ब्रह्मपुरी तालुक्यातील ३२ हजार ३९५ नागरिक पुरामुळे प्रभावित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 05:01 IST2020-09-10T05:00:00+5:302020-09-10T05:01:06+5:30
पूर ओसरल्यानंतर या भागात डायरिया, मलेरिया, ग्रस्ट्रो, कावीळ, ताप, अतिसार यासारखे साथीचे आजावर बळावले असून या भागात जि.प. च्या आरोग्य विभागामार्फत ओपीडी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, १ लाख ११ हजार ९८१ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये किरकोळ आजाराचे १९२ रुग्ण आढळून आले, अशी माहितीही संध्या गुरनुले यांनी दिली.

ब्रह्मपुरी तालुक्यातील ३२ हजार ३९५ नागरिक पुरामुळे प्रभावित
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : संजय सरोवरचे पाणी सोडल्याने वैनगंगा नदीला आलेल्या पुराने ब्रह्मपुरीत कहर केला. पूरग्रस्त गावांच्या सर्व्हेक्षणातून विदारक वास्तव पुढे आले आहे. एकट्या ब्रह्मपुरी तालुक्यातील ३२ हजार ३९५ नागरिक प्रभावित झाले आहे, अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरनुले यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
पूर ओसरल्यानंतर या भागात डायरिया, मलेरिया, ग्रस्ट्रो, कावीळ, ताप, अतिसार यासारखे साथीचे आजावर बळावले असून या भागात जि.प. च्या आरोग्य विभागामार्फत ओपीडी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, १ लाख ११ हजार ९८१ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये किरकोळ आजाराचे १९२ रुग्ण आढळून आले, अशी माहितीही संध्या गुरनुले यांनी दिली.
पुरामुळे विहिरींचे पाणी पिण्यायोग्य नव्हते. जि.प. च्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या मार्फतीने ९७ विहिरींचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. ज्यांची पूर्णता घरे कोसळली अशा १ हजार ३१८ नागरिकांना ब्रह्मपुरीतील विविध महाविद्यालयांमध्ये आसरा देण्यात आला आहे. कोविडची बाधा होऊ नये, याची काळजी घेतली जात असल्याचेही गुरनुले म्हणाल्या.
यावेळी जि.प. उपाध्यक्ष रेखा कारेकार, महिला व बाल कल्याण सभापती नितु चौधरी यांच्यासह जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सोमनाथे, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता दशरथ सोमनाथे उपस्थित होते.
४२ नळ पाणी पुरवठा योजना क्षतिग्रस्त
पूरस्थितीमुळे नागभीड, ब्रह्मपुरी, मूल, सावली व चंद्रपूर या ५ तालुक्यातील ४२ नळ पाणी योजनांची गावे बाधित झाली. पैकी ३५ नळ पाणी पुरवठा योजना क्षतिग्रस्त झाल्या. यातील १९ योजना वीज पुरवठा खंडित व पाईपलाईन नादुरुस्त झाल्याने बंद आहे. २३ योजनांची तात्पूरती डागडुजी करून पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे. ब्रह्मपुरी तालुक्यात ७२ हातपंपांचे फ्लशींग करून पाणी पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. क्षतिग्रस्त गावांचा पाणी पुरवठा पूर्ववत करण्यासाठी येणाऱ्या खर्चाचा आराखडा जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला आहे, अशी माहितीही जि.प. अध्यक्ष गुरनुले यांनी दिली.
१३३ जनावरे वाहून गेली
पूरग्रस्त भागामध्ये स्वच्छता व नागरिकांच्या आरोग्यासाठी २० लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्याचे निर्देश दिले आहे. पूरग्रस्त १३ गावातील ७७ पशुपालकांकडील १३३ जनावरे व ८ हजार ९८८ कुक्कुटपक्षांची हानी झाली आहे. यामध्ये १३ बैल, २४ गाइ, १२ म्हशी, १० रेडे, ९ वासरे व ६५ शेळ्या-मेंढ्यांचा समावेश आहे. सर्वाधिक नुकसान झालेल्या ९ गावांमध्ये ४२.९२ मेट्रीक टन चारा वाटप करण्यात आला आहे. २१ पूरग्रस्त गावांमध्ये शिबिरे आयोजित करून जनावरांवर लसीकरण व औषधोपचार करण्यात येत आहे.
शेतीचे १०० टक्के नुकसान
महापुरामुळे शेती खरडून गेली. शेतीचे पंचनामे ग्रामसेवक, तलाठी,कृषी सहाय्यकामार्फत सुरू आहे. १०० टक्के शेतीचे नुकसान झाले आहे. याकरिता शासनाने शेतकºयांना हेक्टरी १८ हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणीही गुरुनुले यांनी यावेळी केली.