राजेश शेगोकार/ बुलडाणा
लोकसभा निवडणुकीमध्ये बुलडाणा जिल्ह्यातील अभद्र युतीचा मुद्दा काँग्रेस-राष्टवादीच्या राज्यस्तरावरील सुकाणू बैठकांपर्यत गाजला. लोकसभेत एकमेकांच्या गळयात गळा घालुन मतांच्या माळा जमा करणारे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस नगरपालीकांमध्ये मात्र सेना भाजपा सोबत गळयात गळा घालतात. या निवडणुकीत सेना-भाजपानेच काँग्रेस राष्ट्रवादी संपविली असुन आता येणार्या विधानसभा निवडणुकांच्या पृष्ठभूमीवर पुढील महिन्यात होऊ घातलेल्या नगराध्यक्षपदांच्या निवडणुकीत अभद्र युती तुटणार का? याकडे राजकीय वतरुळाचे लक्ष लागले आहे. बुलडाणा, खामगाव, जळगाव जामोद या तीन नगरपालीकांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादीने सेना भाजपाला हाताशी घेतले आहे. विशेष म्हणजे या नगरपालीकांचा समावेश असलेल्या तिन्ही विधानसभा मतदारसंघात एकमेकांविरोधात लढलेले व पुढे लढणारे पक्षच सोबत बसले आहेत. विधानसभा निवडणुका पाहता आता महिनाभरावर येऊन ठेपलेल्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकांद्वारे अभद्र युती तोडून राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावरील युती, आघाडीचा मार्ग धरण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यामुळे पालीकांमधील राजकारणाला नवे वळण मिळण्याची चिन्हे आहेत.