१,४४५ शाळा सुरू, मात्र महाविद्यालये अजूनही बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:39 IST2021-02-05T07:39:14+5:302021-02-05T07:39:14+5:30

इयत्ता पाचवी ते आठवीचे विद्यार्थी २८ जानेवारीपासून शाळेत जात आहेत. विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी शाळांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना ...

1,445 schools open, but colleges still closed | १,४४५ शाळा सुरू, मात्र महाविद्यालये अजूनही बंदच

१,४४५ शाळा सुरू, मात्र महाविद्यालये अजूनही बंदच

इयत्ता पाचवी ते आठवीचे विद्यार्थी २८ जानेवारीपासून शाळेत जात आहेत. विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी शाळांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या. मुख्याध्यापक व शिक्षकांनी पालकांचे समुपदेशन केले. परिणामी, विद्यार्थ्यांचा आता उत्तम प्रतिसाद मिळू लागला आहे. गोंडवाना विद्यापीठ अंतर्गत जिल्ह्यात १३३ महाविद्यालये येतात. या महाविद्यालयांमध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या आदेशानुसार महाविद्यालये सुरू झाली. प्राध्यापकांना महाविद्यालयात उपस्थित राहणे अनिवार्य केले. काही महाविद्यालयांमध्ये अध्यापनही सुरू झाले आहेत; मात्र बहुतांश महाविद्यालयात विद्यार्थीच उपस्थित राहत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान कसे भरून निघणार, असा प्रश्न विचारला जात आहे.

१६ हजार विद्यार्थी प्रतीक्षेत

शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पालकांकडून हमीपत्र भरून घेण्यात आले. इंग्रजी माध्यमांच्या शाळांनीही हाच मार्ग स्वीकारला. कोरोनाचा संसर्ग कमी झाला. जिल्ह्यातील रुग्णसंख्याही कमी झाली. त्यामुळे पालक हमीपत्र भरून देत आहेत; परंतु महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा वयोगट लक्षात घेता त्यांच्या पालकांकडून हमीपत्र कसे भरून घेणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

कोट

कोरोनामुळे कुटुंबीयांनी महाविद्यालयात जाण्यासाठी सहमती दिली नाही. त्यामुळे मी घरीच राहून अभ्यास करतो. माझे बरेच वर्गमित्र याच पद्धतीने अभ्यास करीत आहेत. वर्गात येण्याबाबत कॉलेजकडूनही तगादा नाही. केवळ दिवस पुढे जात आहेत.

- श्रीकांत माहुरे, चंद्रपूर.

कोट

कॉलेजात येणारे विद्यार्थी कमी आहेत. तासिका होतात; पण म्हणावा तसा आनंद नाही. शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी मी कॉलेजात येत आहे. कोरोनामुळे बरेच जण पार्टटाइम रोजगाराकडे वळले. कुटुंबाची गरज म्हणून हे पाऊल उचलावे लागते.

कोट

मास्क लावून तासिका घेता येऊ शकतात. कॉलेजचे मुले-मुली सुजाण असतात. त्यांना चांगले व वाईट कळते. कॉलेज व विद्यापीठ प्रशासनाने याबाबत पर्याय शोधला पाहिजे.

- यमक गोपुरे, विद्यार्थी हितकारिणी संघटना, चंद्रपूर.

कोट

मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी कॉलेज व विद्यापीठाने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी. मुले कॉलेजात येत नसतील त्यांच्या प्रोत्साहनासाठी पालकांची मदत घेतली पाहिजे; परंतु हातात हात ठेवून बसणे चुकीचे आहे.

-आकाश कांबळे, युवा प्रबोधिनी, बाबूपेठ, चंद्रपूर.

Web Title: 1,445 schools open, but colleges still closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.