२७९ अतिक्रमित पांदण रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास
By Admin | Updated: September 10, 2016 00:46 IST2016-09-10T00:46:17+5:302016-09-10T00:46:17+5:30
रस्त्यांवर वाढलेले अतिक्रमण, पुढे सरकलेले शेतीचे धुरे या सर्व बाबींमुळे अरूंद झालेले ग्रामीण भागातील पांदणरस्ते अक्षरश: गुदमरायला लागले होते.

२७९ अतिक्रमित पांदण रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास
९० रस्त्यांना प्रतीक्षा : ४२३ किलोमीटर लांबीचे अतिक्रमण मोकळे
चंद्रपूर : रस्त्यांवर वाढलेले अतिक्रमण, पुढे सरकलेले शेतीचे धुरे या सर्व बाबींमुळे अरूंद झालेले ग्रामीण भागातील पांदणरस्ते अक्षरश: गुदमरायला लागले होते. मात्र महसूल प्रशासनाने हाती घेतलेल्या उपक्रमामुळे जिल्ह्यातील तब्बल २७९ रस्ते मोकळे झाले आहेत. या रस्यांवरील एकूण मिळून ४२३ किलोमीटर लांबीचे अतिक्रम मोकळे करण्यात प्रशासनाला यश आले आहे.
सुुवर्ण जयंती राजस्व अभियानाअंतर्गत महसूल विभागाने जिल्ह्यात हा कार्यक्रम हाती घेतला आहे. या अंतर्गत अतिक्रमण झालेले पांदणरस्ते, शेततळे तसेच शिवार रस्ते मोकळे झाले आहेत.
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त राज्य शासनाने सुवर्ण जयंती राजस्व अभियान सुरु केले होते. या अभियानाअंतर्गत हा उपक्रम हाती घेण्यात आला होता.
या उपक्रमाच्या प्रारंभी जिल्ह्यातील महसूल यंत्रणेने सर्वेक्षण करून अतिक्रमित पांदण रस्त्यांची माहिती घेतली होती. त्यात, ५६९ किलोमिटर लांबीचे ३७० पांदणरस्ते अतिक्रमित असल्याची बाब पुढे आली होती. अतिक्रमणामुळे अनेकांचे रस्तेही बंद झाल्याने शेतशिवारातील वहीवाटीसाठी मोठी अडचण होत होती. अतिक्रमण हटल्याने अडचण दूर झाली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
सर्वाधिक अतिक्रमण गोंडपिपरी तालुक्यात
गोंडपिपरी तालुक्यातील सर्वाधिक म्हणजे ९३ किलोमिटर लांबीचे अतिक्रमण असून ९ट रस्ते अतिक्रमेत झाल्याची बाब उघड झाली होती. त्यापाठोपाठ चंद्रपूर तालुक्यातील ६७ किलोमिटर लांबीच्या ४७ रस्त्यांवर अतिक्रमण आढळले. सुवर्ण जयंती राजस्व अभियानामुळे हे अतिक्रमण दूर झाले आहे. असे असले तरी जिल्ह्यातील १४५ किलोमिटर लांबीच्या ९० रस्त्यांवर अद्यापही शिल्लक आहे. येत्या काही महिण्यात हे रस्ते सुध्दा मोकळे होणार, असे महसूल यंत्रणेने कळविले आहे.