निराधार योजनेचे बल्लारपूर तालुक्यात १२३ प्रस्ताव मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:24 IST2021-04-03T04:24:36+5:302021-04-03T04:24:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बल्लारपूर : आर्थिक दुर्बल निराधार घटकातील लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी दरमहा तहसील कार्यालयात आढावा बैठक होत असते. ...

निराधार योजनेचे बल्लारपूर तालुक्यात १२३ प्रस्ताव मंजूर
लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : आर्थिक दुर्बल निराधार घटकातील लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी दरमहा तहसील कार्यालयात आढावा बैठक होत असते. नुकत्याच झालेल्या या बैठकीत निराधार योजनेची १४६ प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यापैकी १२३ लाभार्थ्यांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले.
या बैठकीला तहसीलदार संजय राईंचवार, नायब तहसीलदार रमेश कुळसंगे, निराधार समितीचे महादेव देवतळे, चंदू डोहणे, अनिल खरतड, अफसाना सैय्यद उपस्थित होत्या. यावेळी लिपिक सुनील दडमल यांनी संजय गांधी निराधार योजनेच्या ६९ लाभार्थ्यांची प्रकरणे व श्रावण बाळ योजनेच्या ७७ लाभार्थ्यांचे आलेले प्रस्ताव समितीसमोर ठेवले. त्यापैकी त्रुटी आढळलेले संजय गांधी योजनेचे पाच व श्रावण बाळ योजनेचे १८ प्रस्ताव विविध कारणांनी नामंजूर करण्यात आले. याशिवाय राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेंतर्गत १३ महिलांचे प्रस्ताव मंजूर करण्यात येऊन प्रत्येकी २० हजारप्रमाणे २ लाख ६० हजारांचा धनादेश त्यांना देण्यात आला.
बल्लारपूर तालुक्यात संजय गांधी निराधार योजनेचे तीन हजार १३६ लाभार्थी व श्रावण बाळ योजनेचे ३ हजार ७३२ लाभार्थी मिळून तालुक्यात एकूण सहा हजार ७६८ लाभार्थी आहेत. या लाभार्थ्यांना फेब्रुवारीपर्यंतच्या ६८ लाख ६८ हजारांच्या अनुदान धनादेशांचे वाटप करण्यात आले आहे. तहसील कार्यालयाकडून प्रत्येक लाभार्थ्याच्या खात्यात महिन्याला एक हजार रुपये जमा केले जातात.