घरकुलांचे काम रखडणार
By Admin | Updated: June 20, 2015 02:56 IST2015-06-20T02:56:09+5:302015-06-20T02:56:09+5:30
कंत्राटी कामगारांची सेवा संपुष्टात.

घरकुलांचे काम रखडणार
बुलडाणा : रमाई घरकुल योजनेतील कंत्राटी अभियंत्यांची सेवा ३0 जूनपर्यंत संपुष्टात येत आहे. हे कंत्राटी अभियंते कामावरून कमी झाल्यास घरकुल योजनेला खीळ बसणार असून, जिल्ह्यातील सहा हजार घरकुलांची कामे ठप्प होणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दारिद्रय़रेषेखालील मागसवर्गीय घटकातील गोरगरीब नागरिकांना हक्काचं घरकुल मिळावं म्हणून शासनाने रमाई घरकुल ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे. बुलडाणा जिल्ह्यात या योजनेमधून २0१४ अखेर १0 हजार ८४३ घरकुले मंजूर करण्यात आली आहेत. त्यापैकी ३ हजार ९७0 घरकुलांचे बांधकाम पूर्ण करण्यात आले, तर एप्रिल २0१५ अखेर जिल्ह्यात १५ हजार २0२ घरकुले मंजूर करण्यात आली आहेत. त्यापैकी ७ हजार ६६७ घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. सध्या ६ हजार ६२१ घरकुलाची कामे प्रगतिपथावर आहेत. ही घरकुले तांत्रिकदृष्ट्या पूर्ण करून घेण्यासाठी जिल्ह्यात कंत्राटी अभियंत्यांची नियुक्ती केली होती; मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेने राज्यातील सर्व कंत्राटी अभियंत्यांची सेवा खंडित केली आहे. त्यामुळे सहा हजार घरकुलांचे बांधकाम रखडणार असल्याने गरीब कुटुंबांचे मालकीच्या घराचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे.