१७ हजार माती नमुने तपासणार

By Admin | Updated: June 2, 2015 01:21 IST2015-06-02T01:21:06+5:302015-06-02T01:21:06+5:30

कृषी व्यवस्थापनामध्ये जमीन हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. जमिनीचे आरोग्य भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्मावर

17 thousand soil samples can be examined | १७ हजार माती नमुने तपासणार

१७ हजार माती नमुने तपासणार

मंगेश भांडेकर ल्ल चंद्रपूर
कृषी व्यवस्थापनामध्ये जमीन हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. जमिनीचे आरोग्य भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्मावर अवलंबून असते. त्यामुळे जमिनीची सुपिकता पातळी व सुपिकता निर्देशांक काढून त्यानुसार खतांची शिफारस शेकतऱ्यांना केली जाते. २०१५-१६ या वर्षांत जमिनीची सुपिकता पातळी व सुपिकता निर्देशांक काढण्यासाठी जिल्ह्यात तब्बल १७ हजार ७१० माती नमुने तपासणी करण्यात येणार आहेत.
विविध प्रकारच्या खतांचा वापर करून पीक उत्पादन वाढीसोबतच जमिनीचे आरोग्य आणि सुपिकता टिकविणे आवश्यक आहे. यासाठी शासनाने मृद आरोग्य पत्रिका अभियान सुरू केले आहे.
या अभियानांतर्गत २०१५-१६ या वर्षात १७ हजार ७१० माती नमुन्यांची तपासणी करण्यात येणार आहे. प्रत्येक तालुक्यातील दरवर्षी २० टक्के गावे याप्रमाणे मृद नमुने तपासणी केली जाणार आहे. गावांची निवड करून त्यातील प्रत्येक गावांचे वाहितीखालील क्षेत्राच्या १० टक्के क्षेत्राचे मृद मालेनुसार प्रतिनिधिक नमुने गोळा करून त्याचे परीक्षण करणे, गावाची सुपिकता निर्देशांक व सुपिकता पातळी निश्चित करून पृथक्करणानुसार द्यायच्या खत मात्रांची शिफारस करण्यात येणार आहे.
या योजनेंतर्गंत मृद नमुन्याचे विश्लेषण करून सामु, क्षारता सेंद्रीय कर्ब, उपलब्ध स्फुरद व पालाश तसेच सूक्ष्म मुलद्रव्ये (तांबे, लोह, मंगल, जस्त) या गुणधर्माची तपासणी करण्यात येणार आहे. नैसर्गिक साधन सामग्रीच्या व्यवस्थापनासाठी मृद परीक्षण व सर्वेक्षणाच्या आधारे खतांच्या संतुलित वापरासाठी राज्यात मृद आरोग्य अभियान सुरू करण्यात आले आहे. या अंतर्गत दर तीन वर्षांत एकदा शेकतऱ्यांना मृद आरोग्य पत्रिकेचे वितरण करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात दोन माती तपासणी केंद्र असून एक शासकीय तर दुसरी पडोली येथील दिनी केमिकल प्रायव्हेट लिमिटेड लॅब आहे. या दोन्ही लॅब मधून सन २०१०-११ मध्ये ३२७ गावातील १० हजार ३२८ मृद नमुन्यांची तपासणी करण्यात आली. तर सन २०१२-१३ मध्ये १२८ गावांतील ४ हजार ९९५, सन २०१३-१४ मध्ये २४७ गावांतील ८ हजार १४२ तर सन २१०४-१५ मध्ये १७६ गावांतील ५ हजार ३७२ मृद नमुन्यांची तपासणी करण्यात आली. तर २०१५-१६ या वर्षांत १७ हजार ७१० नमुने तपासणीचे लक्ष आहे. गत पाच वर्षात मृद नमुने पृथक्करणाचे काम पूर्ण झाले असून जमीन आरोग्य पुस्तिका वितरित करण्यात आली आहे.

का करावी मृद तपासणी?
सध्या उन्हाचा हाहाकार उडाला आहे. लवकरच खरीपाचा हंगाम सुरु होईल. मान्सुनच्या आगमनापुर्वी बळीराजाची आपल्या शेतात लगबग सुरु आहे. पण या सगळ्याआधी मातीची तपासणी करणे गरजेचे आहे. आम्ही नेहमीच्या पद्धतीने ठरलेलेच पीक घेणार आहोत, मग आम्हाला मातीच परिक्षण करायची गरज काय, असे म्हणणाऱ्या शेतकऱ्यांनी प्रश्नाचं उत्तर जाणून घेणं गरजेचं आहे. आपण शेती करताना अनेक प्रकारच्या खतांचा वापर करतो. तसचं पिकांवर वेगवेगळ्या किटकनाशकांची फवारणी करतो. या सगळ्यांमुळे मातीची गुणवत्ता कमी होते, कस खालावतो. याचा परीणाम मातीच्या उत्पादन क्षमतेवर होत असतो. आपल्या शेतजमिनीतील मातीचं परिक्षण तपासणी करुन घेतल्यास आपल्याला मातीची गुणवत्ता कळू शकते.

माती नमुना असा घ्या
मातीची तपासणी करण्यासाठी आपल्या शेतात नागमोडी पद्धतीने खणुन घ्यावं. मध्यभागी साधारण चार ते सहा इंच खोल खड्डा खोदुन तेथील माती जमा करुन एका ताडपत्रीवर माती जमा करावी. जमा केलेली माती चांगली एकत्र करुन घ्यावी आणि चौकोनात पसरावी. या चौकोनातील मातीचे समसमान चार भाग करावेत. यातील दोन भाग निवडुन त्यातील माती एकत्र मिसळावी. उर्वरीत माती फेकुन द्यावी.

Web Title: 17 thousand soil samples can be examined

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.