३५ नायब तहसीलदारांचे डिमोशन
By Admin | Updated: March 29, 2015 01:07 IST2015-03-29T01:07:36+5:302015-03-29T01:07:36+5:30
महसूल विभागातील अव्वल कारकून आणि मंडल अधिकाऱ्यांना नायब तहसीलदार पदावर पदोन्नती देण्यात आली होती.

३५ नायब तहसीलदारांचे डिमोशन
चंद्रपूर : महसूल विभागातील अव्वल कारकून आणि मंडल अधिकाऱ्यांना नायब तहसीलदार पदावर पदोन्नती देण्यात आली होती. मात्र आता विभागीय आयुक्तांनी या कर्मचाऱ्यांना पदावनत करण्यात येत असल्याचे पत्र पाठविल्याने कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात तब्बल ३५ अव्वल कारकून तथा मंडल अधिकाऱ्यांना याचा फटका बसला आहे.
शासनपत्र दिनांक १२ फेब्रुवारी २०१२ नुसार दिलेल्या मार्गदर्शक सुचनेनुसार महसूल अर्हता परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर माजी आयुक्त रेड्डी यांनी अव्वल कारकुन तसेच मंडल अधिकाऱ्यांना सन २०१२ तसेच २०१४ मध्ये नायब तहसिलदार पदावर पदोन्नती दिली होती. याला तत्कालीन शासनाने मंजुरीही दिली होती. परंतु सदर पदोन्नीत्याबाबत निर्णय फिरवून या कर्मचाऱ्यांना पदावनत करण्यात आले आहे.
या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. पदावनत करायचे होते तर, पदोन्नती दिलीच कशाला, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. मागील वर्षभरापासून जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर नायब तहसीलदार म्हणून कार्यरत असताना आता या कर्मचाऱ्यांना आपल्या पूर्वीच्याच जागेवर अव्वल कारकून म्हणून काम करावे लागणार आहे.
विशेष म्हणजे, याबाबत न्यायालय तसेच मॅटमध्येही सदर प्रकरण सुरु असल्याने न्यायालयाच्या निर्णयाकडे जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. (नगर प्रतिनिधी)