४९९८ हेक्टर वनभूमीवर उभे आहेत प्रकल्प
By Admin | Updated: June 5, 2015 01:08 IST2015-06-05T01:08:47+5:302015-06-05T01:08:47+5:30
जिल्ह्यात मानव आणि वन्यजीवांच्या संघर्ष उडाला की चर्चा केवळ मानव-वन्य जीव संघर्षाचीच होते.

४९९८ हेक्टर वनभूमीवर उभे आहेत प्रकल्प
वन्यजीव घुसताहेत गावात : १२ वर्षात १३५ माणसांचे बळी
पर्यावरण दिन विशेष
गोपालकृष्ण मांडवकर चंद्रपूर
जिल्ह्यात मानव आणि वन्यजीवांच्या संघर्ष उडाला की चर्चा केवळ मानव-वन्य जीव संघर्षाचीच होते. मात्र वन्यजीवांच्या अधिवासात माणसांनी प्रकल्पाच्या नावाखाली थाटलेला व्यवसाय कुणाच्या नजरेच्या टप्प्यातही येत नाही. असाच काहीसा प्रकार चंद्रपूर जिल्ह्यात सुरु आहे. जिल्ह्यातील ३ हजार ९९८ वनजमीन प्रकल्पांच्या घशात गेली असल्याने या वनभूमीवरचे हजारो वन्यजीव विस्थापित झाले आहेत. हे लक्षात घेता, पर्यावरण बिघडल्याच्या नावाने कंठशोष करणाऱ्यांनी त्या विस्थापित वन्यजीवांच्या पुनर्वसनासाठी काय केले, याचा शोध घेण्याची गरज यंदाच्या पर्यावरण दिानच्या निमीत्ताने निर्माण झाली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकूण ४६ प्रकल्प वनजमीनीवर उभे आहेत. त्यापैकी कोळसा आणि अन्य खाणीमध्ये ३ हजार ७०२.३८२४ हेक्टर वनजमीन गेली आहे. या खाणी जिल्ह्यातील जंगलाच्या छातीवर पार रोऊन उभ्या झाल्या आहेत.
जिल्ह्यातील १८ सिंचन प्रकल्प हरितक्रांतीचा आव आणत असले तरी, त्यात १ हजार ११०.२९७५ हेक्टर वनजमीन बुडाली आहे. मात्र सिंचनाचा लाभ किती क्षेत्रावर होत आहे, हा विषय अध्ययनासाठी महत्वाचा ठरावा असा आहे.
विजेच्या उत्पादनात चंद्रपूर जिल्हा देशात चमकत आहे. वीज उत्पादानाच्या नावाखाली नेतेमंडळी, प्रशासन आणि उद्योजक स्वत:ची पाठ थोपटून घेत असले तरी, या प्रकल्पांची वीज वाहून नेणाऱ्या वाहिण्यांसाठीही १८५.६४२१ हेक्टर वनजमीनीची आहुती द्यावी लागली आहे. अशी एकूण ३ हजार ९९८ हेक्टर वनजमीन वाहिण्यांच्या उभारणीसाठी कामी आली आहे. मात्र यामुळे जिल्ह्यात पर्यावरणाचा झालेला ऱ्हास आणि वन्यजीवांची होरपळ अद्यापही कुणी गांभीर्याने घेतलेली दिसत नाही.
चंद्रपूर हा व्याघ्रजिल्हा म्हणून ओळखला जातो. देशभरात असलेल्या ४५ व्याघ्रप्रकल्पांपैकी चंद्रपुरात सर्वाधिक वाघ आहेत. जिल्ह्यातील जंगलात १ हजार ७४५ गावे वसलेली त्यातील ८३५ गावे तर अगदी घनदाट जंगलालगत आहेत. या सर्व गावांमध्ये ६९ हजार ८२६ कुटूंंब राहतात. या सर्वांना वन्यजीवांच्या दहशतीमध्ये वावरावे लागत आहे. जंगलालगतच शेती असल्याने घराबाहेर पडण्याशिवाय गत्यंतर नाही. परिणामत: केव्हा वन्यजीवांचा हल्ला होईल याचा नेम राहिलेला नाही.
जंगलात वाढलेले पर्यटन, पर्यटकांचा धुडगुस, जंगलातील कोळसा खाणी, अतिक्रमणे यामुळे ही स्थिती उद्भवली हे मान्य करावेच लागेल. जनजागृती वाढविणे जरजेचे आहे. जंगलव्याप्त गावांभोवती सोलर कुंपण करायला हवे. गावाबाहेर शौचास जाणे टाळून शौचालयाचा वापर नागरिकांनी करायला हवा.
-प्रा. योगेश दुधपचारे
ग्रीन प्लॅनेट सोसायटी, चंद्रपूर.
१२ वर्षात १३५ माणसांचा बळी
मागील २००२ ते २०१४ या १२ वर्षांच्या काळात विविध घटनांमध्ये १३५ जणांना प्राण गमवावा लागला आहे. अधिकृत नोंदीनुसार वाघाच्या हल्ल्यात ६३ ठार झाले. बिबटाच्या हल्ल्यात २१ ठार झालेत. सर्वाधिक मृत्यू वाघ-बिबटांमुळे घडले आहेत. रानडुकराच्या हल्ल्यतही १७ जण दगावल्याची नोंद आहे.
वन्यजीव संघर्षाच्या तीन हजारांवर घटना
गेल्या चार वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकली असता वन्यजीव संघर्षाच्या १५ हजार ३२१ घटना घडल्याचे दिसते. केवळ चार वर्षात एवढ्या घटना असतील तर, मागचा भूतकाळ कसा रक्तरंजीत असेल याचा विचारच न केलेला बरा ! या चार वर्षात ४७३ व्यक्ती घायाळ झाले, ४ हजार ३०२ गुरांचा बळी गेला.
संघर्ष नवा नाही
मानव वन्यजीव संघर्ष नवा नाही. अनादी काळापासून तो चालत आला आहे. जंगलाला माणसानी देव मानले. वृक्षांची पूजा केली. संस्कृतीने प्राण्यांनाही पुजले. तरही हा संघर्ष थांबलेला नाही; थांबणारही नाही. त्याचे दोषारोपण कुणाच्या माथ्यावर थोपविण्यापेक्षा शासनाने जनजागृजी वाढविणे गरजेचे आहे.
वन्यजीवांनी कुठं जायचं ?
वन्यजीव गावाकडे येतात हे खरे असले तरी त्यांनी जायचे कुठे, या प्रश्नाची उत्तर सध्यातरी कुणाकडेच नाही. प्रकल्प आणि विकासाच्या नावाखाली माणसांनी जंगल तोडले. वन्यजीवांचा अधिवास धोक्यात आला. कॅरिडोर वाढला. या कॅरिडोरमध्ये येणारी गावे आता त्यांचे लक्ष्य ठरत आहे. वनजमीन प्रकल्पांच्या उभारणीसाठी उपयोगात आणताना तेवढे जंगल मात्र उभे झाले नाही. जंगलातील जनावरे गावात शिरायला लागली. पीकांची नासाडी, माणसांवर हल्ले हे प्रकार नित्याचे झाले. त्यातून कधी माणसांवर हल्ले तर कधी वन्यजीवांची हत्या असे सत्र सुरू झाले. या १२ वर्षांच्या काळात १३५ लोकांना आपला जीव गमवावा लागला. जीवाचे मोल भरून निघणारे नसल्याने या जखमा आप्तेष्टांच्या मनात अजुनही ओल्याच आहेत.