शेतातील विहिरीत पडून महिलेचा मृत्यू
By Admin | Updated: June 7, 2014 23:46 IST2014-06-07T23:11:02+5:302014-06-07T23:46:09+5:30
सुलतानपूर परिसरातील एका शेतामधील विहिरीत पडून एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

शेतातील विहिरीत पडून महिलेचा मृत्यू
मोताळा : तालुक्यातील इब्राहिमपूर ग्रामपंचायत अंतर्गत येणार्या सुलतानपूर परिसरातील एका शेतामधील विहिरीत पडून एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास घडली. या प्रकरणाची बोराखेडी पोलिस ठाण्यामध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राप्त माहितीनुसार, मोताळा तालुक्यातील इब्राहिमपूर गट ग्रामपंचायतमध्ये लोणघाट व सुलतानपूर या गावांचा समावेश असून, उज्ज्वला संजय गरुडे (वय ४५) राहणार सुलतानपूर या ग्रा.पं. सदस्या आहेत. शुक्रवारला उज्ज्वला गरुडे यांना दवाखान्यातून आणल्यानंतर संध्याकाळी पाच ते सहाच्या सुमारास शौचालयास बाहेर गेल्यानंतर बराच कालावधी उलटल्यानंतरही घरी परत न आल्याने नातेवाइकांनी शोध घेतला असता सदर महिला सुलतानपूर शिवारातील विठ्ठल पाटील यांच्या गट नं.१ मधील शेतात असलेल्या विहिरीमध्ये मृतावस्थेत आढळून आली. या बाबत शेत मालक तसेच पो.पा. विठ्ठल पाटील यांना रात्री ११ वाजेच्या सुमारास या घटनेची माहिती मिळताच बोराखेडी पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. बोराखेडी पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून प्रेत शवविच्छेदनासाठी बुलडाणा येथे रवाना केले. या प्रकरणी विठ्ठल पाटील यांनी घटनेची फिर्याद पोलिसांना दिली असून, अधिक तपास ए.एस.आय. पवार करत आहे. (शहर प्रतिनिधी)