३६५ दिवस आणि १२.२५ कोटींची दारू
By Admin | Updated: April 1, 2016 01:37 IST2016-04-01T01:37:16+5:302016-04-01T01:37:16+5:30
चंद्रपूर जिल्ह्यात १ एप्रिल २०१५ पासून दारूबंदी लागू केली आहे. शासनाचा हा धोरणात्मक निर्णय असल्याचे सांगून न्यायालयानेही यात हस्तक्षेप केला नाही.

३६५ दिवस आणि १२.२५ कोटींची दारू
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात १ एप्रिल २०१५ पासून दारूबंदी लागू केली आहे. शासनाचा हा धोरणात्मक निर्णय असल्याचे सांगून न्यायालयानेही यात हस्तक्षेप केला नाही. शासनाचाच हा महत्त्वाकांक्षी निर्णय असतानाही शासकीय यंत्रणाच या निर्णयाबाबत गंभीर झालेली दिसत नाही. जिल्ह्यात दारूबंदी झाली; मात्र जिल्हा दारूमुक्त होऊ शकला नाही. आज दारूबंदीला एक वर्ष पूर्ण होत आहे. या एका वर्षांत तब्बल १२ कोटी २३ लाख पाच हजार ३१५ रुपयांची दारू पोलिसांनी जप्त केली. १८ कोटी ७१ लाख २६ हजार रुपये किंमतीची वाहनेही या कारवायांमध्ये जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणांमध्ये तब्बल आठ हजार २८४ आरोपींना पोलिसांनी अटक केली. दारूबंदी झाली असली तरी दारू विक्री प्रकरणांची वर्षभरातील ही आकडेवारी सामाजिक आरोग्यासाठी भयावह आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात मागील दशकात मद्यपींचे प्रमाण अवाक्याबाहेर झाले होते. तरुणांपासून मोठ्यापर्यंत अनेकजण व्यसनाच्या आहारी गेले होते. ग्रामीण भागात याचे प्रमाण अधिक होते. मजूरवर्गही दारूच्या आहारी गेला होता. त्यामुळे त्यांच्या मिळकतीचा पैसा दारूवर खर्च व्हायचा आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह अडचणीत यायचा. त्यामुळे गावागावातील महिलांनी दारूबंदीसाठी लढा उभारला. श्रमिक एल्गारचे नेतृत्व मिळाल्यानंतर महिला चक्क रस्त्यावर उतरल्या. अनेक सामाजिक संघटनांनी दारूबंदी झालीच पाहिजे, असा नारा दिला. आंदोलने झाली. त्यानंतर शासनाने तत्कालीन मंत्री संजय देवतळे यांच्या अध्यक्षतेखाली दारूबंदी अध्ययन समिती गठीत केली. या समितीने दारूविक्री आणि त्याचे दुष्परिणाम याबाबत अध्ययन करून शासनाला अहवाल सादर केला. पुढे सरकार बदलले. भाजपाची सत्ता येताच आणि आ. सुधीर मुनगंटीवार मंत्री होताच त्यांनी दारूबंदी घोषणाच करून टाकली. ही घोषणा १ एप्रिल २०१५ पासून अमलातही आली.
जिल्ह्यात दारुबंदी लागू होताच अवैध दारू विक्रीने डोके वर काढले. दुप्पट, तिप्पट किमतीने दारू खरेदी होत असल्याने हा गुन्हेगारीचा व्यवसाय अनेकांनी पत्करला. पोलिसांनी लागून असलेल्या जिल्ह्यातून दारू वाहतूक होऊ नये म्हणून सीमेवर पोलीस चौक्या उभारल्या. प्रत्येक वाहनाची कसून चौकशी केली जाऊ लागली. तरीही जिल्ह्यात दारू विक्री बंद झाली नाही. दारू विक्रेते एकाहून एक क्लुप्त्या लढवून दारू जिल्ह्यात पोहचवित होते. हा कित्ता आजही कायम आहे. दारू विक्रेत्यांच्या काही क्लुप्त्या पाहून तर पोलीसही चक्रावले होते.
या एका वर्षात असा एकही दिवस उजाडला नाही की ज्या दिवशी दारू मिळाली नाही. मद्यपींना ती अविरत मिळत आहे. असे असले तरी पोलीस गप्प बसलेले आहे, असे म्हणणे चुकीचे ठरेल. या एका वर्षांत पोलिसांनीही अनेक दारू विक्रेत्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
१ एप्रिल २०१५ ते २९ मार्च २०१६ या एका वर्षांत पोलिसांनी दारूबंदी कायद्यान्वये एकूण सहा हजार ७१६ गुन्ह्यांची नोंद केली आहे. या प्रकरणांमध्ये आठ हजार २८४ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवायात एकूण एक लाख ५० हजार ८१० लिटर देशी व विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या दारूची किंमत तब्बल १२ कोटी २३ लाख पाच हजार ३१५ रुपये आहे. सदर गुन्ह्यांमध्ये ३९४ चारचाकी वाहने व एक हजार ३४४ दुचाकी वाहने पोलिसांनी जप्त केली आहे. या वाहनांची किंमत १८ कोटी ७१ लाख २६ हजार रुपये आहे.
दारूबंदी असतानाही मद्य प्राशन करूनही बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी अशा एक हजार १६९ वाहनचालकांवर कारवाई केली आहे.
पोलिसांच्या या कारवायामुळे काही प्रमाणात का होईना, दारू विक्रेते व मद्यपींवर वचक राहिला. याचा परिणाम ग्रामपंचायत निवडणूक, गणेशोत्सव, दुर्गाउत्सव मिरवणुकादरम्यान दिसून आला. मागील ११ महिन्यात जिल्ह्यात जवळपास ६८० ग्रामपंचायतीच्या निवडणुका शांततेच पार पडल्या. गणेशोत्सव व दुर्गात्सव मिरवणुकांमध्ये अनुचित घटना घडल्या नाही. होळी आणि दारूचे समिकरण फार जुने आहे. असे असले तरी यावेळी काही प्रमाणात तोडण्यात पोलिसांना यश आले. जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली कडक बंदोबस्त ठेवला होता. (शहर प्रतिनिधी)