एका वर्षात ३०० सर्पदंश
By Admin | Updated: July 19, 2014 23:49 IST2014-07-19T23:49:15+5:302014-07-19T23:49:15+5:30
पावसाळा लागला की साप, विंचूंचा उपद्रव वाढतो, हे सर्वज्ञात आहे. मात्र अलीकडे उपद्रवाचा हा आलेख वाढत चालला आहे. एप्रिल २०१३ ते मार्च २०१४ पर्यंत तब्बल ३०० जणांना सापाने दंश केला आहे.

एका वर्षात ३०० सर्पदंश
उपद्रव वाढला : दोन हजार व्यक्तींना कुत्र्यांचा चावा
चंद्रपूर : पावसाळा लागला की साप, विंचूंचा उपद्रव वाढतो, हे सर्वज्ञात आहे. मात्र अलीकडे उपद्रवाचा हा आलेख वाढत चालला आहे. एप्रिल २०१३ ते मार्च २०१४ पर्यंत तब्बल ३०० जणांना सापाने दंश केला आहे. यातील सहा जणांचा मृत्यू झाला. तर ८५ लोकांना विंचूने चावा घेतला. यासोबतच बेवारस कुत्र्यांचाही सुळसुळाट वाढला असून तब्बल दोन हजार लोकांना कुत्र्यांनी चावा घेतला. यातील एकाचा बळी गेला.
चंद्रपूर जिल्ह्यातील बहुतांश भाग जंगलव्याप्त आहे. घनदाट जंगलाला लागूनच ही गावे वसली आहेत. त्यामुळे सर्पदंशाच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असतात. जिल्हा सामान्य रुग्णालयातून मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूरसह या रुग्णालयाच्या अंतर्गत येत असलेल्या क्षेत्रात एप्रिल २०१३ ते २०१४ या कालावधीत ३०० लोकांना सापाने दंश केला आहे. सर्पदंशानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील २९४ लोकांना वाचविण्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांना यश आले. मात्र सहा लोकांचा अंगात विष भिनल्याने मृत्यू झाला. सापासोबतच विंचूचाही उपद्रव मागील वर्षी वाढलेलाच दिसून येत आहे. ८५ लोकांना विंचूने चावा घेतला. त्यांच्यावर वेळेत उपचार झाल्याने त्यांचे प्राण वाचले. एवढ्या मोठ्या प्रमाणात सर्पदंशाच्या घटना घडत असल्यातरी ग्रामीण व दुर्गम भागातील रुग्णालयात यावर उपचार उपलब्ध नसतो. दुर्गम भागातच घटना अधिक घडतात. त्यामुळे याठिकाणी सर्पदंशावरील उपाय उपलब्ध असणे गरजेचे आहे.(शहर प्रतिनिधी)