चार दिवसात १०० कोटींची उलाढाल ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 05:01 IST2020-07-21T05:00:00+5:302020-07-21T05:01:17+5:30
आता १७ ते २१ जुलैपर्यंत चंद्रपूर शहरात कडक लॉकडाऊन करण्यात आले आहे. यावेळी तर जीवनावश्यक वस्तूंसह भाजी मार्केटही बंद करण्यात आले आहे. त्यामुळे मागील चार दिवसांत चंद्रपूर बाजारपेठेतील सुमारे १०० कोटींची उलाढाल ठप्प झाली. यातून १० कोटींचे व्यापारीवर्गाचे नुकसान झाले आहे.

चार दिवसात १०० कोटींची उलाढाल ठप्प
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सरकारने देशभर २३ मार्चपासून लॉकडाऊन करीत संचारबंदी लागू केली. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूवगळता इतर सर्व दुकाने, आस्थापना बंद होत्या. ३ मेपर्यंत लॉकडाऊनमध्ये शिथिलता आली नाही. या काळात चंद्रपूर शहरात एक हजार कोटी व ग्रामीण भागात एक हजार कोटींची उलाढाल ठप्प झाली. आता १७ ते २१ जुलैपर्यंत चंद्रपूर शहरात कडक लॉकडाऊन करण्यात आले आहे. यावेळी तर जीवनावश्यक वस्तूंसह भाजी मार्केटही बंद करण्यात आले आहे. त्यामुळे मागील चार दिवसांत चंद्रपूर बाजारपेठेतील सुमारे १०० कोटींची उलाढाल ठप्प झाली. यातून १० कोटींचे व्यापारीवर्गाचे नुकसान झाले आहे.
देशात कोरोनाचा संसर्ग होऊ लागल्याने केंद्रासह राज्य सरकार अलर्ट झाले. २२ मार्च रोजी जनता कर्फ्यू व त्यानंतर २३ मार्चपासून देशात सर्वत्र लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. केवळ किराना साहित्य, औषधी, दुध अशा जीवनावश्यक वस्तूंचीच दुकाने सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यातही या लॉकडाऊनची १०० टक्के अंमलबजावणी झाली. २३ मार्च ते ३ मेपर्यंत इतर सर्व दुकाने बंद होती. या कालावधीत जिल्हाभर तब्बल दोन हजार कोटींची उलाढाल ठप्प झाली होती.
त्यानंतर जून, जुलै या महिन्यात लॉकडाऊनमध्ये बरीच शिथिलता आल्यामुळे बाजारपेठ पुन्हा फुलू लागली. आधी सायंकाळी ५ व नंतर सायंकाळी ७ वाजेपर्यंत दुकाने सुरू राहत असल्यामुळे बाजारपेठेत चांगली वर्दळ दिसू लागली. व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलू लागले.
अशातच जिल्ह्यात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढला. रुग्ण दुपटीचा वेग वाढल्यामुळे जिल्हा प्रशासन चिंतेत सापडले. सध्या एकूण बाधितांची संख्या २७६ झाली आहे. दररोज १०-१५ रुग्णांची भर पडत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने चंद्रपूर शहरात पुन्हा लॉकडाऊन घोषित केले. १७ ते २१ जुलैपर्यंत संपूर्ण बाजारपेठ कडकडीत बंद करण्यात आली. जीवनावश्यक वस्तू व भाजी मार्केटही बंद ठेवण्यात आले आहे. मागील चार दिवसांपासून चंद्रपूर शहरातील कापड, रेडीमेड, होजीयरी, हार्डवेअर, जनरल, फर्नीचर, बांधकाम मटेरियल, हेअर सलून, जीम, स्टेशनरी, मोबाईल शॉपी व दुरुस्ती, प्लास्टिक, किराना स्टोअर्स, भाजी मार्केट यासारखी अनेक दुकाने बंद आहेत. यात दररोज कोट्यवधींची उलाढाल होते. मात्र लॉकडाऊनच्या काळात एक छदामही खरेदी-विक्री झाली नाही. चंद्रपूर शहरात दररोज सर्व दुकाने मिळून कोट्यवधींची उलाढाल होते. मागील चार दिवसात सुमारे १०० कोटींची उलाढाल ठप्प झाली. त्यामुळे सुमारे १० कोटींचे नुकसान व्यापाऱ्यांना सहन करावे लागले आहे. विशेष म्हणजे यातून सरकारलाही मिळणारा १० कोटींचा महसूल बुडाला आहे. याला चेंबर्स ऑफ कॉमर्सने दुजोरा दिला.
शेतकऱ्यांचेही नुकसान
चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक शेतकरी भाजीपाल्यांची लागवड करतात. हा भाजीपाला विक्रीसाठी बहुतांश शेतकरी चंद्रपुरात येतात. मात्र १७ ते २१ जुलैपर्यंत ठोक व चिल्लर असे दोन्ही भाजी मार्केट बंद ठेवण्याचे जिल्हा प्रशासनाचे निर्देश असल्यामुळे व चंद्रपूरच्या सीमा बंद असल्याने शेतकऱ्यांना भाजीपाला घेऊन चंद्रपुरात येणे जमले नाही. त्यामुळे त्यांचेही मोठे नुकसान झाले आहे.
चंद्रपुरात पाच हजार दुकाने
चंद्रपूर शहरात जवळपास पाच हजार दुकाने आहेत. प्रत्येक दुकानात किमान तीन ते पाच नोकर असतात. मात्र पाच दिवस सर्व दुकाने बंद असल्याने दुकान मालक व दुकानात काम करणारे नोकर, अशा सुमारे २५ हजार लोकांना मोठा फटका बसला आहे.