी सोलर सिस्टीम वसतिगृहाच्या वर बसविण्यात आले होते. तेदेखील बंद आहे. या वसतिगृहातील मुलांना संगणकाचे ज्ञान मिळावे, यासाठी दहा संगणक संच आहेत. मात्र प्रस्तुत प्रतिनिधीने या वसतिगृहात भेट दिली असता हे सर्वच संगणक संच बंद असल्याचे दिसून आले.लायब्ररी तर अजूनपर्यंत उघडलीच नाही. या ठिकाणी मुलांना आंघोळीसाठी जे नळ आहेत, तेदेखील बंद आहे. मुलांना दरमहा मिळणारा ५०० रुपये भत्ता चार महिन्यापासून बंद आहे. अर्धे सत्र संपले तरी ड्रेसचे पैसे मिळाले नाही. नोटबुक मिळाले नाही. या वसतिगृहात गरीब आदिवासी मुलांची थट्टा चालविली जात आहे. त्यामुळे याला जबाबदार प्रकल्प अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची गरज आहे.
वसतिगृह क्रमाक दोन मध्ये सात बाथरूम आहेत. त्यापैकी दोन सुरू आहे. इतर बाथरूममध्ये पाणीच येत नाही. १९८२ मध्ये सुरू झालेले हे वसतिगृह ३३ वर्षानंतर अनेक समस्यांच्या विळख्यात आहे. या ठिकाणी एकही साहित्य व्यवस्थित नाही. हे वसतिगृह आहे की आदिवासी मुलांची थट्टा करणारे केंद्र आहे हेच कळायला मार्ग नाही. या ठिकाणी अधीक्षक आहे पण कधीकधीच उपस्थित असतात. १५० आदिवासी मुलांना वेठीस धरण्याचा प्रकार सुरू आहे.
३० सप्टेंबरला विद्यार्थ्यांचे उपोषण
वसतिगृहातील या दुरवस्थेकडे येथील विद्यार्थ्यांनी वारंवार वरिष्ठांचे लक्ष वेधले. मात्र विद्यार्थ्यांच्या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे आता विद्यार्थी संतापले आहेत. वसतिगृहापुढेच ३० सप्टेंबरला सकाळी १० वाजतापासून विद्यार्थी विविध मागण्यासाठी उपोषणाला बसणार आहे.