आयटीआयकडे ओघ; जागांपेक्षा अर्ज दुप्पट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:36 IST2021-08-26T04:36:42+5:302021-08-26T04:36:42+5:30
बुलडाणा : आयटीआय अर्थात तंत्रशिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे. काही वर्षांपूर्वी औद्योगिक प्रशिक्षण संस्था ओस पडल्या होत्या; परंतु औद्योगिक ...

आयटीआयकडे ओघ; जागांपेक्षा अर्ज दुप्पट!
बुलडाणा : आयटीआय अर्थात तंत्रशिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे. काही वर्षांपूर्वी औद्योगिक प्रशिक्षण संस्था ओस पडल्या होत्या; परंतु औद्योगिक क्षेत्रात प्रशिक्षित कामगारांची मागणी वाढल्यामुळे युवक-युवती आयटीआयकडे वळत आहेत. यंदा ४ हजार जागांसाठी मंगळवारपर्यंत ८ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत.
जिल्ह्यात आयटीआयच्या ४ हजार जागा आहेत. प्रवेश प्रक्रियेस अधिकृत सुरुवात झाली आहे. २४ ऑगस्टपर्यंत आठ हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. ३१ ऑगस्ट अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. गत काही वर्षांपासून आयटीआयकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर आदी ठिकाणच्या औद्योगिक क्षेत्रात आयटीआय केलेल्या युवकांना मोठी मागणी आहे.
विद्यार्थी म्हणतात...
दहावी, बारावीनंतर लगेच रोजगाराची संधी मिळविण्यासाठी आयटीआय ही एकमेव संस्था आहे. या माध्यमातून रोजगारासोबत स्वयंरोजगारही करता येऊ शकतो. कंपनीमध्ये नोकरीसाठी आवश्यक आहे.
- प्रथमेश वानखडे, विद्यार्थी
शिक्षणानंतर लवकर नोकरीची संधी हवी आहे. स्वयंरोजगारही करावयाचा असल्यास आयटीआयमध्ये प्रवेश मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. यंदा अर्ज केला असून दहावीतही चांगले गुण मिळाले आहेत.
- दीपाली खरे, विद्यार्थिनी
या कारणांमुळे चांगला प्रतिसाद...
अभियांत्रिकी पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत कंपन्या आयटीआय विद्यार्थ्यांना कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये संधी देत आहेत.
अनेक औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन करण्यात येते. त्यामुळे या विद्यार्थ्यांना जागेवरच रोजगार मिळतो.
त्यामुळे विद्यार्थी आयटीआयला अधिक पसंती देत आहेत. अकोला जिल्ह्यात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था ८ असून, खासगी संस्था २ आहेत.
...म्हणून वाढले आयटीआयचे विद्यार्थी
आयटीआयमध्ये व्यावसायिक कौशल्यावर अधिक भर दिला जातो. यामुळे विद्यार्थ्यांना थेट नोकरीची संधी मिळते. तसेच स्वयंरोजगारही मिळविणे शक्य होते. आयटीआयमुळे रोजगाराच्या संधीही वाढल्या आहेत. त्यामुळे आयटीआयकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे.
- प्रकाश खुळे, प्राचार्य
राेजगाराभिमुख असल्याने वाढले अर्ज
कौशल्यासाठी आयटीआयमध्ये प्रशिक्षण मिळते. मुलींना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी आयटीआयचे ट्रेड महत्त्वाचे आहेत. या माध्यमातून जिल्ह्यातील कंपन्यांमध्ये रोजगारही मिळविता येऊ शकतो. विद्यार्थ्यांना शासकीय नोकरीही मिळविता येते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा कल वाढल्याचे शिक्षणतज्ज्ञांनी सांगितले.